ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दु:खाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व ‘माझे, माझे’ असे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दु:ख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये.
नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत सोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुस-यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे. भुंकू मात्र नये. नेहमी लीनता ठेवावी. ‘मी’ साधना करतो हे विसरून जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वाशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सास-यांचा मान ठेवते ते नव-याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण ‘त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही?’ असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे ‘तुला तो रोग नाही’ असे उत्तर देतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून, ते ‘सांगतील’ तसे वागावे. ते ‘वागतात’ तसे वागू नये. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे. आपण गुरूने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या, म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता ‘पुढे काय आहे?’ हे विचारण्याने काय होणार?
संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात.
(सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो.)
ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज