मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा ‘टेक केअर गुड नाइट’ हा चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. सायबर गुन्ह्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणा-या या चित्रपटाबाबत सचिन खेडेकर यांच्याशी साधलेला संवाद.
नवनवे तंत्रज्ञान आणि आव्हाने याबाबत सचिन खेडेकर म्हणतात की, ‘‘नको नको म्हणताना तंत्रज्ञान आपल्या घरात घुसले आहे. ते शिकून घेणे, ही आपली जबाबदारी आहे. नवे तंत्रज्ञान न शिकता गाफील राहिलो, तर आपला गैरफायदा घेतला जाऊ शकतो. त्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. शिवाय जगापासून दूर किंवा मागे राहण्याचा धोका आहे. रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी दोन-तीन तास रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन सुविधेमुळे बस, रेल्वे आणि विमान प्रवासाचे तिकीट बुक करणे सोपे झाले आहे. अशा सर्व बेसिक गोष्टी शिकून घेण्याची गरज आहे.’’
‘टेक केअर गुड नाइट’ या चित्रपटाच्या कथेबाबत विचारले असता, ‘‘या चित्रपटातील नायक अविनाशची भूमिका मी साकारतोय. पत्नी, मुलगी आणि परदेशात असलेला मुलगा असे त्याचे कुटुंब आहे. काहीही कारण नसताना, हे कुटुंब सायबर गुन्ह्यामध्ये गोवले जाते. त्यातच या गुन्ह्यांमधील खलनायकाचा चेहरा सर्वासमोर येत नसतो. त्यामुळे कुणी आपल्यावर दरोडा घातलाय, कोण कट-कारस्थान रचतोय, हेच कळत नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाशी निगडित कथा असल्याने मला चित्रपट भावला.’’ नवे तंत्रज्ञान शिकण्याची गरज आहे. मात्र, युवा पिढी त्याचा (गैर) वापर करत असल्याचे दिसून येते. ‘‘तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत आहे. आपल्याकडे नव्या गाडय़ा आल्या. मात्र, त्याचा अधिक चांगला उपयोग करण्यापेक्षा युवा पिढी वेगावर अधिक भर देते. त्यांना तंत्रज्ञानाचा धोका समजावून सांगण्याची गरज आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाबाबतचे तोटे गांभीर्याने न घेता, त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. सायबर गुन्ह्याबाबत प्रयत्न ‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटामधून करत आहोत,’’ असे ते म्हणाले.
गिरीश जोशी यांच्यामुळे चित्रपटाशी जोडल्याचे सचिन खेडेकर यांनी सांगितले. ‘‘गिरीश जोशी आणि मी २० वर्षापासूनचे मित्र आहोत. ते उत्तम लेखक आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तसेच मी आणि अश्विनी भावे अभिनित ‘कदाचित’ चित्रपटाचे लेखन त्यांनी केले होते. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ चित्रपटाचे स्क्रिप्ट गिरीशचे होते. गिरीशला सायबर क्राईममधील खाचखळगे-बारकावे ठाऊक आहेत. त्याने इतके अभ्यासपूर्ण स्क्रिप्ट लिहिले होते की, त्यानेच दिग्दर्शित करावे अशी आमची इच्छा होती. गिरीश याने अभ्यासपूर्ण स्क्रिप्ट लिहिले आहे.’’ गिरीशच्या निमित्ताने सचिन खेडेकर पुन्हा एकदा नव्या दिग्दर्शकासमवेत काम करताहेत. ‘‘गेल्या चार चित्रपटांमध्ये मी नव्या दिग्दर्शकांसोबत काम करतोय. वरुण नार्वेकरने ‘मुरंबा’ दिग्दर्शित केला होता. निपुण धर्माधिकारीने ‘बापजन्म’द्वारे दिग्दर्शनामध्ये पाऊल ठेवले. ‘कच्चा लिंबू’च्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शक बनला. मी नवीन दिग्दर्शकांसमवेत सातत्याने काम करत आलो आहे. नव्या दिग्दर्शकांकडेच दूरदृष्टी आहे, असे मला वाटते. नट अभिनेता म्हणून मी अनेक वर्षे काम करतो आहे. नट म्हणून स्वत:ला नव्या उजेडामध्ये पाहण्याची क्षमता नव्या दिग्दर्शकामध्ये आहे. त्यांच्याकडून प्रत्येक कलाकाराला चार नव्या गोष्टी शिकता येतात, असे माझे ठाम मत आहे.’’
सचिन खेडेकरांसह तगडी ‘स्टार कास्ट’ ही ‘टेक केअर..’ची जमेची बाजू आहे. त्याबाबत विचारले असता, ‘‘आदिनाथ आणि पर्णिका पेठे यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यांच्यासह विद्याधर जोशी, सुरेखा तळवळकर असे अनुभवी कलाकार आहेत. महेश मांजरेकरने इन्स्पेक्टर पवार यांची लाजवाब भूमिका केली आहे. फार कमी वेळा पोलिसांचे असे वेगळे चित्रण पाहायला मिळते. इरावती हर्षे फार अनुभवी कलाकार आहे. चांगली कथा, नट, दिग्दर्शक अशी चांगली गट्टी जमून आली आहे, असे मला वाटते.’’