आज महाशिवरात्र. आजचा दिवस श्रद्धेचा आहे तसाच पारायणाचा आहे. उपवासाचाही आहे. हे उपवास जरी धार्मिक वाटत असले तरी ज्यांनी कोणी याची योजना केली असेल, ती अतिशय शास्त्रशुद्ध योजना आहे.
फक्त ज्या काळात याची रचना झाली, त्या काळात शास्त्रापेक्षासुद्धा धर्माचा पगडा समाजमनावर अधिक होता. त्यामुळे जे जे व्रत-वैकल्याचे विषय आहेत, ते ते धर्मामध्ये बसवण्यात आले. त्यामुळे समाज ते स्वीकारतो आणि म्हणून आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल किंवा महाशिवरात्री असेल, या सर्व उपवासांची जी व्यवस्था आहे, ती ऋतूवर आधारित आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन ती इतकी शास्त्रीय आहे की, या तीन उपवासांमध्ये बरोबर १२० दिवसांचे अंतर ठेवण्यात आलेले आहे. शरीर शुद्धीचे जे नियम आहेत, त्या शुद्धीमध्ये उपवासाचे महत्त्व फार आहे. हे महत्त्व अशाकरिता आहे की, त्या शिवाय शरीरशुद्धी होत नाही. मित आहार हा सर्वोत्कृष्ट आहार समजला जातो. शाकाहार हाही उत्कृष्ट आहार आहे. जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देश असा आहे की, जिथे ५० टक्के लोक शाकाहारी आहेत. शाकाहारी किंवा मांसाहारी अशा दोन्ही समाजाला या उपवासाने शरीरशुद्धीची शिकवण दिलेली आहे. जे मांसाहार करणारे आहेत, तेही रविवार, बुधवार, शुक्रवार अशा आठवडय़ातल्या तीन दिवशी तो आहार घेतात आणि बाकी दिवशी तो वज्र्य मानतात. त्याचेही कारण शरीर शास्त्राशी जोडलेले आहे. कोणत्याही आहाराचे अतिसेवन किंवा सतत सेवन हे शरीर प्रकृतीला पेलणारे नाही. त्यामुळे ही आहार बंधनेही घातली गेली आहेत. शाकाहारी समाजालाही आणि मांसाहारी समाजालाही उपवासाची बंधने त्यासाठीच आहेत. कोणत्याही धर्माचा पाया अशा शास्त्रशुद्ध उपवासांमध्ये आहे. हिंदू धर्मात २७ एकादशा आणि हे तीन मोठे उपवास, मुस्लीम धर्मात एक महिन्याचे रोजे, शीख धर्मातलेही उपवास किंवा ख्रिश्चन धर्मातील गुड फ्रायडे टू इस्टर हे उपवास हे शरीर शुद्धीकरता आहेत. जैन धर्मातही ‘पर्युषण पर्व’ हे उपवासाचेच पर्व आहे.
आपल्याकडे आषाढी एकादशीची योजना पावसाळय़ाच्या तोंडावर आहे. कार्तिकी एकादशीची योजना हिवाळा सुरू होतानाच्या तोंडावर आहे आणि महाशिवरात्रीची योजना वसंत ऋतूच्या आगमनावेळी आहे. मार्गशीर्ष संपून आता वसंत ऋतूकडे कालक्रमण होत असताना या महाशिवरात्रीची योजना आहे आणि खासकरून उत्तर हिंदुस्थानामध्ये ‘शिव’पूजेचे महत्त्व विशेष सांगितले गेलेले आहे.
प्रत्येक समाजात, धर्मात पौराणिक कथा असतात. त्या कथांचा विषय त्या त्या काळात श्रद्धेशी जोडला गेलेला आहे. शिवरात्री या पर्वाचा विषय पौराणिक कथांशी खूप निगडीत आहे. त्यानिमित्ताने हे महाव्रत सांगितले गेलेले आहे. या शिवपर्वाचा आणखी एक अर्थ असा सांगितला जातो की, या शिवपर्वात केलेल्या उपवासातून हिंसक प्रवृत्तीवर विजय मिळवण्याच्या अनेक कथा प्रचलित आहेत. अनेक शिवपुराणात माणसाच्या मनाच्या शुद्धीकरता या उपवासाची व्यवस्था केल्याचे सांगितले गेले आहे. त्याच ऋतूपर्वात सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते आणि त्यामुळे ऋतू परिवर्तनाची सुरुवात झालेली असते. वसंत ऋतूचे आगमन होणे, शिशिर ऋतूमध्ये ज्या वृक्षवेलींची पाने पानगळ लागून गळून जातात, त्या वृक्षवेलींचे परिवर्तन शिवरात्रीपासून सुरू होते आणि नवीन पालवी फुटण्याचा उदय काळ म्हणूनही शिवपुराणात याचे उल्लेख आलेले आहेत. याचा सरळ अर्थ असा की, या शिवरात्रीचा निसर्गपर्वाशीसुद्धा संबंध खूप जोडला गेलेला आहे.
