शेतजमिनीचे आरोग्य खालावत असल्याने त्याचा अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. हा धोका ओळखून त्यावर वेळीच उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. संकरित वाणांचा अवाजवी वापर, पीक फेरपालटाचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर आणि पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष यांसारख्या समस्यांनी जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ते सुधारण्यासाठी शाश्वत शेतीचा अवलंब करणे गरजेचे बनले आहे. यामुळे भविष्यातील अन्नसुरक्षेलाच धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतक-यांनी सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे.
यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीला थोडा-फार पाऊस पडल्यानंतर आणि त्याच्या अनुषंगाने शेतक-यांनी भातबियाण्यांची पेरणी केली. मात्र, शेतक-यांनी आता जबाबदारीने शेतीकडे पाहायला हवे. आजच्या शेती पद्धतीमध्ये जास्त उत्पादन देणा-या वाणांचा वाढता वापर, पीक फेरपालटीचा अभाव, खतांचा असंतुलित वापर, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जमिनीचे आरोग्य खालावलेले दिसून येते.
जमिनीत वाढती सूक्ष्म तसेच दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले असून जमिनीचे गुणधर्म बिघडून तिची सुपीकता खालावलेली आहे. त्याचा गंभीर परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होऊन जमिनीचे आरोग्य खालावलेले आहे. शाश्वत पीक उत्पादनाच्या दृष्टीने हे सगळे घातक आहे.
कोकणातील भात पिकवणारे शेतकरी मागील ८-१० वर्षापासून संकरित आणि सुधारित भाताच्या जातीचा फार मोठय़ा प्रमाणात वापर करू लागले आहेत. या वर्षीसुद्धा शेतक-यांनी नेहमीप्रमाणे संकरित आणि सुधारित जातीच्या बियाण्यांची पेरणी केली. दुर्दैवाने पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि दुबार पेरणीचे संकट शेतक-यांपुढे उभे राहिले.
परंतु, शेतक-यांजवळ दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध नव्हते. कारण बियाण्यासाठी शेतकरी सर्वस्वी खरेदी विक्री संघ, कृषी विक्री केंद्र यावरच अवलंबून होता. पूर्वी शेतकरी जया, पाटणी, बेळा या जातीची लागवड करत असे. परंतु, कालांतराने ही बियाणे घेण्याचे बंद केले. अशा संकटांच्या वेळी जर अशा जातींचा वापर थोडाफार केला तर अशा संकटाच्या परिस्थितीत त्याच्याकडील बियाण्यांचा उपयोग होऊ शकतो.
त्याच्याजवळ स्वत:चे असे बियाणे नाही. त्यामुळे दुबार पेरणीसाठी त्याला पुन्हा बियाणे विकत घ्यावे लागले. परंतु, तेसुद्धा अपेक्षित जाती बियाणे मिळू शकले नाही. शेतक-यांनी स्वत:जवळील बियाणे जर जपून ठेवली तर अशा वेळी त्याचा वापर तो करू शकतो. ही बियाणी सुधारित बियाण्यापेक्षा कमी उत्पादन देत असली तरी ही सर्व बियाणी या स्थानिक वातावरणात तावूनसुलाखून निघालेली आहेत.
त्यामुळे अशा वातावरणात ती व्यवस्थित तग धरू शकतात. तसेच किडी आणि रोगांना बळी पडण्याचे प्रमाण पण कमी आहे. असे मुळीच नाही की, शेतकरी मित्रांनी फक्त स्थानिक जातींचा वापर करावा. असे न करता स्थानिक, सुधारित आणि संकरित जातींचा योग्य समन्वय राखून पेरणी करावी म्हणजे, अशा संकटाच्या वेळी त्याचे फार आर्थिक नुकसान होणार नाही.
