मेंदूत रक्ताची गुठळी होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाला पक्षाघाताचा झटका येण्याचीही दाट शक्यता असते.
मुंबई- मेंदूत रक्ताची गुठळी होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाला पक्षाघाताचा झटका येण्याचीही दाट शक्यता असते. या कारणाने रुग्णाच्या मेंदूत असलेली रक्ताची गुठळी फोडण्यासाठी शरीराच्या कोणत्याही भागाची चिरफाड न करता मांडीजवळून एक लहान छिद्र पाडून त्यातून उपकरणे शरीरात घालून रक्ताची गुठळी फोडली जाईल.
शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पहिल्यांदाच अशा न्यूरोइंटरव्हेन्शनल शस्त्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणा-या शस्त्रक्रियेमुळे पक्षाघात रुग्णांना नक्कीच फायदा होईल.
शरीरात वाहिन्यांद्वारे रक्त वाहत असते. हे रक्त हृदय व फुप्फुसात शुद्ध होऊन शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचते. हेच रक्त पुन्हा धमन्यांद्वारे हृदयाकडे पुन्हा पाठवले जाते. हृदयापर्यंत पाठविण्याच्या या प्रक्रियेत धमन्या आकुंचन पावतात. कारण शरीराच्या पेशींना रक्त परत पाठवताना अधिक ताकद लागते. यात कधी कधी रक्ताची गुठळी बनते. यावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाला पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.
मेंदूतील गुठळी फोडण्यासाठी कराव्या लागणा-या शस्त्रक्रियेत चिरफाड करावी लागते. खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात येते. यासाठी १० ते १२ लाख रुपये लागतात.
सर्वसामान्य गरजू रुग्णांना हा उपचाराचा खर्च परवडयाजोगा नसल्याने ते उपचार करून घेत नाहीत. मात्र, पालिकेच्या शीव रुग्णालयात ही शस्त्रक्रिया आता मोफत करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिल्यांदाच मशिनरी विकत घेण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.