सामान्य नागरिक आणि भारतीय लष्कर यांच्यात फार मोठे अंतर, दरी आहे. एखादा जवान शहीद झाल्यानंतर त्याची बातमी येणे, श्रद्धांजली वाहणे आणि विसरून जाणे एवढ्यापुरती लष्कराची ओळख असता कामा नये, तर भारतीय लष्कराची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे, असे मत ब्रिगेडियर अनिल तळवलकर यांनी ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केले.
ब्रिगेडियर तळवलकर म्हणाले, सामान्य माणसांचा आणि मिलिटरीचा काहीच संबंध नाही असेच अनेकांना वाटते. मी निवृत्तीनंतर पुण्यात राहायला गेलो. मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळीही फिरायला जाताना सोसायटीतील अनेकजण भेटतात. मी सर्वांशी बोलतो. पण या बोलण्यातून लष्करी जवान आणि सामान्य माणूस यांच्यात खूप अंतर आहे, असे जाणवते. हे अंतर, ही दरी कमी व्हायला पाहिजे.
एक गृहस्थ मला नेहमी भेटतात. मला हाक मारताना म्हणतात, काय म्हणता कॅप्टन? मी सांगतो, मी कॅप्टन नाही ब्रिगेडियर आहे. पुन्हा भेट झाल्यावर म्हणतात, काय म्हणता मेजरसाहेब? मी पुन्हा सांगतो मी मेजरही नाही, मी ब्रिगेडियर आहे. तेच गृहस्थ पुन्हा पुन्हा भेटतात, कधी कॅप्टन म्हणतात, कधी मेजर म्हणतात, कधी कर्नल म्हणतात, माझे उत्तर प्रत्येकवेळी असायचे की मी ब्रिगेडियर आहे. असे वारंवार झाल्यावर ते गृहस्थ चटकन म्हणाले, ‘ते तुमच्या मिलिटरीतलं आम्हाला काही कळत नाही..’ मला प्रचंड धक्का बसला. तुमची मिलिटरी? हे सामान्य नागरिक आणि लष्करात तुमचं आमचं कधी सुरू झालं? आमची मिलिटरी का नाही? ही खंत माझ्या मनात होती. म्हणून भारतीय लष्कर, जवान त्यांचे शौर्य हे भारतीयांपुढे आणण्याचे मी ठरवले आणि तसे प्रयत्न सुरू केले. हे करताना मला अनेक धक्कादायक अनुभव आले.
म्हणजे आपल्याला महाभारतातील युद्धकथांची सर्व माहिती आहे. त्यांची नावे माहिती आहेत. त्यातील कथानके पाठ आहेत. रामायणातील युद्धांची माहिती आहे. त्यातील योद्धय़ांच्या शौर्यगाथा माहिती आहेत. थोडे पुढे गेले तर राजपुतांचा, मराठय़ांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पेशवाईतील युद्धाची आपल्याला माहिती आहे. थोडे पुढे गेले तर इंग्रजांविरोधात झालेले उठाव, संघर्ष याची माहिती आहे. थोडक्यात स्वातंत्र्यापूर्वीचे आम्हाला सगळे माहिती आहे, पण स्वातंत्र्यानंतरचा इतिहास हा आमचा कोराच आहे. नंतरचा आमच्या जवानांचा पराक्रम आम्हाला माहितीच नाही.
परमवीर राणेंचा अभ्यासक्रमात समावेश का नाही?
रामा राघोबा राणे यांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती असला पाहिजे. त्यांच्या पराक्रमाचा आणि शौर्याचा अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे, याकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिले नाही.
यामागचे नेमके कारण काय असावे, असे विचारले असता ब्रिगेडियर तळवलकर म्हणाले, याचे कारण आपल्या नागरिकांची समज आहे की आम्ही शत्रूशी लढायला सीमेवर जातो. पण आम्ही शत्रूला मारायला किंवा लढायला सीमेवर जात नाही, तर आमचे तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या रक्षणासाठी शत्रू आत येऊ नये म्हणून आम्ही सीमेवर जातो. तुमच्या प्रेमासाठी आम्ही सीमेवर लढतो, शत्रूला मारायला नाही. ही समज प्रत्येकाच्या मनात असेल तेव्हा आमच्या शहीद होणा-या जवानांना आपल्या बलिदानाचा अधिक आनंद मिळेल. आम्ही आमच्या भारतीयांसाठी शहीद झालो.
