गाईला नुसता चारा उपयोगाचा नाही? पशुसंगोपन हा शेतीचाच एक भाग आहे. आपल्या भारताची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी उत्पादनावर आधारित आहे. भारतात श्वेतक्रांती झाली. भारत आज दुग्धोत्पादनात आघाडीवर आहे.
गाईला नुसता चारा उपयोगाचा नाही? पशुसंगोपन हा शेतीचाच एक भाग आहे. आपल्या भारताची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी उत्पादनावर आधारित आहे. भारतात श्वेतक्रांती झाली. भारत आज दुग्धोत्पादनात आघाडीवर आहे.
दुग्ध उत्पादन हा ग्रामीण भागातील शेतक-यांसाठी एक वरदान ठरलेला आहे. दुग्ध उत्पादन हा शेतक-यांचा अतिशय महत्त्वाचा जोडधंदा झालेला आहे. अगदी अल्पभूधारक शेतक-यांपासून ते मोठय़ा बागायतदारांपर्यंत दुग्ध उत्पादनामुळेच दैनंदिन आर्थिक गरजा भागवणे सुसह्य झाले आहे. यशस्वी दुग्ध उत्पादनामध्ये चांगल्या प्रतीची जनावरे, योग्य व संतुलित आहार, जनावरांचे आरोग्य व व्यवस्थापन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
तथापि या दुग्धधंद्यातील यश हे दुभत्या गुरांना सकस हिरवा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यावरच अवलंबून आहे. दुग्ध उत्पादनामध्ये एकूण खर्चाच्या जवळजवळ ६० ते ७० टक्के खर्च जनावरांच्या आहारावर होतो. त्यामुळे आहाराचे योग्य नियोजन केल्यास दूध धंदा अधिक फायदेशीर होण्यास मदत होते. भारतात तरी हिरवा सकस चारा हाच यशस्वी दुग्धोत्पादनाचा पाया आहे. सर्वसाधारणपणे एका जनावरास त्याच्या वजनाच्या ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते.
हिरवा चारा, वाळलेला चारा (वैरण) व आंबवण इत्यादी बाबींचा गुरांच्या आहारात समावेश होतो. १५ ते २० लिटर दूध देणा-या जनावरास दर दिवसाला २५ ते ३० किलो एवढा हिरवा चारा देणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकूण हिरव्या चा-यामध्ये ७० टक्के एकदलवर्गीय (१७ ते २० किलो) व ३० टक्के द्विदलवर्गीय (८ ते १० किलो) चारा देणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा संतुलित व पौष्टिक हिरवा चारा वर्षभर दुभत्या जनावरांच्या आहारामध्ये असायला पाहिजे.
सकस हिरव्या चा-यात प्रथिने, स्निग्धपदार्थ, शर्करा, खनिजे, क्षार, उपयुक्त आम्ल घटके आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. शिवाय हे सर्व अन्नघटक विद्राव्य स्वरूपात असतात. त्यामुळे ते सहज पचतात आणि गुरांच्या वाढीसाठी तसेच दुग्ध उत्पादनासाठी उपयोगी पडतात. पचनक्रिया सहज, जलद व शरीराच्या कमी ऊर्जा खर्चामध्ये होत असल्यामुळे दुग्ध उत्पादनासाठी ऊर्जा जास्त शिल्लक राहते. साहजिकच दुधाचे प्रमाण वाढते. ब-याच पशुपालकांचा असा समज असतो की, पावसाळय़ात चार, बांधावरील गवते, तणे, उसाचे वाढे वगैरेपासून पुरेसा हिरवा चारा मिळू शकतो.
परंतु हा गैरसमज आहे. अशा चा-यात प्रथिने आणि इतर उपयुक्त अन्नघटक फारच कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जास्त दूध देणा-या गाई/म्हशींचे पूर्ण पोषण होत नाही. परिणामत: त्यांच्या दुधाचे प्रमाण घटते. फॅटही कमी लागते. प्रकृतीवर व प्रजननावरही अनिष्ट परिणाम होतो. यासाठी योग्य चारा पिकांची निवड, लागवडीचा हंगाम, उपलब्ध जमीन व पाणीपुरवठा या गोष्टींचा विचार करून नियोजन केल्यास वर्षभर सतत पौष्टिक चारा जनावरांना उपलब्ध होईल.
बरेचसे शेतकरी हिरव्या चा-यासाठी मका, ज्वारी, बहुवर्षीय गवते यांची लागवड करतात. याबरोबरच संकरित नेपीअर, लसूणघास, बाजरी, चवळी, ओट, बटशीम इ. चारा पिकांची लागवड ही काही शेतकरी करतात. आपल्या शिवण, पांगारा, पालेहसन यासारख्या स्थानिक आणि सुबाभूळ या विदेशी झाडांपासून पौष्टिक झाडपाला उपलब्ध होऊ शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रथिने असल्याने जनावरांना पौष्टिक चारा म्हणूनदेखील वापरता येतो. मुरघास पद्धतीने हिरवा चारा साठवण करून नंतर वापरता येतो. मका हे मुरघास तयार करण्यासाठी सवरेत्कृष्ट पीक आहे. तसेच ज्वारी, बाजरी, संकरित नेपीअर गवत, गिनी गवत इत्यादी पिकेदेखील मुरघास तयार करण्यासाठी वापरता येतात.
आपल्याकडे पावसाळय़ात स्थानिक गवत विपुल प्रमाणात असल्यामुळे या गवतापासून आता मुरघास बनवणे शक्य आहे. गवत/पीक फुलो-यावर असताना ते कापून बारीक तुकडे करावेत. यासाठी गवत कापणी यंत्राचा (ब्रश कटर) खूप चांगला उपयोग होतो. प्रत्येकी १०० किलो चा-यामध्ये ५ ते ६ बादल्या पाण्यामध्ये तयार केलेले २ किलो गऊळ (काळा गूळ पण चालेल), अर्धा किलो युरिया, १ किलो मीठ यांचे मिश्रण शिंपडावे.
स्थानिक गवतामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे गुळाचा वापर करावा.
युरियामुळे मुरघासातील प्रथिनांचे प्रमाण वाढते. मका, ज्वारी यासारख्या पिकांपासून मुरघास तयार करताना गूळ व युरिया वापरण्याची आवश्यकता नाही. प्रक्रिया केलेले गवत योग्य आकाराच्या खड्डय़ात भरावे. पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून प्लॅस्टिक कापड आतल्या बाजूने अंथरावे. प्रक्रिया केलेल्या गवताचे थरावर थर रचून खड्डा भरावा. खड्डा जमिनीच्या पातळीपेक्षा २ ते २.५ पट वपर्यंत भरून खड्डय़ावर प्लॅस्टीक कापड अंथरून त्यावर २ ते ३ इंचाचा शेणमातीचा थर देऊन खड्डा बंद करावा. दोन ते तीन महिन्यांमध्ये मुरघास जनावरांस द्यावे. हंगामी चारा पिकांमध्ये मका, चवळी, ज्वारी, बाजरी, राईसबीन, ओट यांचा समावेश होतो. तर लसूणघास, संकरित नेपीअर ( गजराज) पॅरागवत, मारवेल, गिनिगवत, बस्सीम, स्टायलो ही बहुवर्षीय चारा पिके आहे. या विभागाकडे मुरघास तयार करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर योजनाही आहे.