चालू विपणन वर्षात देशाच्या एकूण साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टनांहून अधिक घट होण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.
नवी दिल्ली- चालू विपणन वर्षात देशाच्या एकूण साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख टनांहून अधिक घट होण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.
२०१५-१६ या (ऑक्टोबर-सप्टेंबर) विपणन वर्षात २.६ कोटी टनच साखर उत्पादनाचा अंदाज बांधण्यात आला आहे. कमी पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यांना मोठा फटका बसणार आहे. मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन पुरेसे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारांनी वर्तवलेल्या अंदाजाच्या जवळपास जाणारा हा अंदाज आहे. मात्र साखर उत्पादक संघटना ‘इस्मा’च्या उत्पादन अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. या संघटनेने २.७ कोटी टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. २०१४-१५ या विपणन वर्षात देशात १.८१ कोटी टन साखरेचे उत्पादन झाले होते. जगभरात भारत साखर उत्पादनामध्ये दुस-या क्रमांकाचा देश आहे.
चालू विपणन वर्षात देशातील साखर उत्पादन साधारण २.६ कोटी टनांच्या आसपास असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होणार असली तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यात हे उत्पादन पुरेसे असल्याचे अन्न खात्यातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले. साखर उत्पादनात २० लाख टनांची घट अपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकला कमी पावसाचा फटका बसल्याने या राज्यांतील उत्पादन घटण्याची शक्यता असल्याचे या अधिका-याने स्पष्ट केले.
दरम्यान, देशातील साखर उत्पादनात आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १४.५१ लाख टनांनी उत्पादन घटून ८६ लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १ कोटी ५१ हजार टन साखर उत्पादन या राज्यात झाले होते. उसाचे उत्पादन १०.२२ कोटी टनांवरून ८.३६ कोटी टनांवर घसरले असून कमी पावसाचा ऊस उत्पादनाला फटका बसल्याचे महाराष्ट्र सरकारच्या अधिका-याने म्हटले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ऊसशेती ही पावसावर अवलंबून आहे.
उत्तर प्रदेशमध्ये या शेतीसाठी चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध आहेत. कर्नाटकातील साखर उत्पादनही ५० लाख टनांवरून ४० लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे.