भारतीय लोकशाही ही अतिशय समृद्ध होती. ती आज आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे, पण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने लोकशाहीतील सुसंस्कृतपणाचा अस्त झाला आहे हे लक्षात येते. याचे कारण अटलबिहारी वाजपेयी असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कधी द्वेषाचे राजकारण नव्हते. सहकार्याचे आणि अभ्यासाचे राजकारण होते.
सभागृह ही विचाराने चालत होती. आज त्याचाच अभाव जाणवू लागलेला आहे. सभागृह बंद पाडण्यासाठी नाही तर कामकाजासाठी, चर्चेसाठी असतात. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी परस्पर सहकार्याने देश चालवायचा आहे हे धोरण वाजपेयींच्या काळापर्यंत होते. म्हणूनच अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक पंडित नेहरूंनी केले, राजीव गांधींनी केले. इंदिरा गांधींचे कौतुकही अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. कारण जे काही करायचे ते देशहितासाठी करायचे एवढाच विचार फक्त तेव्हा होता. ही सशक्त लोकशाहीची साक्ष होती. सत्ताधारी आणि विरोधक ही लोकशाहीची प्रमुख चाके आहेत. देश चालवण्याची जबाबदारी दोघांचीही आहे ही भावना विकसित करण्यासाठी अटलजी, राजीव गांधी अशी व्यक्तिमत्त्वे महत्त्वाची ठरतात. हुकूमशाहीच्या दिशेने जाणारी नेतृत्व देशाने नेहमीच नाकारली आहेत. त्यांच्याकडे सत्ता असली तरी आपलेपणा कधी राहिलेला नाही. म्हणूनच अटलजींच्या जाण्याने सशक्त लोकशाहीचा बुरुज ढासळलेला आहे, असे आवर्जून सांगावे लागेल. सत्ताधारी म्हणजे देशाचे मालक आणि चालक आहेत आणि विरोधक म्हणजे शत्रू आहेत, असा विचार अलीकडे रुजताना दिसत आहे. त्यामुळे भारतातील राजकारण हे ‘याला गाडा रे त्याला गाडा’ या दिशेने जाताना दिसत आहे. सत्तेत नसलेले विरोधक हे सभागृहातील वेगळ्या दृष्टीने विचार करणारे आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. आज दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. एकमेकांना संपवणे, परस्परांचा आदर न करणे या राजकारणामुळे फक्त विरोधकच नाही तर सत्तेतील स्वपक्षीयही दुखावले जात आहेत याचा विचार होताना दिसत नाही. लोकशाहीत आपल्या विरोधकांचे महत्त्व ज्यांना समजते ते उत्कृष्ठ राज्यकर्ते असतात. ते लोकशाहीचा सन्मान राखणारे असतात. अटलजींचे राजकारण हे अशा सभ्यतेचे होते. विरोधकांनाही ते सभ्यतेने वागवत, त्यांचा आदर-सन्मान करत असत. त्यामुळेच अटलजींची लोकप्रियता अफाट होती. त्यांनी वादळ निर्माण केले, पण लाट नाही निर्माण केली. लाट ओसरू शकते पण ते कायम प्रवाहीतच राहिले. हा उच्च विचार होता. याचे कारण विरोधकांचे महत्त्व त्यांनी जाणले होते. दीर्घकाळ विरोधात असल्यामुळे असेल कदाचित, पण विरोधकांचे देशाच्या राजकारणात, लोकशाहीत, जडणघडणीत काय महत्त्व असते हे अटलजींनी दाखवून दिले होते. त्यामुळेच ते स्वपक्षीयांबरोबरच विरोधकांनाही आवडायचे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर अटलजींनी सांगितलेली आठवण फार महत्त्वाची होती. सत्ताधारी आणि विरोधक यांचे नाते कसे असावे याचे हे बोलके उदाहरण आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी हे विरोधात होते. तरीही त्यांनी कायम वाजपेयींचा आदर केला. १९८४ ते १९८९ या काळात राजीव