ज्याप्रमाणे जीवनात यशवंत होण्यासाठी निर्भयता आवश्यक असते, त्याप्रमाणे अभ्यासामध्ये यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवावा लागतो. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या असल्या तरी खरी परीक्षा ही दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची असते. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांला उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास स्वत:च वाढवावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च प्रत्येक विषयाचे आकलन करणे आवश्यक आहे. जो विद्यार्थी विषयाचे आकलन करतो त्याचा आत्मविश्वास वाढतो. तेव्हा जीवनात यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास करणे ही यशाची गुरुकिली आहे.
दहावी परीक्षेच्या निकालाचा मागील पाच वर्षाचा आढावा घेतल्यास काही विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. याचा अर्थ वर्षभर अभ्यास मनापासून केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. हे यशवंत विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून अभ्यास केल्यास गुणांची टक्केवारी वाढू शकते. तेव्हा प्रत्येक विषयाची आवड निर्माण करून मनमोकळेपणाने अभ्यास करावा लागेल. मात्र हल्ली टीव्ही सोडून मोबाईलच्या अधिक प्रेमात विद्यार्थी असल्याचे दिसतात. याचा परिणाम काही विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळूणसुद्धा बारावीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा कमी गुणांवर समाधान मानावे लागले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे मोबाईलच्या अति वापरामुळे झालेला हा परिणाम आहे. यामुळे पालकांचे आíथक नुकसान होतेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे करिअरसुद्धा खुंटते. यासाठी कर्तव्यदक्ष विद्यार्थ्यांनी मोबाईल व्यसनापासून दूर राहणे स्वत:च्या करिअरसाठी जास्त हिताचे आहे.
सध्या मोबाईल हा घटक विद्यार्थ्यांच्या जीवनातील मूलभूत घटक बनला आहे. मात्र त्याचा अतिवापर टाळावा. ज्यांनी योग्य वापर केला त्या विद्यार्थ्यांना योग्य फळ मिळाले आहे. इंग्रजी व गणित विषयांमध्ये सर्रास विद्यार्थी नापास होतात. मात्र, सध्या अभ्यासक्रमात बदल केल्याने हे चित्र बदलले आहे. तरी जीवनात हे दोन्ही विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. गावाच्या बाहेर अथवा चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी हे विषय अत्यंत आवश्यक आहेत. आणि यांच्या जोडीला वाचन असायला हव. तसेच गाईडपेक्षा शालेय पुस्तकांवर अधिक लक्ष द्यायला पाहिजे. एकदा धडा समजला की त्यावरती कसाही प्रश्न येऊ दे? आपण तयार आहोत! असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायल हवा. त्यासाठी पुस्तकातील धडय़ांचे वाचन करीत असताना त्याचा आशय समजून घेणे गरजेचे आहे. आज मोबईलपायी वाचन संस्कृती बंद पडत चालली आहे. तेव्हा शालेय जीवनामध्ये मोबाईलला चार हात दूर ठेवणे जास्त हिताचे ठरेल. यातून मुलांना योग्य दिशा देण्यासाठी मोबाईलच्या वापरावर निर्बंध आई-वडिलांनी घालावा किंवा स्वत:हून विद्यार्थ्यांनी सुधारणा करून आपल्या जीवनाला नवी गती दिली पाहिजे. यातच विद्यार्थ्यांचे हित अवलंबून असते.
ज्या विद्यार्थ्यांना मागील वार्षिक परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले असतील त्यांनी आपण वर्षभरामध्ये काय केले? आपला दिनक्रम काय होता? आई-वडिलांनी आपल्यावर किती विश्वास ठेवला? वर्षभरात आपल्यावर आई-वडिलांनी किती रुपये खर्च केले? आणि आपल्याला किती टक्के गुण मिळाले याचे आत्मपरीक्षण विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. दुदैवाने तसे होताना दिसत नाही. आपले मूल आत्महत्या करणार तर नाही ना? कदाचित घर सोडून गेले तर? अशा कारणांमुळे आई-वडील अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात.
अशा वेळी आपल्या मुलांना चांगले गुण मिळावेत यासाठी शाळेतील शिकवणीबरोबर खासगी शिकवणीला पालक प्राधान्य देतात. काही वेळा विद्यार्थी शाळेत जातच नाहीत किंवा वर्षभर खासगी शिकवणीला जातात. सध्या खासगी क्लासवाले वारेमाफ फी घेतात. यामुळे अनेक गरप्रकार होण्याला मदत झाली. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी या वर्षापासून बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचे धोरण शासनाचे आहे. जेणेकरून पैशांची उधळण थांबण्याला मदत होईल. खासगी क्लासमुळे गृहपाठाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते.
आता शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत. तेव्हा सुट्टीतील गंमती जंमती बाजूला करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित अभ्यास केला पाहिजे. काही वेळा आपली स्तुती इतरांनी करावी, असे वाटत असते; परंतु ब-याचवेळा एखादे यश संपादन करूनसुद्धा कोणीही आपली स्तुती करताना दिसत नाही. अशा वेळी स्वत:चे कौतुक स्वत: करायला हवे. रोज हसरा चेहरा ठेवायला हवा. स्वत:च्या चेह-यावरती तेज दिसले पाहिजे. त्यासाठी चांगल्या मित्रांची संगत करायला हवी. स्वत:चे काम स्वत: करायला हवे. स्वत:ला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा लागेल.