कोकणी प्रेम दाखवत मुख्यमंत्र्यांनी ग्रीन रिफायनरीची घोषणा केली असली तरीही त्याची कोकणासाठी किती उपयुक्तता आणि शक्यता आहे हे तपासून बघणार, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
रत्नागिरी – कोकणी प्रेम दाखवत मुख्यमंत्र्यांनी ग्रीन रिफायनरीची घोषणा केली असली तरीही त्याची कोकणासाठी किती उपयुक्तता आणि शक्यता आहे हे तपासून बघणार, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण शुभारंभासाठी रत्नागिरीमध्ये आलेल्या नारायणराव राणे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोकणासंदर्भातील भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले की, चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या स्थानिकांचे प्रश्न का जाणून घेतले नाहीत, केवळ भाषण करून ते निघून गेले; परंतु इथल्या भूमिपुत्राला नेमके काय हवे हे जाणून घेण्याचा त्यांची प्रयत्नच केला नाही. आपल्या भाषणामध्ये त्यांनी कोकणात ग्रीन रिफायनरी होणार, जंगले वाढणार याची घोषणा केली. परंतु त्याचवेळी कोकणातील रस्ते, आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.
गेल्या वर्षभरात जिल्हा पातळीवर पैसाच आला नसल्याने कामे ठप्प आहेत. याची दखल मुख्यमंत्री का घेत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आमदार आणि खासदारांनाही इथल्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही, त्यांचा इथल्या प्रश्नांवर अभ्यास झालेला नाही. दोन्ही जिल्ह्याला दिलेले पालकमंत्री केवळ राज्यमंत्री असल्याने त्यांना अधिकारच नाहीत. यामुळे इथला विकास ठप्प झाला आहे. असे असताना मुख्यमंत्री याची कोणतीही दखल घेत नाहीत हे दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नारायणराव राणे यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की महामार्ग चौपदरीकरणाचे काम युती शासनामध्ये माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झाले.त्यानंतर काँग्रेसच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांना घेऊन केंद्र स्तरावर प्रयत्न केले आहेत. तर गेले वर्षभर भू-संपादन प्रक्रियेची योग्य माहिती प्रशासनाकडून मिळत नसल्याने काँग्रेसने दोन्ही जिल्ह्यात आंदोलने केली आहेत. त्यानंतर आता हे काम मार्गी लागले आहे. असे असताना शिवसेना मात्र आज भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती.
वास्तविक या चौपदरीकरणाच्या कामात शिवसेनेचा १ टक्काही सहभाग नाही असे श्री. राणे यांनी स्पष्ट केले. आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिका-यांना सूचना देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यास सांगितले होते.
त्याप्रमाणे ग्रामीण भागात ६०, शहरी भागात ४५ तर घाटामध्ये ३० किमीचे चौपदरीकरण होणार आहे तर मोबादलाही जैतापूरपेक्षा जास्त मिळणार आहे. या मागण्या मान्य झाल्यामुळेच सिंधुदुर्गामध्ये आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले असल्याचेही श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
भाजपा-शिवसेना सरकार आपली पाच वष्रे पूर्ण करेल असे सांगताना नारायणराव राणे म्हणाले की, सत्तेशिवाय उद्धव ठाकरे राहू शकत नाहीत तर मुख्यमंत्र्यांना मातोश्रीचाच आधार लागतो असा टोला त्यांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेचे राजकारण हे खूप वेगळे असून तेथील राहणीमान, वस्ती यामध्ये विभागले आहे. गेल्या २२ वष्रे मुंबईवर सत्ता करूनही शिवसेनेने या शहराचा विकास केला नाही. त्यामुळे देशाची ही आर्थिक राजधानी बकाल झाली आहे. त्यामुळे येथील जनता शिवसेनेवर नाखूश आहे असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार करताना श्री. राणे म्हणाले की मोदींनी मुंबईवर सूड उगवला असून येथील अनेक उद्योग ते गुजरातमध्ये स्थलांतरीत करीत आहेत.
स्मार्ट सिटीमध्येही मुंबईचा समावेश नाही यावरूनच मोदींची भूमिका स्पष्ट होते. परंतु मुंबईवर सत्ता असणा-या आणि भाजपासोबत राज्य आणि केंद्रात शासन चालविणा-या सेनेच्या खासदारांना याबाबत पंतप्रधानांना विचारण्याची हिंमत नाही असेही त्यांनी सांगितले. मोदींच्याच काळात देशात जातीय राजकारण, असहिष्णुता, महागाई आणि मोदींची मनमानी वाढली आहे असे श्री. राणे म्हणाले. रत्नागिरी जिल्हा काँग्रेससह राज्यात जेथे जेथे बदल हवे आहेत तेथे बदल केले जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बोलणे झाले असून येत्या फेब्रुवारीपर्यंत सारे प्रश्न मार्गी लागली असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री असलेले पालकमंत्री हाच अन्याय
काँग्रेस नेते नारायण रणे म्हणाले की, कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गला कँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले पालकमंत्री देण्यात आले होते. राज्यमंत्री मंडळात काम ठरते. विकासाचे धोरणात्मक निर्णय कोणते होतात ते राज्यमंत्र्यांना माहिती नसतात. असे राज्यमंत्री असलेले पालकमंत्री सिंधुदुर्ग, रत्नागिरीला भाजपा- शिवसेना युती सरकाने दिले आहेत. हाच कोकणावर युतीने केलेला अन्याय आहे.
सेनेवाल्यांचे मीटर बंद पडतील ना?
भाजपा- शिवसेना युती सरकार पाच वष्रे पूर्ण करणार. ते किती चिटक आहेत हे मला माहीत आहे. बाहेर पडण्याची धमकी देतात पण ते बाहेर पडणार नाहीत. कारण त्यांचे सगळे मीटर बंद पडतील ना. सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जावून भेटतात असेही नारायण राणे मिश्कीलपणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी थांबले पाहिजे होते
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा कार्यक्रम रत्नागिरीत घेतलात. मग वेळ काढून त्यांनी थांबायला हवे होते. लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजे होते. पत्रकारांशी संवाद साधायला हवा होता. लोकप्रतिनिधींशी चर्चा करायला हवी होती असे नारायण राणे म्हणाले.