महाराष्ट्र राज्य लोककल्याणकारी राज्य बनविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सदस्य व्हा, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी सोमवारी केले.
कणकवली- जिवंत मनाचे कार्यकर्ते ज्या पक्षात असतात तो पक्ष विजयासाठीच जन्माला आलेला असतो. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता हा समाज, राज्य, देश घडविणारा आहे. अनुभवी आणि तरबेज असलेला तोलामोलाचा कार्यकर्ता माझ्या स्वाभिमान पक्षात आहे. हुशार, जिद्दी, मेहनती आणि गुणात्मक कार्यकर्ते माझी ताकद आहे आणि ती महाराष्ट्राला ज्ञात आहे. महाराष्ट्र राज्य लोककल्याणकारी राज्य बनविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सदस्य व्हा, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी सोमवारी केले.
ओरोस मुख्यालय येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सदस्य नोंदणी शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सौ. नीलमताई राणे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, अशोक सावंत, प्रमोद कामत, प्रकाश राणे, बाळा खडपे, विकास कुडाळकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नासिर काझी, गोट्या सावंत, मनीष दळवी, मंदार केणी, समीर नलावडे, विनायक राणे, संजू परब, सुरेश सावंत, विशाल परब, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सूदन बांदिवडेकर यांसह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा सभासद होणे हा एक आगळावेगळा आनंद आहे. महाराष्ट्रात स्वाभिमान पक्षाच्या ओळखपत्राला महत्व आहे. नारायण राणेंचा पक्ष म्हणून कार्यकर्त्यांला महत्व आहे.
त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याला कारण मी राज्यात जे नाव केले आहे ते नारायण राणेंचे नाव नाही तर सामाजिक कार्याचे नाव आहे, विधायक कार्याचे नाव आहे, लोकहिताचे नाव आहे, जनसेवेचे नाव आहे, अन्यायाविरुद्ध धावून जाणा-यांचे नाव आहे. म्हणूनच महाराष्ट्र जो ओळखतो तो काम करणारा माणूस म्हणून मला ओळखतो. माझ्यासुद्धा नावाकडे जाऊ नका, तर महाराष्ट्रात माझ्या संपूर्ण कारकिर्दीत जे काम केले त्या कामाचे स्वरूप पाहा. कार्यकर्त्यांने कामाने आणि कार्याने मोठे व्हावे. मेहनत आणि परिश्रमाने मोठे व्हावे. त्याला निष्ठा आणि प्रामाणिकपणाची जोड द्या. तुम्ही नक्कीच प्रगती कराल, यशस्वी बनाल. पदासाठी नको तर लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांना हक्क देण्यासाठी पक्षात या. असे काम तुम्ही करत राहिलात तर निश्चितच पक्ष तुमच्याकडे सन्मानपूर्वक पाहील आणि तुम्ही पदाचे मानकरी व्हाल असा विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
स्वाभिमान पक्ष हा जिल्हय़ाचे राजकारण करण्यासाठीचा पक्ष नाही. महाराष्ट्र आणि देशपातळीवर काम करणारा पक्ष आहे. महाराष्ट्रात मी मंत्री, मुख्यमंत्री अशा पदावर काम केल्यामुळे महाराष्ट्रातील अनुभव माझ्याकडे होता. तेव्हा मला मी फार काही मिळविल्यासारखे मला वाटत होते. मात्र गेल्या आठवडय़ात मी दिल्लीचे अधिवेशन पूर्ण करून परत आलो तेव्हा मी एक महिना दिल्लीत मंत्रालयात काम पाहिले. लोकसभा आणि राज्यसभेत चालणारे काम पाहिले, तेव्हा आपला देश किती महान, किती मोठा आहे, याची कल्पना राज्यसभेत बसल्यानंतर आली. त्या ठिकाणचे देशपातळीवरचे प्रश्न पाहिल्यानंतर आणि त्या कामकाजात भाग घेतल्यानंतर कामाची, कार्याची व्याप्ती गुणात्मकरीत्या किती वाढली हे मला अनुभवायला मिळाले. याचा आनंद मला मिळालाच, त्याचबरोबर बरेच काही शिकता आले. अजूनही माझ्याकडे सहा वर्षे आहेत. खासदार म्हणून काम करताना देशात निश्चितच सिंधुदुर्ग आणि कोकणचा ठसा उमटवेन असा विश्वास यावेळी खा.नारायण राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
