नारळी पौर्णिमेला मुंबईमध्ये खारदांडाबरोबरच जुहू कोळीवाडा, वेसावा कोळीवाडा, वरळी कोळीवाडा, कुलाबा कोळीवाडा, धारावी, बोरिवली-गोराई खाडी तसेच सायन, माजगाव आदी ठिकाणी समुद्र किनारी दर्याराजाला नारळ अर्पण करण्यासाठी जनसागर फुलून येतो. संस्कृतीचं एक सोनेरी रूप येथे नकळतच उमटून जातं.
सण आयलाय गो.. नारळी पुनवेचा,
मनी आनंद मावना.. कोळ्यांच्या दुनियेचा
आपली सारी मदार दर्यावर असणा-या कोळीबांधवांसाठी नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा असतो. दर्याराजावरच घर-संसार अवलंबून असणारे कोळीबांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करून, दर्याराजाला मनोभावे वंदन करून मासेमारीला आरंभ करतात. ही प्रथा पूर्वापार सुरू असलेली आपल्याला पाहावयास मिळते.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळीवाडय़ांतून निघणारी मिरवणूक, मानाचे नारळ अर्पण करण्यासाठी उत्साहाने निघालेले कोळीबांधव, नारळी पौर्णिमेच्या गाण्यांची असणारी धूम ही गाणी आणि वाद्यांबरोबरच लहान मुलांसह महिला पुरुषवर्गालाही ठेका धरायला लावणारी असते. यावेळी पारंपरिक वेषभूषेबरोबरच कोळी बांधवांचा पेहराव, डोक्यावर लाल टोपी आणि रुमाल किंवा आजच्या पेहरावानुसार सदरा तसेच महिलांचा पारंपरिक पेहराव, दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया, अंबाडा, त्यावर फुलांच्या वेण्या आणि त्यांनीही गाण्यांवर धरलेला ठेका हा कोळीगीतांचा ताज लेऊन कोळीवाडा दुमदुमून टाकणारा ठरतो.
समुद्राला शांत करण्यासाठी खासकरून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करण्यासाठी कोळी बांधवांची समुद्र किनारी गर्दी दिसून येते. कोळीवाडय़ातून मानाचे नारळ घेऊन मिरवणुका निघतात. तसेच यावेळी वैयक्तिक नारळ अर्पण करण्यासाठी घराघरांतील माणसं उपस्थित असतात. मानाच्या नारळामध्ये सात-आठ मानाचे नारळ तसेच एक सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करण्यासाठी नेला जातो. पूर्वीच्या प्रथेनुसार सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करण्याची प्रथा होती, मात्र आज सोन्याचा नारळ समुद्राच्या ठिकाणी नेऊन तिथे त्याची पूजा केली जाते व समुद्राला स्पर्श करून तो नारळ परत आणला जातो. मानाच्या नारळामध्ये नारळ सजवून, त्याची पूजा करून, मनोभावे प्रार्थना करून दर्याराजाची आपणावर कृपा राहावी म्हणून आनंदाने उत्साहाने नारळी पौर्णिमेला नारळ दर्यात अर्पण केला जात असल्याचे जुहू येथील कोळीबांधव नीळकंठ रेवदंडकर यांनी सांगितले.
खरं तर पावसाळय़ात चार महिने मच्छीमारी व्यवसाय बंद असतो. यावेळी पुन्हा मच्छीमारीस प्रारंभ करण्यासाठी नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करूनच मग नंतर ख-या अर्थाने होडय़ा समुद्रात सोडून मच्छी व्यवसायास आरंभ केला जातो. या वर्षी मच्छीमारीस आरंभ लवकर करण्यात आला आहे, मात्र नारळी पौर्णिमेपूर्वी समुद्रात थोडं वादळी, उधाण स्वरूप असतंच असतं, समुद्र खवळलेला असतो. पावसाचा जोर असतो. त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतरचा काळ हाच मच्छीमारीस तसेच समुद्रात होडय़ा उतरवण्यासाठीचा योग्य काळ असल्याचे रेवदंडकर यांनी सांगितले.
मुंबईमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी गजबजणारे समुद्र किनारे, वाजत-गाजत निघणा-या मिरवणुका पाहिल्या, तर बाहेरून या सणाचा उत्साह, जपली जाणारी सणाची संस्कृती पाहण्यासाठी गर्दी होते.
