ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ३ जून रोजी मतदान होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी ३ जून रोजी मतदान होणार आहे. मात्र अजूनही कुठल्याही पक्षाने अधिकृतपणे आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शिवाय मतांची आकडेवारी पाहता सेनेचे पारडे जरी जड वाटत असले, तरीही आतापर्यंतचा इतिहास पाहता यंदा काय होणार? याकडे ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा होणारी ही निवडणूक किती वर्षासाठी असेल, हे अजूनही नेमके अधिकृतपणे कुणी स्पष्ट केलेले नाही. ही निवडणूक ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणार असली, तरीही त्यात पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांनाही मतदानाचा अधिकार असणार आहे. या भागात जितक्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांच्या सर्व सदस्यांना यात मतदानाचा अधिकार असणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या मतांवर यंदा मोठी भिस्त असणार आहे.
शिवाय बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यातून विस्तवही जात नाही, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून एकूण १ हजार ५० मतदार आहेत. मात्र त्यापैकी १९ जागा रिक्त असल्याने १ हजार ३१ मतदारच मतदान करू शकणार आहेत. यात शिवसेनेचे सर्वाधिक ३११ सदस्य असून भाजपाचे १८० सदस्य आहेत.
राष्ट्रवादीचे १९९, तर काँग्रेसचे १०३ सदस्य आहेत. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे ११९ सदस्य आहेत. तर मनसेचे २०, आरपीआयचे ८, अपक्ष ४८, बसपाचे ५, समाजवादी पक्षाचे १७, एमआयएमचा १, कोणार्क विकास आघाडीचे ७, सेक्युलर अलायन्स ऑफ इंडियाचे ८, कम्युनिस्ट पार्टीचे ४, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा १ सदस्य आहे. १९ जागा रिक्त आहेत. असे हे १०५० मतदार असून त्यांच्यापैकी किती जण मतदान करतात हे महत्त्वाचे आहे. शिवाय बहुजन विकास आघाडीसह मनसे, अपक्ष, समाजवादी, कोणार्क विकास आघाडी यांचे मतदान कुणाच्या पारडयात पडते, यावरही अनेक गणिते अवलंबून असणार आहेत.
सध्या या आकडेवारीनुसार शिवसेना आणि भाजपाच्या मतांची बेरीज ४९१ इतकी होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज ३०२ इतकी होते. त्यांना बहुजन विकास आघाडीची साथ मिळाल्यास त्यांचे संख्याबळ ४२१ वर जाते. मात्र तरीही शिवसेना-भाजपाचा आकडा मोठा आहे.
अपक्ष मतदार यात महत्त्वाची भूमिका बजावणार असले, तरी ते विखुरलेले असल्याने त्यांची एकगठ्ठा मते कुणा एकाला मिळतील, अशी शक्यता नाही. त्यांच्याशिवाय उर्वरित सगळ्या पक्षाच्या सदस्यांची बेरीज केल्यास ७१ मतदार होतात. मात्र ते सगळेच एकाच ठिकाणी वळणार नाहीत. त्यांचेही विभाजन होणारच आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता सेनेचे पारडे जड वाटत असले, तरी शेवटच्या क्षणी कुणाचे ‘डाव’ खरे होतात, याचा अंदाज आताच बांधणे कठीण आहे.
या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करणार, हे जवळपास पक्के आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा मेळावा घेऊन त्यात त्यांनी विधान परिषदेत काय करावे, याबद्दलची मते जाणून घेतली.
अशाप्रकारे मते जाणून घेण्याची कार्यकर्त्यांची ही पहिलीच वेळ होती. आतापर्यंत केवळ आदेश आले की त्याचे पालन करणे, इतकेच कार्यकर्त्यांना ठाऊक होते. मात्र नारायण राणे यांनी ठाणे जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारताच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली. त्यामुळेच अनेक जणांनी मनमोकळेपणाने नारायण राणे यांच्यासमोर आपली मते व्यक्त केली. यात पक्षाने काँग्रेसच्या हिताची भूमिका घ्यावी, अशी भूमिका अनेकांनी मांडली.
राष्ट्रवादीबद्दल अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असली, तरी डावखरे यांच्याबद्दल मात्र सर्वानीच चांगले मत व्यक्त केले. त्यामुळे याबाबत आता राज्यपातळीवर निर्णय घेण्यात येऊन तो लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यात डावखरेंना मदत करण्याचीच भूमिका असावी, अशी सर्वाचीच इच्छा आहे.
१० मे रोजी या निवडणुकीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध होणार आहे. यानंतर १७ मेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार असून १८ मे रोजी अर्जाची छाननी होईल, तसेच २० मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. यानंतर ३ जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि ६ जून रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे पुन्हा एकदा विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती वसंत डावखरे यांना संधी दिली जाईल, हे जवळपास स्पष्ट आहे.
डावखरे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे ते निवडून येण्यासाठी सर्व प्रकारची ताकद लावतील, यात वाद नाही. शिवाय त्यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांपासून तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले चांगले संबंध हे त्यांच्या पथ्यावर पडत आले आहे. तर शिवसेनेतर्फे अनेक जणांनी उमेदवारीसाठी रांगा लावल्या असल्या, तरीही उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कदाचित अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ते स्पष्ट होणारही नाही.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. चौधरी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना जोर लावेल, हेदेखील स्पष्ट आहे. शिवाय कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवींद्र फाटक, नरेश म्हस्के हे देखील इच्छुक आहेत. या सगळ्यांत सध्याची आकडेवारी पाहता काय होईल, हे सांगता येणे खरोखरच कठीण आहे.
अर्थात जर सरळ साधी गणिते बांधली, तर शिवसेनेचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त आहे, मात्र आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये डावखरे कसे निवडून आले हे पाहिले, तर मात्र यावेळीही डावखरेच जिंकतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
डावखरे यांना निवडून येण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीची मते त्यांच्या पाठीशी असली, तरी ती पुरेशी नक्कीच नाहीत.
आतापर्यंत त्यांना शिवसेनाच छुप्या पद्धतीने मदत करत होती. मात्र यंदा तसे होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे यंदा भाजपा ही भूमिका बजावेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण आतापर्यंत भाजपाला कायम गृहीतच धरण्यात आले होते. मात्र यंदा राज्यात त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकांमध्येही हे दोन पक्ष एकत्र लढण्याची सध्या तरी शक्यता नाही. अर्थात वेगळे लढून जास्त जागा खेचणे ही त्यांची रणनीती असली, तरी सध्या विधान परिषदेला काय होईल? हे सांगता येणे खरोखरच कठीण आहे.
डावखरे यांचे ‘डाव’ यंदा ‘खरे’ होतात का? की एकनाथ शिंदे हे सुनील चौधरींना निवडून आणण्यासाठी आपले ‘कौशल्य’ पणाला लावतात? हे आता अवघ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तरी राज्यभरातल्या राजकीय निरीक्षकांची नजर ठाण्याच्या या निवडणुकीवर असणार आहे. यात ‘आकडे’ यशस्वी होतात? की ‘डिप्लोमसी’ यशस्वी होते? याचीच सध्यातरी सर्वाना उत्सुकता लागून राहिली आहे.