विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारताची आगेकूच सुरू असतानाच विमान कंपन्यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारताची आगेकूच सुरू असतानाच विमान कंपन्यांनीही या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, दिल्ली ते सिडनी व मेलबर्न येथे जाण्यासाठी एकेरी तिकीटाचा दर ६० हजार रुपये पोहचला आहे. अवघ्या आठवडय़ात भरात तिकीटांचे दर वाढले आहेत.
विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना गुरुवारी होणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियात जाणा-यांची संख्या अधिक होणार आहे. महागडी तिकीटे असूनही क्रिकेटप्रेमींची संख्या वाढतच असून काही तिकीटे शिल्लक आहेत.
भारताने उप-उपांत्य फेरीत प्रवेश करताच तिकीटांचे दर वाढू लागले. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ मार्चला मेलबर्नला होणार आहे. भारत अंतिम लढतीत पोहचल्यास हे तिकीटांचे दर आणखीही वाढू शकतात, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष इक्बाल मुल्ला यांनी सांगितले.