मृणाल गोरे म्हणजे लोकसेवेला समर्पित आयुष्य. तत्त्वांना कधीच मुरड न घालता त्यांनी समाजवादी विचारधारेची कास धरत जे विधायक राजकारण व समाजकारण केले ते आजच्या काळात दुर्मीळ झाले आहे. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून अनेक लढे लढणा-या गोरे म्हणजे त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट रोहिणी गवाणकर यांनी या इंग्रजी पुस्तकात खुबीने मांडला आहे.
सुखवस्तू जीवन जगण्याचा मार्ग सोडून, मेडिकल कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून केवळ गरीब व वंचितांसाठीच काम करत राहण्याचे ध्येय ज्यांनी उराशी बाळगले होते, महिला आणि पीडितांसाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले होते. गरीब जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केले, वेळोवेळी त्यासाठी प्रस्थापित सरकारच्या धोरणांविरोधात एका लढवय्यीप्रमाणे ज्या पीडित जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्या, सरकारमधील भ्रष्टाचाराची कित्येक प्रकरणे ज्यांनी बाहेर काढली, महागाई विरोधात तसेच पिण्याचे पाणी सर्वाना मिळावे यासाठी ज्यांनी कित्येक वेळा आंदोलने केली, त्या मृणाल गोरे म्हणजे त्यागाचे ‘मूर्तिमंत’ उदाहरण होत्या. समाजवादी विचारधारेची कास धरून स्वार्थासाठी तत्त्वांना कधीच मुरड न घालता जे काही केलं ते लोकांसाठी केलं. त्यामुळे महिला व पीडितांसोबतच मध्यमवर्गीय जनतेच्याही गळ्यातील त्या ताईत होत्या. सर्व जनतेच्या त्या ‘ताई’ होत्या.
Footprints pf a crusader या पुस्तकात मृणाल गोरे यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट रोहिणी गवाणकर यांनी मांडला आहे. चरित्रकार स्वत: मृणाल गोरे यांची लहानपणापासूनची मैत्रीण असल्यामुळे मृणाल गोरे यांच्या जीवनातील बारीक तपशीलही खुबीने मांडले आहेत. ‘मोहिले कुटुंबातील बालपण’ ‘राष्ट्रसेवा दलातील दिवस’, ‘बंडू गोरे यांच्यासोबतचा दहा वर्षाचा संसार’, ‘महिलांसोबत काम’, ‘झोपडपट्टीवासीयांसाठी पिण्याचे पाणी आणि निवारा यासाठीच्या लढाया’, ‘महत्त्वाची आंदोलने’, ‘आणीबाणी विरोधात प्रचार’, ‘समाजवादी चळवळीतील सहभाग’ इत्यादी १२ प्रकरणे प्रस्तुत पुस्तकात असून त्यामधून वाचकाला मृणाल गोरे यांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा अंदाज येतो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्यासमोर पुस्तक वाचताना हळूहळू उलगडत जातात. मृणाल गोरे म्हणजे मूर्तिमंत त्यागाचं उदाहरण होत्या. संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी त्यागच मोठया प्रमाणावर केला. स्वत:च्या स्वार्थाचा कधीच विचार केला नाही. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा मोठया प्रमाणावर पगडा त्यांच्या मनावर होता.
एमबीबीएस करून लोकांची सेवा करावी, असा विचार करून त्यांनी एमबीबीएसला प्रवेश घेतला, एक वर्ष ‘सेवादला’चे कार्यक्रम, घरातील कामे आणि अभ्यास इ. सांभाळून चांगल्या गुणांनी पास झाल्या. परंतु नंतर त्यांच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. लोकांचीच सेवा करायची असेल तर डॉक्टर न होताही लोकांसाठी रस्त्यावर उतरूनही करता येते. त्यामुळे एमबीबीएसचे शिक्षण त्यांनी अर्धवट सोडले. आणीबाणीनंतर निवडून आलेल्या जनता पार्टी सरकारमध्ये मोरारजी देसाई यांनी मृणाल ताईंना कॅबिनेट मंत्रीपद देऊ केले होते, परंतु त्यांनी ते नम्रपणे नाकारले. कारण त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे होते. त्यासाठी त्यांना लोकांमध्येच राहणे आवश्यक होते. तसेच पार्टीची मुळे विभागामध्ये घट्ट करायची होती. त्यामुळे दिल्लीला जाऊन मंत्री बनण्याची संधी त्यांनी नम्रपणे नाकारली. महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी स्त्री अत्याचारविरोधात प्रत्येक वेळी आवाज उठवला. काही वेळा तर प्रस्थापित प्रथेविरोधातही त्यांनी दोन हात केले. राजस्थानातील रूपकंवर सती प्रकरण, शाहबानो प्रकरण इत्यादी समाजविघातक प्रथेविरोधात त्यांनी महिलांना मोठया प्रमाणावर एकत्र करून आवाज उठवला. ठिकठिकाणी निदर्शने केली. समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला.