‘शिव’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘कल्याण’ आहे आणि सर्व प्राणीमात्रांचे कल्याण शिवाला अभिप्रेत आहे. शिवपुराणात अनेक उल्लेख गमतीचे आहेत. भगवान शंकर आणि पार्वती यांच्या कथाही लोककथांसारख्या प्रचलित आहेत. त्या प्रचलित कथांचा एक अर्थ असा आहे की, शिव आणि पार्वतीने मनुष्याच्या कल्याणाबद्दल बरीच चर्चा केलेली आहे. ती माना किंवा न माना, पण शिवाने आणि पार्वतीने स्वत:बद्दल ही चर्चा केलेली नसून, मानवजातीबद्दल केलेली आहे आणि पार्वतीने शिवाला प्रश्न विचारला आहे की, ‘मृत्यू लोकातील प्राण्यांना मन:शांती मिळावी याकरिता त्यांनी कोणते व्रत केले पाहिजे?’ त्यावर शिवाने उत्तर दिले आहे, ‘शिवरात्रीत पूजन, तप आणि उपवास..’
कोणत्याही धर्मशास्त्रात ध्यानाला आणि तपाला कमालीचे महत्त्व आहे. आपला वेळ हा अनेक कामात व्यस्त असताना ध्यानस्थ बसून एकाग्रता साधने ही अतिशय कठीण अशी गोष्ट आहे . उपवास याचा अर्थ एकाग्रता आहे. ही एकाग्रता इतकी तीव्र असली पाहिजे की, बाकी भौतिक गोष्टींचा त्या १०-१५ मिनिटांच्या एकाग्रतेत प्राणीमात्राला विसर पडला पाहिजे. विनोबांनी एक छान गोष्ट सांगितली आहे. एका माणसाने हातातला बाण समोरच्या माणसाला मारला आणि तो बाण त्याच्या छातीत घुसला. छातीत घुसलेला बाण काढण्याकरिता त्याचे मित्र मंडळी धावली; पण बाण उपटण्याकरिता हातात धरला तर त्याला वेदना होऊ लागल्या. कोणतरी शहाण्या माणसाने सांगितले, ‘आता असेच राहू द्या. हा मनुष्य ध्यान करायला बसायला की, बाण ओढून काढा.’ त्यानुसार हा मुनष्य ध्यानाला बसला त्यावेळी त्याच्या मित्रमंडळीनी तो बाण सहज ओढून काढला. या गोष्टीचे तात्पर्य ध्यानाच्या एकाग्रतेत आहे. जेव्हा अशी एकाग्रता होते, तेव्हा जीवनाचा सर्व जमाखर्च आपण सहजपणे करतो. उपवासाचे जे काही फायदे असतील ते या ध्यानामध्येही आहेत. चिंतनामध्येही आहेत. प्रत्येक धर्माने हे असे उपवास शरीर शुद्धीकरता जसे सांगितलेले आहेत, तसेच ते चित्त शुद्धीकरताही सांगितलेले आहेत. शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धी हे एकत्र जाणारे विषय आहेत. शरीराची शुद्धी स्वच्छ स्नानाने, उत्त्तम साबणाने होऊ शकेल; परंतु मनाची शुद्धी साबणाने होत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे..
नाही निर्मळ जीवन
काय करील साबण..
महाशिवरात्रीचा प्राणीमात्राला हा संदेश आहे. जीवन निर्मळ करा आणि प्रेमळ करा. शिवाची उपासना ही सत्यम, शिवम, सुंदरमची उपासना आहे. महाशिवरात्रीचा तोच अर्थ आहे.