आ. नितेश राणे यांच्या गुणात्मक कार्याचे कौतुक
आ. नितेश राणे यांच्या गुणात्मक कार्याचे कौतुक करताना नारायण राणे म्हणाले, आ. नितेश राणे हे विधानसभेत गेल्यानंतर नारायण राणेंचे सुपुत्र म्हणून गेले नाहीत. कणकवली-देवगड-वैभववाडीच्या लोकांनी त्यांना आमदार म्हणून पाठविले. त्यांचे प्रतिनिधी म्हणून गेले. आज ते करत असलेले काम पाहिल्यानंतर कोण म्हणू शकतो की हे आमदार नुसता नामधारी आहे? महाराष्ट्राच्या आमदारांमध्ये उजवा आमदार, धडाधडीने काम करणारा आमदार, आक्रमकरित्या प्रश्न मांडणारा आमदार कोण म्हणून तुम्ही विचाराल तर राज्यभरातून आ. नितेश राणे यांचेच नाव घेतले जाते. असेच काम करणारे अनेक कार्यकर्ते आपले आहेत. काही तालुका अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, काही सभासदही चांगले काम करतात आणि म्हणून महाराष्ट्रातले अनेक नेते म्हणतात, की सिंधुदुर्गातील नारायण राणेंचे कार्यकर्ते फार उत्साही आहेत, ताकदवान आहेत. मी म्हणतो होय हीच माझी ताकद आहे. तुमच्याच ताकदीवर मी महाराष्ट्राचे राजकारण करतो आहे. गुणात्मक असलेले स्त्री-पुरुष कार्यकर्ते हीच माझी ताकद आहे, म्हणून मी निर्भीड आहे, आक्रमक आहे, असे खा. नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांची नोंदणी करून प्रारंभ
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांचा अर्ज भरून केला. त्यानंतर सौ. निलमताई राणे यांनी अर्ज भरला. जिल्हाध्यक्ष सामंत यांनी त्यांना सभासद कार्ड दिले. यानंतर अस्मिता बांदेकर, सुमेधा पाताडे, वंदना किनळेकर, रुक्मिणी कांदळगावकर, अशोक सावंत हे सभासद झाले. ५ रुपये शुल्क घेऊन सभासद नोंदणी करण्यात येत आहे.
पहिल्या वर्धापनदिनापूर्वी पाच लाख सभासद करणार – दत्ता सामंत
सभासद नोंदणी कार्यक्रमाला बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी, नारायण राणे यांचे कॅपिटल म्हणजे त्यांचा ‘चांगला कार्यकर्ता’ आहे. जिल्हय़ात सध्या ७० टक्के ग्राम पंचायतीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा आहे. जिल्ह्यात ९१३ बुथ आहेत. या प्रत्येक बुथवरील पदाधिकारी यांनी पाच-पाच सभासद केल्यास एका दिवसात एक लाख सभासद होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. तेवढी ताकद आमच्या कार्यकर्त्यांत आहे. मात्र, आपल्याला एवढय़ावर थांबायचे नाही. २ ऑक्टोबर २०१८ या पहिल्या वर्धापनदिनी आपल्याला पाच लाख सभासद करावयाचे आहेत. त्यानंतर या जिल्ह्यातील तीनही आमदार व खासदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निवडून येतील, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, असे सांगितले.
माणगाव हुमरस येथील शिवसैनिकांचा प्रवेश
माणगाव हुमरस येथील शिवसैनिक शेखर देऊलकर, समीर सावंत, स्वप्नील कुडकर, अनिकेत सावंत, विनोद कांबळी, सीताराम तेली, संतोष पाटकर, दिलीप हुमरोसकर, अष्टविनायक वारंग, अरुण मेस्त्री यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी पक्षाचा झेंडा देवून त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्ष प्रवेशासाठी रूपेश कानडे, पं. स. सदस्या स्वप्ना वारंग, सोनू मेस्त्री, प्रवीण वारंग यांनी प्रयत्न केला.