देशभरात आज मुस्लीम बांधवांचा ईद सण साजरा करत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावातील संपूर्ण मुस्लीम नागरिकांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानसोबत लढताना सिल्लोड तालुक्यातील संदीप जाधव या जवानाला वीरमरण आले. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गावाने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नमाज देखील काळ्या फिती लावून अदा करण्यात आली.
औरंगाबाद– देशभरात आज मुस्लीम बांधवांचा ईद सण साजरा करत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी या गावातील संपूर्ण मुस्लीम नागरिकांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानसोबत लढताना सिल्लोड तालुक्यातील संदीप जाधव या जवानाला वीरमरण आले. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गावाने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नमाज देखील काळ्या फिती लावून अदा करण्यात आली.
अंधारी या संपूर्ण गावात जवळपास पंधराशे पेक्षा जास्त मुस्लीम नागरिक राहतात. आपल्या तालुक्यातील जवान देशासाठी लढताना शहीद झाला म्हणून आपण ईद कशी साजरी करावी म्हणून गावातील सर्व मुस्लीम नागरिकांनी एकमताने आज संदीप जाधव या जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोकांनी साध्या पद्धतीने नमाज अदा केली. तसेच गावातील कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीने नवीन कपडे देखील परिधान केले नाहीत.
यावेळी नमाज अदा केलेल्या ठिकाणी पाकिस्तानाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. ठीक ठिकाणी पाकिस्तान मुदार्बाद, शहीद जवान अमर रहे, असे फलक झळकताना पाहायला मिळाले. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांना अंधारी येथील मुस्लीम समाजातील नागरिकांनी या कृतीतून एक चपराकच लगावली आहे.