जुहू खारदांडा येथे मानाचे पाच-सहा नारळ असतात. यामध्ये काही घराण्याचे, काही व्यक्तिगत स्वरूपाचे नारळ मिरवणुकीतून वाजत-गाजत नेले जातात. मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक दांडा कोळीवाडय़ातून समुद्रापर्यंत नाचत, वाजत-गाजत नेली जाते. यावेळी पुरुष, महिलांबरोबरच लहान मुलांचाही समावेश असतो. मुंबईमध्ये खारदांडा कोळीवाडा बरोबरच जुहू कोळीवाडा, वेसावा कोळीवाडा, वरळी कोळीवाडा, कुलाबा कोळीवाडा, धारावी, बोरिवली-गोराई खाडी तसेच सायन-माझगाव आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नारळी पौर्णिमेला कोळीबांधवांचा उत्साह हा अवर्णनीय दिसून येतो. सायंकाळी ४.३० च्या दरम्यान मिरवणुकीस होणारा प्रारंभ हा तीन-चार तास धामधुमीत असतो. समुद्राच्या ठिकाणी यावेळी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येतं. मिरवणुका बघायला होणारी गर्दीही नारळी पौर्णिमेच्या सणाची उत्सुकता वाढविणारी असते.
वर्षातून येणारा हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि परंपरेची महती जपणारा सण असल्याने घरोघरी या दिवशी नारळाचे पदार्थ बनविले जातात. विशेषत: या दिवशी ओल्या खोब-याच्या उकडलेल्या करंज्या बनविल्या जातात. हा प्रसाद समुद्रावर प्रत्येकाला वाटला जातो. समुद्राच्या रौद्ररूपाला शांत करण्यासाठी दर्याराजाला नारळ अर्पण करण्याची परंपरा ही पारंपरिक आणि आधुनिक रूपाचा मध्यबिंदू गाठणारी ठरते. संस्कृतीचं एक सोनेरी रूप येथे नकळतच उमटून जातं.
यावेळी बुजुर्गाबरोबरच तरुणांचाही ओसंडून वाहणारा उत्साह हा अवर्णनीय असतो. खास नारळी पौर्णिमेच्या दिवशी तरुणांमध्ये पैजाही लावल्या जातात. नारळाचा खेळ म्हणजे नारळावर नारळ आपटण्याची पैज लावली जाते.
मुंबईप्रमाणेच ठिकठिकाणी शहर, ग्रामीण भागातही नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील मच्छीमार बांधवांबरोबरच काही घरातून व्यक्तिगत स्वरूपातही समुद्राला नारळ अर्पण करण्याची घराण्यांची परंपरा दिसून येते. दर्याराजाची आपणावर कृपा राहावी, त्याचं रौद्र रूप शांत व्हावं यासाठी केली जाणारी प्रार्थना आणि समुद्रात अर्पण केला जाणारा नारळ हा मानाचा, सन्मानाचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग असतो. भावनांबरोबरच संस्कृतीचाही येथे आदर केला जातो. निसर्गातील घडामोडी, बदलाला अनुसरून चार महिन्यांनंतर केली जाणारी मासेमारी ही ठिकठिकाणी दिसून येते. शहराबरोबरच ग्रामीण भागात सणाची आगळीकता परंपरा, प्रथेनुसार आपली वैशिष्टय़े, प्रथा जपताना दिसून येतात.
सणाची आगळीकता जपताना दर्याराजाचा मानसन्मान करण्याचा उद्देश दिसून येते. आपलं घर, संसार, उदरनिर्वाह ज्या दर्याराजावर अवलंबूून असतो त्या दर्याच्या ठिकाणी फुलून येणारा जनसागर नारळाची पूजा करून उत्सवाचं रूप जपतात. तसेच मच्छीमारीसाठी वापरण्यात येणा-या बोटींना नवा रंग, नवी तोरणं, फुलांचे हार घालून त्या सजवल्या जातात. बोटींची पूजाही यावेळी केली जाते. नवा उत्साह, नवं रूप यावेळी अनुभवास मिळतं.
यावेळी सारा कोळीवाडा सजलेला दिसून येतो. ओसंडणारा उत्साह, नवा साज, नवे दागिने कपडय़ांबरोबरच कोळीवाडय़ांतील उत्साह हा उत्सवाबरोबरच द्विगुणित करणारा ठरतो. दर्याराजाला भेटण्यासाठी आतुर झालेली मनं यावेळी बेगीन बेगीन किना-याच्या दिशेने वळलेली दिसून येतात.