अर्ली प्युबर्टी आणि चाइल्डहूड सेक्स हे आतापर्यंत परदेशातल्या पालकांच्या चिंतेचे मुद्दे होते. मात्र आता इतर अनेक घटकांप्रमाणे आपल्या पालकांच्या वाटय़ालाही हे भोग येणं अपरिहार्य आहे. नवव्या-दहाव्या वर्षी मुली ऋतुमती होणं आणि मुलांना मिसरुड फुटणंही सार्वत्रिक होत चाललंय. मात्र, लैंगिकतेचा प्रौढ चाळा या लहान मुलांपर्यंत पोहोचणं समाजाच्या आरोग्याला हितावह नाही.
इयत्ता पाचवीचा वर्ग. छोटय़ा मधल्या सुट्टीचा वेळ. सगळी लहानगीशी बाळं आपला टिफिन खातायत. तेवढय़ात सम्यक वेदिकाजवळ जातो. आणि जोराने आयलाव्यू!!! असं ओरडतो. पाठीमागून सूरज, हर्ष आणि भावेश जोरात टाळय़ा वाजवून जल्लोष करतात. वेदिका कानकोंडी झालीय. तिच्या डोळ्यांत रडू येतं. पण तिच्या बाकावरची श्रेया मात्र हसत राहते.
हे ‘व्हॅलेंटाइन्स डे’चे गंभीर साइड इफेक्ट्स. प्रेमाचा प्रत्यक्षातला पोरखेळ.
‘व्हॅलेंटाइन्स डे’चं सूप वाजलं असलं तरी कवित्व पुढचे काही दिवस रंगलेलं राहतं. समस्त मीडिया गुलाबी रंगाने न्हाऊन निघालेला असतो. प्रेमभावनेचा हा गाजावाजा एकूणच समाजासाठी आणि बाजारपेठेसाठी कितीही आवश्यक असला तरी त्याचे इतर अनेक पडसाद समाजातल्या विविध अंगांवर पडलेले असतात. त्यातला सर्वात गंभीर परिणाम असतो तो कुमारवयीन मुलांवर. खरं तर रूढार्थाने ते वयातही आलेले नसतात. पण प्रेमऋतूचं हे अवडंबर त्यांच्यासाठी अधिकच एक्स्पोजर ठरतं. काही कळण्याच्या वयाआधीच त्यांच्यावर प्रेमभावनेचे हे संस्कार होतायत, ते अर्थात फार नैसर्गिक नाहीत.
किशोरवयातील रोमँटिक कल्पनांबद्दल लिहिलं-बोललं जातं. पण कुमारवयातील बालसुलभ मनांवर हा रोमान्स परिस्थितीवश लादला जातोय आणि त्याबाबतीत आपण काहीच करू शकत नाही. पूर्वी ‘जोडय़ा जुळवा’ नावाची सामाजिक प्रश्नपत्रिका वाडीवस्तीमध्ये आवर्जून सोडवली जायची. त्यात उपवर तरुण-तरुणींच्या जोडय़ांबरोबर लहान मुलांच्या जोडय़ाही गमतीला लावल्या जायच्या. या चिडवाचिडवीमधून लहानपणीच नाहक प्रेमभावनेची रुजवात व्हायची. मामाच्या मुलीवरून चिडवणं, हे अजूनही ब-याच घरांमध्ये चालतं. त्यामुळे कुमारवयात या नात्यामध्ये नाहक अढी निर्माण होते. ते नातं नैसर्गिक राहत नाही. अनेक सोसायटय़ांमध्ये डान्स नंबर बसवताना लहान मुला-मुलींच्या जोडय़ा लावल्या जातात आणि मग काही काळ त्या लहानग्यांना चिडवाचिडवीला सामोरं जावं लागतं. पण आता या चिडवाचिडवीला नेहमीच्या घुश्शाच्या शैलीत या मुलांकडून प्रतिसाद मिळत नाहीत. ही मुलं लाजतात किंवा बोल्ड होतात. विशेषत: मुली. वस्तीतल्या सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीच्या किंवा गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘पल्लू के नीचे छिपाए रख्खा है’ या गाण्यावर आविर्भाव करत नाचणा-या आठ-दहा वर्षाच्या मुलीचं कौतुक करणारी आसपासचीच माणसं अधिक संख्येने असतात. या टाळ्या वाजवणा-यांपैकीच कुणीतरी त्यातून आपल्या विकृत मानसिकतेची जुळवाजुळव करत असतो. मात्र, एकदम घटना घडल्यावर आपल्याला जाग येते.
दुसरा प्रकार फिशपाँड्सचा. अनेक ठिकाणी हा प्रकार आता बंद झालाय. मात्र कुणाला तरी बकरा बनवून बाकीच्यांनी हसायचं हे विनोदाचं विकृत साधन आजही लोकप्रिय आहे. फिशपाँड्स त्यापैकीच एक. या फिशपाँडच्या माध्यमातून अनेकदा या लहानग्यांच्या मनात अकाली प्रेमभावनेचं बीजही रुजवलं जातं.
