मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत स्नेहल आंबेकर यांनी आपला वेगळाच तोरा दाखवायला सुरुवात केली आहे.
मुंबई- मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत स्नेहल आंबेकर यांनी आपला वेगळाच तोरा दाखवायला सुरुवात केली आहे. आपापसात व मोबाइलवर न बोलण्याची तंबीच त्यांनी नगरसेवकांना दिली. एवढेच नव्हे, तर यापुढे नगरसेवकांकडून असेच वर्तन घडल्यास आपण या बैठकीलाही येणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. काही अनुभवी नगरसेवकांना मात्र महापौरांचा हा रुबाब खटकला. वासराच्या कानात वारू शिरल्यानंतर ते उड्या मारायला लागते, तशी अवस्था महापौरपद मिळाल्यानंतर आंबेकर यांची झाल्याने सेनेच्या नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आंबेकर यांची महापौरपदावर निवड झाल्यापासून शिवसेनेतील नगरसेवक नाराज आहेत. ही नाराजी आता चव्हाटय़ावर येऊ लागली आहे. महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपूर्वी प्रत्येक पक्षाची बैठक पार पडते. त्याप्रमाणे सोमवारी शिवसेनेचीही बैठक झाली. परंतु पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर आंबेकर यांनी एकेरी भाषेत नगरसेवकांचा उद्धार केला. त्यातच महापौरपदी निवडून आल्यानंतर पहिलीच सभा असल्यामुळे याबद्दल कृतज्ञता तथा आभार मानण्याचा शिष्टाचार पाळण्याऐवजी चक्क आपापसात व मोबाइलवर बोलू नका, अशी तंबीच त्यांनी नगरसेवकांना दिली. महापौर झालो म्हणजे गगनाला हात लागले, या आविर्भावातच त्यांनी सर्वानी आधी शिस्त पाळा, नाही तर मी बैठकीला येणार नाही, असेही नगरसेवकांना सुनावल्याचे माहीतगारांनी सांगितले. याशिवाय लाल दिवा कसा आवश्यक आहे, हेच नगरसेवकांवर बिंबवून लाल दिव्यासाठी पाठिंबा द्या, अशी सूचनाही त्यांनी केल्याचे समजते.
पहिलेच सभागृह असल्यामुळे माजी महापौर सुनील प्रभू यांनी याकडे पाठ फिरवली. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी बैठकीला येण्याऐवजी हवेत उडणा-या महापौरांचा रुबाब पाहून आपल्याच दालनात बसून कामकाज करणे पसंत केले. त्यामुळे या बैठकीला सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, माजी महापौर शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, डॉ.अनुराधा पेडणेकर, सुरेंद्र बागलकर, अशोक पाटील, रमेश कोरगावकर, हंसाबेन देसाई, सुनयना पोतनीस, अश्विनी मते, रमाकांत रहाटे, नाना आंबोले असे अनुभवी नगरसेवक उपस्थित होते. महापौरांच्या या वागण्यामुळे सर्वच नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षाच्या बैठकीत सभागृह नेते हे प्रमुख असताना महापौरांच्या या वर्तनामुळे पक्षाची शिस्त खुद्द आंबेकरांनी मोडली असून, आपल्याच अधिकारांवर गदा आणण्याच्या या त्यांच्या प्रयत्नामुळे खुद्द सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव याही क्षणभर विचारात पडल्या होत्या.
महापौर म्हणून निवडून झाल्यावर पक्षातील बहुतांशी नगरसेवकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या नाहीत. त्यामुळे एरव्ही महापौर निवडीनंतर सायंकाळी उशिरापर्यंत महापौर दालनाता शुभेच्छा देण्यासाठी गर्दी व्हायची. त्या तुलनेत आंबेकरांना शुभेच्छा देण्यासाठी कोणीच आले नाही. त्यामुळे निवडीनंतर चार वाजतात त्या सभागृहातून निघून गेल्या होता. एवढेच नव्हेतर त्यांच्या विभागातून त्यांना विरोध असल्यामुळे जल्लोष करायला कार्यकर्ते नव्हते.
आधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना माजी महापौर सुनील प्रभू, राहुल शेवाळे, फणसे यांच्यातील वादामुळे त्रास सहन करावा लागलेला असताना, आता चक्क महापौरपदी बसवलेल्या आंबेकरांच्याही कानात हवा गेल्यामुळे त्यांच्या उड्या मारण्यानेही नगरसेवकांमध्ये नाराजी पसरून ‘मातोश्री’वर हादरे बसायला सुरुवात झाली आहे.