या आठवडय़ात सर्वाचे लक्ष लागून राहिलेले होते ते अर्थसंकल्पाकडे. या सत्ताधारी सरकारचा हा आगामी सार्वत्रिक निवडणुकापूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता म्हणून देखील या अर्थसंकल्पाला महत्त्व प्राप्त झालेले होते.
त्यापूर्वी शेअर बाजाराच्या या आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात तेजीने झाली. त्यानंतर मात्र, मंगळवारच्या सत्रापासून शेअर बाजार दबावात राहिले. गुरुवारच्या दिवशी अर्थसंकल्प असल्यामुळे शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात हालचाल होणे अपेक्षित होते. गुरुवारच्या सत्रात शेअर बाजाराची सुरुवात मर्यादित तेजीने झाली. अर्थसंकल्प जाहीर होत असताना सुरुवातीच्या काही तासांत शेअर बाजाराच्या बाबतीत निर्णय जाहीर झालेले नव्हते.
अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, ग्रामीण क्षेत्र आणि पायाभूत सुविधा याबाबत मोठय़ा प्रमाणात तरतूद केली होती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात शेअर बाजार मर्यादित तेजीत होता. साधारण सकाळी ११.१५ च्या सुमारास शेअर बाजाराबाबत निर्णय जाहीर होण्यास सुरुवात झाली. शेअर बाजारात गेले काही दिवस शेअर्समध्ये दीर्घमुदतीसाठी केल्या जाणा-या गुंतवणुकीच्या व्यवहारांवर आता या अर्थसंकल्पात भांडवली लाभ कर लागू शकतो, अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता खरोखर सत्यात उतरली. गुंतवणूकदारांना नको असलेल्या शक्यतेवर या अर्थसंकल्पात शिक्कामोर्तब झाला आणि या अप्रिय घोषणेनंतर केवळ ३० मिनिटांत शेअर बाजारात मोठी घसरगुंडी झाली. या मोठय़ा घसरणीत दिवसाच्या उच्चांकापासून सेन्सेक्स ४५० अंकांनी, निफ्टी २४० अंकांनी तर बँकनिफ्टी जवळपास ५०० अंकांनी कोसळले.
या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेअर्समधील दीर्घमुदतीसाठी देखील कर लावत असताना, शेअर बाजारात दीर्घमुदतीसाठी मिळत असणारा नफा अर्थात परतावा हा अत्यंत आकर्षक असतो. त्यामुळे आता या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीतून मिळणा-या परताव्याला देखील कर कक्षेत आणण्याची गरज आहे असे सांगितले. त्यामुळे या अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयानुसार या पुढे शेअर्स अर्थात समभाग खरेदी केल्यानंतर त्या घेतलेल्या शेअर्सची १२ महिन्यानंतर जर विक्री केली आणि त्यातून होणारा नफा हा १ लाख रुपयांच्या पेक्षा जास्त असेल तर यापुढे झालेल्या नफ्यावर १० टक्के दराने कर आकाराला जाईल.
पूर्वीच्या कररचनेनुसार एखादा शेअर्स अर्थात समभाग खरेदी केल्यानंतर १२ महिने अर्थात १ वर्षानंतर त्या खरेदी केलेल्या शेअर्सची विक्री केली असता होणा-या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नव्हता. एक वर्षाच्या आत जर शेअर्सची विक्री केली तर मात्र होणा-या नफ्यावर १५ टक्के कर आकारला जात होता. आता दीर्घमुदतीसाठी १० टक्के कर लावताना १ वर्षाच्या आतील विक्रीवर पूर्वी लागत असलेला कर १५ टक्के हाच या अर्थसंकल्पात देखील कायम ठेवला. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.
या अर्थसंकल्पात सरकारी क्षेत्रातील तीन विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून त्यानंतर त्यांची शेअर बाजारात सूचीबद्धता करण्याचा प्रस्ताव देखील अर्थमंत्र्यानी या अर्थसंकल्पात मांडला. यामध्ये नॅशनल इन्शुरन्स, ओरिएण्टल इंडिया इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया अॅश्युरन्स या तीन सार्वजनिक साधारण विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पात शेअर बाजारासोबत म्युच्युअल फंडावरील मिळणारा लाभांश यावर देखील १० टक्के कर आकारण्यात आलेला आहे. आता थेट शेअर्ससोबत याला देखील कररचनेत घेतल्यामुळे यात येत असलेल्या पैशाचा ओघ काही प्रमाणात कमी होईल.
शेअर बाजार आणि त्यासंबधी क्षेत्राशी झालेल्या या बदलांच्या शिवाय अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाच्या बाबी पाहायच्या झाल्यास प्राप्तिकर कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. एकूण करावर ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य उपकर. नोकरदारांना आणि पेन्शनधारकांसाठी उत्पन्नातून ४० हजार रुपयांच्या प्रमाणित वजावटीला पुन्हा सुरुवात केली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तब्बल ४० टक्के कुटुंब आरोग्य विम्याच्या कक्षेत आणलेली आहेत. कृषी क्षेत्राबद्दल पाहायचे झाल्यास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव प्रस्ताव देण्यात आला. थेट पणन सुविधा प्राप्त झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक आणि टपाल ठेवींवरील करमुक्त व्याजउत्पन्नाची मर्यादा १० हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर, महिलांसाठी उज्ज्वला योजनेतून मोफत एलपीजी जोडणीचा विस्तार, नोकरदार महिलांना कर्मचारी भविष्य निधीतील स्वयोगदानात १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर घट, सूक्ष्म, लघु आणि मध्यमउद्योगात वार्षिक उलाढाल २५० कोटी रुपयांच्या खाली असल्यास कंपनी करात कपात करत हा कॉर्पोरेट कर २५ टक्के केला. पूर्वी तो ३० टक्के इतका होता.
पुढील आठवडय़ाचा विचार करता निर्देशांकाची दिशा आणि गती मंदीची असून निर्देशांक सेन्सेक्स ३३७०० आणि निफ्टीची १११७२ ही विक्रीची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या खाली आहेत, तोपर्यंत निर्देशांकातील मंदी कायम राहील. टेक्निकल अॅनालिसिसनुसार एमसीएक्स, विविमेड लॅब, बलरामपूर चिनी, संगम लिमिटेड यासह अनेक शेअर्सची दिशा मंदीची आहे. निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदवल्यानंतर या आठवडय़ात उच्चांकापासून मोठय़ा प्रमाणात नफा वसुली झालेली आहे.
लेखात पूर्वी सांगितल्याप्रमाणे सध्या निर्देशांक पी.ई. गुणोत्तर खूप जास्त आहे. त्यामुळे यापुढे गुंतवणूक करत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करणे आवश्यक आहे. पुढील काळात अल्पमुदतीचा विचार करता शेअर बाजारात आणखी मोठी घसरण होणे अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना भावनिकता बाजूला ठेवून गुंतवणूक करणे हे अत्यंत आवश्यक असते. मोठय़ा तेजीनंतर मंदी येणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. शेअर बाजार हा तेजीत असताना जिन्याने वर जात असतो, मात्र हाच शेअर बाजार खाली येताना मात्र लिफ्टने खाली येतो हे कायम लक्षात ठेवावे. त्यामुळे घसरणीच्या वेळी शेअर्सच्या किमतीत होणारी घट ही तेजीपेक्षा कायमच अधिक असते. त्यामुळे या पुढे आपली गुंतवणूक करीत असताना योग्य पैशाचे नियोजन करूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवीत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)