दहा-पंधरा वर्षापूर्वी शेतक-यांकडे पशुधन फार मोठय़ा प्रमाणात असायचे. त्यांच्यापासून मिळणारे शेणखत, मलमूत्र यांचा वापर तो शेतात करायचा. या सेंद्रिय खतामुळे जमिनीमधील ‘ह्युमस’चे प्रमाण योग्य राहून जमिनीचे जैविक आणि भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीची पाणी धारणक्षमता, जमिनीचे तापमान, कणांची रचना या गुणधर्मामध्ये चांगला फरक पडायचा. परंतु, कालांतराने शेतक-यांकडील पशुधन कमी झाले. त्यामुळे आपोआपच सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा कमी झाला.
त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या जैविक आणि भौतिक गुणधर्मावर झाला. या वर्षी ज्या शेतक-यांनी भात रोपवाटिकेसाठी शेणखत, कोंबडीखत, गिरीपुष्पाचा पाला यांचा वापर केला, तेथील भातरोपवाटिका सुस्थितीत राहिली. त्यामुळे शेतक-यांची शेणखतांची उपलब्धता कमी झाली तरी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी भात रोपवाटिका तसेच चिखलणीच्या वेळी गिरिपुष्पाचा वापर करावा. ज्यामुळे फक्त जमिनीचे जैविक आणि भौतिक गुणधर्म न सुधारता भातपिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होते. कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग गेली पाच-सहा वर्षे भात पिकास गिरिपुष्पाचा वापर करावा, यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रात्यक्षिक घेत आहे.
त्याचा मुख्य परिणाम म्हणजे फार मोठय़ा प्रमाणावर शेतकरी मित्र या गिरिषुष्पाच्या पाल्याचा उपयोग भातपिकामध्ये घेत आहे. प्रयोगाअंती असे दिसून आले की, याचा उपयोग पुढच्या हंगामात घेण्यात येणा-या भुईमूग-सूर्यफूल या पिकांनासुद्धा होतो.
शेतक-यांनी या वर्षाच्या निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव लक्षात घेता शाश्वत शेतीचा विचार केला पाहिजे. ज्या शेतक-यांकडे २-३ एकर क्षेत्र आहे, त्यांनी फक्त भातपिकावर अवलंबून न राहता भाजीपाला, नाचणी, वरी, मूग, उडीद इत्यादी पिके घ्यावीत. तसेच एकाच जातीच्या वाणांवर अवलंबून न राहता एका पिकांच्या दोन-तीन तसेच स्थानिक वाणांचा वापर करावा. त्यामुळे एखाद्या पिकामुळे होणा-या नुकसानाची पातळी कमी करता येईल. या वर्षी शेतक-यांनी भाजीपाला चांगला केला आहे. सध्याची आपल्याकडील बाजारपेठ पाहता त्यांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळू शकतो.
आपल्याकडील पशुधनाची भविष्यातील चा-याची गरज भागवण्यासाठी जमिनीची उपलब्धता असेल तर त्यांनी चा-यांच्या पिकांची लागवड करावी. जेणेकरून चा-याची कमतरता भासणार नाही. उशिराच्या पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे भातपिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होईल. त्यासाठी शेतक-यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची योग्य प्रमाणात फवारणी करावी, म्हणजे नुकसानीची पातळी कमी करता येईल.
जमिनीची सुपीकता वाढवण्यासोबतच जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी जमिनीचे आरोग्य कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाश्वत शेती उत्पादन आणि जमिनीचे आरोग्य यामध्ये परस्परसंबंध असतो. पर्यायाने जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा करून शेतकरी मित्रांनी जुन्या पारंपरिक बाबींचा अवलंब करण्याबरोबर शास्त्रीय आणि व्यापारी दृष्टिकोन ठेवून सुधारित कृषी तंत्राचा अवलंब करावा. जेणेकरून जमिनीचे आरोग्य अबाधित राहून शाश्वत पीक उत्पादन घेता येईल.
(लेखक हे कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग येथे मृदशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)