गांधी पंतप्रधान होते. तेव्हाच अटलजींना किडनीचा त्रास होत होता. त्यांच्यावर त्या काळात भारतात उपचार होणे शक्य नव्हते. परदेशात जाणे आवश्यक होते. ही गोष्ट राजीव गांधींना समजली. त्यावेळी राजीव गांधींनी आपल्या कार्यालयात अटलजींना बोलावले होते. राजीव गांधींनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघात भारतातर्फे जाणा-या शिष्ठमंडळात तुमचा समावेश करण्यात आलेला आहे. या संधीचा फायदा घेत परदेशात उपचार करून घ्या. त्यानंतर राजीव गांधींनी सर्व प्रतिनिधींना सांगितले की, अटलजींना उपचार पूर्ण झाल्याशिवाय न्यूयॉर्कहून परत येऊ देऊ नका. राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना अटलजींनी ही आठवण सांगितली होती. ती सांगताना, ‘आज मी जो जिवंत आहे तो राजीव गांधींमुळे आहे’ असे सांगितले होते. दोन पक्षांच्या दोन नेत्यांनी परस्परांचा सन्मान कसा करायचा असतो हे अटलजी आणि राजीव गांधींच्या या उदाहणावरून दिसून येते. ही खरी लोकशाही आहे. लोकशाहीचे चार स्तंभ म्हणतात, त्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांना पहिले दोन महत्त्वाचे खांब म्हटले जाते ते यासाठीच. दोघांनी मिळून एकत्रित येऊन देशाचा कारभार चालवायचा आहे. पंतप्रधान पदाइतकाच विरोधी पक्षनेताही महत्त्वाचा आहे. हे तेव्हाच दिसून येते जेव्हा लोकशाहीचा सन्मान केला जातो. हे पाहिल्यावर आजचे राजकारण कुठे चालले आहे हे लक्षात घ्यावे लागेल. सत्ताधा-यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्यासाठी आपण विरोधी पक्षात नाही तर सत्ताधारी पक्षाचा निर्णय चुकत असेल तर त्याची जाणीव करून देण्यासाठी विरोधी भूमिका असणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीत चुका शोधणे म्हणजे विरोधी पक्ष नाही, तर नाण्याची दुसरी बाजू तपासून घेण्याचे काम विरोधकांनी करायचे असते. त्यामुळेच इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करणारे वाजपेयी त्याच इंदिरा गांधींनी जेव्हा भारत-पाक युद्धानंतर बांगलादेशच्या निर्मितीवेळी इंदिरा गांधींचा गौरव करतात. त्यांना दुर्गेची उपमा देतात. हे प्रबळ लोकशाहीतील विरोधी पक्षाचे काम आहे. ते अटलजींनी जपले होते. त्यामुळे अटलजींच्या जाण्याने या विचारांचा अंत झाला काय याचे दु:ख आहे. पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ सुरू झाली. पंजाबचा तुकडा पाडून स्वतंत्र देशाच्या निर्मितीचे भूत थयाथया नाचू लागले. हे अतिरेकी सुवर्णमंदिरात घुसले तेव्हा ऑपरेशन ब्ल्यू स्टारची योजना आखली गेली. जनरल अरुणकुमार वैद्य लष्करप्रमुख होते. सरकारच्या या निर्णयाला वाजपेयींच्या भाजपने साथ दिली होती. कौतुक केले होते. त्याचवेळी नरेंद्र मोदी सरकारने दोन वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक केला, त्याचे मात्र काँग्रेसने कौतुक केले नाही. थट्टा उडवली. हे लोकशाहीला मारक आहे. काही वाचाळ काँग्रेसी नेत्यांनी त्यातही संशय व्यक्त केला. देशहितापेक्षा स्वत:च्या हितासाठी हे नेते जगतात तेव्हा सामान्यांचा संताप होतो. म्हणूनच ही सभ्यता अटलजींच्या जाण्याने गेलेली आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नव्या नेत्यांनी आता ही सभ्यता जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.