अलीकडे आपण सर्वत्र पाहतो की, राजकीय फायद्यासाठी सर्व पक्षांमधील व्यक्ती कोणत्याही तडजोडी करतात. त्यांना तत्त्वे वगैरे काहीच नसतात. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जातात. परंतु मृणालताईंनी जीवनाच्या अंतापर्यंत समाजवादी तत्त्वे जपली. त्यासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यासाठी काही वेळा त्यांना स्वपक्षातील व्यक्तींचा रोष पत्करावा लागला. या सर्व गोष्टींचे सखोल वर्णन प्रस्तुत पुस्तकात वाचावयास मिळते.
मृणालताई प्रामुख्याने ओळखल्या जातात त्या ‘पाणीवाली बाई’ म्हणून. सर्वाना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून त्यांना ब-याच वेळा स्त्रियांचे मोर्चे काढावे लागले. हे मोर्चे अभूतपूर्व असेच असत. महागाई विरोधातील त्यांच्या नेतृत्वाखाली काढलेले मोर्चे त्याचे महत्त्व अजूनही त्यांचे कट्टर विरोधक मान्य करतात. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंतचा प्रवास लेखिकेने या पुस्तकात विस्तृत स्वरूपात मांडला आहे. स्त्रियांवर होणारा अन्याय आणि अत्याचारविरोधात गोरे यांनी नेहमीच आवाज उठवला. राजकारणात स्त्रियांना आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले, परंतु त्यांच्याच पक्षातील लोकांना ते पटत नव्हते. अशा वेळी त्या पक्षामध्ये एकाकी पडत असत. राजकारणात तत्त्वांना महत्त्व नसते. लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मुंबईमधून त्यांचा पराभव झाला, तेव्हा यांचा प्रत्यय त्यांना आला. त्या पराभवाचे त्यांना खूपच वाईट वाटले. ज्या जनतेसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले, सातत्याने परिसरातील कामांनाच प्राधान्य दिले त्याच जनतेने हिंदुत्ववाद्यांना साथ दिली, याची सल त्यांच्या मनात सतत राहिली. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. या सर्व गोष्टींचे विस्तृत विवेचन या पुस्तकात वाचावयास मिळते. गरिबांसाठी त्यांनी स्वस्त किमतीमध्ये घरे बांधून शासनासमोर आणि संपूर्ण देशासमोर नवा आदर्श निर्माण केला. ‘सिमेंट घोटाळा’ ‘एन्रॉन प्रकल्प’ या विरोधात त्यांनी आवाज उठवला. शासनातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. इथपासून ते त्यांनी भारताच्या कानाकोप-यात केलेली वेगवेगळी आंदोलने इथपर्यंत सर्व माहिती या पुस्तकातून समजते.
मृणाल गोरे यांचा पिंड सामाजिक कार्यकत्याचा होता. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना त्या आपल्याशा वाटत असत. तळागाळातील लोकांशी त्यांचा थेट संपर्क होता. या पुस्तकामध्ये राष्ट्रसेवादलातील शाखांवरील मुले आणि कार्यकर्ते यांच्याशी मृणालताईंशी असलेले नाते याचा उल्लेख सापडत नाही. वस्तुत: शाखेवरील मुले आणि सर्वच सेवादलाचे कार्यकर्ते मृणालताईंशी गप्पा मारायला नेहमीच उत्सुक असत. त्यांचे विचार ऐकताना मन भारावून जात असे. कधीकधी त्या मुलांशी गप्पा मारण्यात एवढया समरस होऊन जात की, वेळेचे भानच उरत नसे. त्यामुळे प्रत्येकाला त्या आपल्या वाटत होत्या. म्हणूनच ज्या वेळी त्यांचे निधन झाले त्या वेळी पक्षातील लोकांप्रमाणेच सेवादलातील प्रत्येक कार्यकर्त्यांलाही अश्रू अनावर झाले होते.
हा भाग वगळता मृणालताईंशी संबंधित सर्व गोष्टींचे विवेचन या पुस्तकात आले आहे. समता शिक्षक संस्थेचे सचिव कमलाकर सुभेदार, हे देखील मृणालताईंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेले समाजवादी साथी, त्यांनी हे पुस्तक इंग्रजीमध्ये खास अमराठी लोकांसाठी प्रकाशित केले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे खास आभार मानायला हवेत.
डॉ. रोहिणी गवाणकर
समता शिक्षण संस्था
पानं : २५०, किंमत : ३०० रुपये