मेट्रोच्या तिकीटांमध्ये वाढ, बेस्टने देखील भाडेवाढ केल्याने पडवडणा-या प्रवासासाठी नेमकी कोणती वाहतूक सेवा निवडावी, या संभ्रमावस्थेत प्रवासी आहे. या संभ्रमावस्थेचा फायदा मुजोर रिक्षा-टॅक्सीचालक घेत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई- लोकलनंतर प्रवाशांची लाईफलाईन मानल्या जाणा-या- बेस्टवर काही महिन्यांपूर्वी मेट्रो नावाचे संकट कोसळले होते. वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणा-या मेट्रोने बेस्टचा बहुतांश प्रवासी खेचला होता. त्यामुळे तोटय़ात धावणारी बस अधिकच तोट्यात धावू लागली. मेट्रोमुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचेही धाबे दणाणले होते. मात्र नुकतीच मेट्रोच्या तिकीटांमध्ये वाढ करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी बेस्ट वापसी केली होती. १ फेब्रुवारी पासून बेस्टने देखील भाडेवाढ केल्याने पडवडणा-या प्रवासासाठी नेमकी कोणती वाहतूक सेवा निवडावी, या संभ्रमावस्थेत प्रवासी आहे. या संभ्रमावस्थेचा फायदा मुजोर रिक्षा-टॅक्सीचालक घेत असल्याचे समोर आले आहे.
आधी मेट्रो नंतर बेस्टच्या तिकीट दरात वाढ झाल्याने सामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलाच चटका बसला आहे. त्यामुळे परिस्थीतीसमोर हताश झालेला प्रवासी रिक्षा-टॅक्सीकडे वळत आहे. वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले, कुर्ला, अंधेरी, मालाड-मालवणी अशा ठिकाणी या मुजोर रिक्षाचालकांची अरेरावी मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. वांद्रे स्थानकावरून अवघ्या काही अंतरावर आरटीओ कार्यालय असून देखील याच ठिकाणी सर्वाधिक आरटीओचे नियम पायदळी तुडवले जात असल्याने आरटीओच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सायंकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकातून एमसीएपर्यंत ३० रुपयांऐवजी ४०रुपये भाडे वसूली करण्यात येत आहे. मिटरप्रमाणे जायचे झाल्यास हे मुजोर रिक्षावाले यायलाही तयार होत नाहीत. केवळ शेअरनेच जाणार अशी उद्धट उत्तरे दिली जातात. शिवाय आरटीओच्या नियमानुसार केवळ ३ प्रवासी बंधनकारक असताना जबरदस्तीने ४ प्रवासी कोंबून भरले जातात. वाहतूक पोलिसांना या सर्व प्रकारांची नीट माहिती असूनही केवळ हप्ता मिळत असल्याने वाहतूक पोलीस प्रवाशांचा गैरसोयीकडे कानाडोळा करत असल्याची चर्चा प्रवासी करत आहेत.
यापूर्वी आम्ही अनधिकृत रिक्षांवाल्यां विरोधात तक्रारी केल्या आहेत. वांद्रे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांकडे असणारे बॅचेस देखील येथील रिक्षाचालकांकडे नाहीत. यातील भंगारात निघालेल्या रिक्षांचीही संख्या मोठी आहे. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्ता चालतो. सर्वाना हप्ते पुरवले जात असल्याने कोणीही कारवाई करण्यासाठी पुढे येत नाही. – शशांक राव, अध्यक्ष, मुंबई रिक्षा-टॅक्सी मेन्स युनियन