माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीतील नेता हरपल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
लातूर- माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीतील नेता हरपल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
टी. एम. कांबळे यांचे संपूर्ण शिक्षण लातुरातच झाले. दयानंद कला महाविद्यालयातून त्यांनी एम.ए. इंग्लिश ही पदवी प्राप्त केली. त्या काळात त्यांनी रिपब्लिकन युवक फेडरेशन या संघटनेची स्थापना केली. १९७२ मध्ये राजा ढाले व नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची स्थापना केली. दलित पँथरचा हा झंझावात १९७४ मध्ये ख-या अर्थाने मराठवाडयात सुरू झाला. पँथरमध्ये टी. एम. कांबळे, अण्णाराव लामतुरे, महादेव चिकटे, अनंत लांडगे, श्रीहरी कांबळे, हरीश कांबळे, अशोक कांबळे, गंगाधर सरवदे, प्रवीण सोमठाणेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दलित पँथर मजबूत केली.
काही काळानंतर दलित पँथर हे संघटन नामदेव ढसाळ यांनी बरखास्त केले. त्यानंतर भारतीय दलित पँथरची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर रामदास आठवले व टी.एम. कांबळे सक्रिय होते. त्यानंतर दलित पँथरचे रामदास आठवले अध्यक्ष झाले व टी.एम. कांबळे सरचिटणीस झाले. यानंतर दलित पँथरमार्फत नामांतर चळवळ संपूर्ण मराठवाडयात सक्रिय झाली.
या चळवळीला अखेर यशही आले. पँथरच्या चळवळीमुळेच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केले. नामांतराच्या चळवळीनंतर दलित पँथरनंतर गायरान जमिनी, मंडल आयोग, शिष्यवृत्ती यासाठी आंदोलने केली आणि ती यशस्वीही केली. यानंतर रिपाइंचे ऐक्य होऊन त्यांचे चार खासदार निवडून आले. शरद पवार यांच्यामुळे रामदास आठवले राज्य मंत्रिमंडळात आले व त्यांच्यामुळेच टी. एम. कांबळे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कालांतराने आठवले व टी.एम. कांबळे वेगळे झाले व कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी (डेमोकेट्रिक) ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली.