घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांनी शनिवारी डॉक्टरांना मारहाण केली होती.
मुंबई – घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांनी शनिवारी डॉक्टरांना मारहाण केली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी पाच तास काम बंद आंदोलन केले. रुग्णालयातील वाढत्या मारहाणीच्या घटना विचारात घेऊन यापुढे रुग्णासोबतच एकाच नातेवाइकाला प्रवेश दिला जाणार असल्याचे उपनगरीय रुग्णालयाच्या प्रमुख अधीक्षिका डॉ. सीमा मलिक यांनी सांगितले.
रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. यामुळे डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी रुग्णाच्या मृत्यूची माहिती वरिष्ठ डॉक्टर सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत नातेवाइकांना देतील, अशी घोषणा डॉ. सीमा मलिक यांनी केली होती. मात्र, तरीही शनिवारी राजावाडी रुग्णालयात रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांनी एका डॉक्टरला मारहाण केली होती. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी सोमवारी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी पाच तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच डॉ. सीमा मलिक, कामगार नेते सुनील चिटणीस, टिळक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एम. गावित हे रुग्णालयात हजर झाले. डॉक्टरांना मारहाण करणा-या तिघांना आतापर्यंत अटक केली असून, अन्य दोन जण फरारी आहेत, असे पोलिसांनी आंदोलन करणा-या डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर अधिक तपासासाठी पोलिसांनी डॉक्टरांना रुग्णवाहिकेतून चक्क पोलिस ठाण्यात नेले. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना देणार असल्याचे माहीतगारांनी सांगितले.
या प्रकरणाला रुग्णालयातील सुरक्षारक्षकच जबाबदार असल्याचे डॉ. सीमा मलिक यांनी सांगितले. रुग्णालयातील सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांचीच आहे. हल्ल्याचे प्रकार रोखण्यासाठी यापुढे रुग्णासोबत एकाच नातेवाइकाला प्रवेश दिला जाणार आहे. तसेच डॉक्टरांना नातेवाइकांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्यास संबंधित रुग्णालयाच्या अधीक्षकांना याबाबत सुरक्षारक्षकांनी माहिती देणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, कामगारांशी चर्चा केल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर, परिचारिकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
चार हजार सुरक्षारक्षकांना लवकरच प्रशिक्षण
महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या चार हजार सुरक्षारक्षकांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल किंवा मुंबई पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीष म्हैसकर यांनी दिली.