पूर्वी दाट वस्तीतल्या चाळीतल्या मानवी जगात हे सगळं एका मर्यादेत खपून जात होतं. जिन्यातल्या चोरटय़ा पहिल्या-वहिल्या स्पर्शाना कथा-कादंब-यांमधूनही प्रतिष्ठा मिळाली. पण आता चाळी रिडेव्हलप होत असताना बंदिस्त ब्लॉक पद्धतीत चोरटे एकांत अधिक प्रमाणात निर्माण झाले आहेत. आई-वडील दोघेही कामावर जात असल्याने आजी-आजोबा नसलेल्या घरांमध्ये खुला एकांत कुमारवयीन मुलांना उपलब्ध झाला आहे. मग भातुकलीचा खेळ ‘डॉक्टर-डॉक्टर’मध्ये आणि मग आणखी पुढे कसा रूपांतरित होतो ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. कॉलनी किंवा शाळांमध्ये या कुमारवयात केवळ जोडय़ा नाहीत तर त्यांच्यातल्या लैंगिकतेनेही गंभीर स्वरूप धारण केलं आहे. त्यातल्या विस्तृत गोष्टी धक्कादायक आहेत. अनेक शाळांमधल्या समुपदेशकांपर्यंत येणा-या समस्या हे गांभीर्य ओरडून सांगतायत. पण आपण अजूनही डोळ्यांवर कातडं पांघरून बसलेलो आहोत. दिल्लीतल्या बलात्काराच्या घटनेनंतर लहान वयातल्या मुलींच्या मोलेस्टेशनच्या कहाण्यांबाबत माध्यमं संवेदनशील झालेली आहेत. मात्र, त्याच वेळी या कुमारवयातच त्यांच्यात निर्माण झालेल्या अर्धनैसर्गिक भावनांचा परामर्श मात्र कुणीच घ्यायला तयार नाहीत.
लैंगिक भावनांचा माध्यमांद्वारे होणारा अतिमारा हे एक गंभीर कारण आहे हे माध्यमंही समजून घेत नाहीत. मात्र समाजशास्त्राचे अभ्यासक याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. लैंगिक भावनांचा अतिमारा हे एकमेव कारण ते मानायला तयार नाहीत. विभक्त कुटुंबपद्धतीत मुलांच्या खाण्यापिण्याकडे दिलं गेलेलं अधिक लक्ष आणि विविध खाद्यपदार्थामधून आणि औषधांमधून मुलांना मिळणारे संप्रेरकांचे डोस हेही त्यांच्या लवकर वयात येण्याचं कारण मानलं जात आहे. एक प्राणीतज्ज्ञ सांगत होते की, शहरांमध्ये भटकी कुत्री-मांजरंही लवकर वयात येतात. कारण कचराकुंडीवर उष्टय़ा-खरकटय़ामुळे खाण्याची वानवा नसते. पण हा निकष मान्य केला तर शरीर लवकर विकसित व्हायला सुरुवात होणं आणि त्याच वेळी विविध माध्यमांतून लैंगिक भावनांचा मारा हे एकमेकांना पूरक ठरत आहे, यात शंका नाही. बातम्या, जाहिराती, सिनेमे यातून प्रत्यक्ष चित्रणातून होणारा लैंगिकतेच्या संस्काराचं ऑडिट आपण अजून केलेलं नाही.
मात्र एकूणच हा मुद्दा सेक्स एज्युकेशनशी जोडता कामा नये. मागे ‘बीपी’ सिनेमाच्या निमित्ताने तशी चर्चा झाली होती. प्रश्न मुलांच्या केवळ लैंगिक शिक्षणाचा नाही. अकाली आलेली पौगंडावस्था, सभोवतालचं लैंगिकतेला धार्जिणं वातावरण यातून मानसिकदृष्टय़ा रोमँटिक भावनांना आणि स्पर्शसंकेतांना तयार होण्याआधीच त्यांच्यापर्यंत लैंगिकतेचा स्पर्श जाऊन पोहोचतो. अशा वयात त्यांची धड लैंगिक शिक्षणासाठीही योग्य मानसिकता तयार झालेली नसते.
या सगळ्यासाठी माध्यमं, पालक, शिक्षक, समुपदेशक आणि या क्षेत्रात काम करणारी एखादी स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयाने जनजागृतीची मोहीम हाती घेणं आवश्यक आहे. मुलांना लैंगिकतेपासून प्रतिबंध करावा, अशी सनातन भूमिकाही नसावी. त्यामुळे उत्सुकतेपोटी मुलांकडून अधिक चुका होऊ शकतात. मात्र, त्यांचं निष्पाप, निरागस, जादुई भावविश्व या प्रेमलैंगिक भावनांपायी कलुषितही व्हायला नको, याचीही काळजी घेणं गरजेचं आहे.