ब्रिगेडियर तळवलकर बोलत होते तेव्हा कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील असे त्यांचे शब्द होते. सामान्य माणसापासून मिलिटरी दूर का असा प्रश्न भेडसावत राहात होता. चेह-यावरचे हे अस्वस्थ करणारे भाव ओळखत ब्रिगेडियर तळवलकर म्हणाले, त्यासाठीच आम्ही प्रयत्न सुरू केले आहे. आम्हीच काही निवृत्त ब्रिगेडियर, कर्नल ऑफिसर्सनी एकत्र येऊन परमहीत ही संस्था स्थापन करून भारतीय सैन्याचा इतिहास, लष्कराची माहिती देण्याचे काम सुरू केले. महाराष्ट्रातील अनेक शाळांना भेटी दिल्या. अनेक शाळांमध्ये गेल्यावर मी एक प्रश्न विचारतो, भारतातील सर्वोच्च सन्मान कुठला? तर पटकन उत्तर येते, भारतरत्न. अगदी बरोबर आहे. किती महाराष्ट्रीय व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे? याचे उत्तरही मुले पटापट सांगतात. भारतरत्ननंतरचा श्रेष्ठ पुरस्कार कोणता, असे विचारल्यावर मात्र उत्तरे चुकू लागतात. कुणी पद्मभूषण सांगतात, कुणी विभूषण सांगतात. पण भारतरत्ननंतरच श्रेष्ठ पुरस्कार हा परमवीर चक्र पुरस्कार हा आहे. दुस-या क्रमांकाचा श्रेष्ठ पुरस्कार असलेल्या परमवीर चक्रबद्दल कोणालाही फारशी माहिती असत नाही. परमवीरनंतर अशोक चक्र येते आणि नंतर पद्म पुरस्कार येतात. पण या सैन्याशी संबंधित असलेल्या परमवीर चक्राबद्दल कोणाला माहिती असत नाही, याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच आम्ही त्याची माहिती देण्यास सुरुवात केली.
ब्रिगेडियर तळवलकर म्हणाले, आम्ही सगळ्या शाळांमध्ये जाऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून एक पोस्टर दिले. या पोस्टरमध्ये आतापर्यंत मिळालेल्या २१ परमवीर चक्र विजेत्यांचे फोटो, नावं छापली आणि ते पोस्टर आपल्या शाळेत लावा असे सांगितले. निदान मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होईल, फोटो पाहतील आणि या परमवीर चक्र विजेत्यांची माहिती मिळवता येईल, हा त्यामागचा हेतू होता. आतापर्यंत २१ जणांना परमवीर चक्र मिळाले आहे, त्यातील फक्त रामा राघोबा राणे या एकमेव मराठी माणसाला परमवीर चक्र मिळाले आहे. या कोणाचीही माहिती लोकांपर्यंत नाही, म्हणूनच मी म्हटले आहे, अत्यंत जबाबदारीने म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाची पाने कोरी आहेत.
तळवलकर म्हणाले, परमवीर चक्र हा सैन्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे. हा कोणालाही दिला जात नाही. हा युद्धात शौर्य गाजवून मरण पावलेल्या जवानांना दिला जातो. त्यासाठी ते युद्ध आहे हे जागतिक पातळीवर मान्य करावे लागते. त्यामुळे दहशतवाद किंवा अन्य कारणांसाठी शौर्य गाजवणा-यांना मात्र परमवीर चक्र न देता त्याच मोलाचे अशोक चक्र दिले जाते. युद्ध आणि शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न असे दोन प्रकार वर्गीकरण केल्यामुळे परमवीर आणि अशोक चक्र अशी दोन मानाची पदके आहेत. म्हणून या परमवीर चक्र विजेत्या आणि अशोक चक्र विजेत्यांची माहिती, इतिहास, शौर्यगाथा आम्ही शाळा-शाळांमधून सांगतो.
ब्रिगेडियर अनिल तळवलकर आणि त्यांच्यासारखे अनेक मिलिटरी ऑफिसर्स सेवानिवृत्तीनंतरही करत असलेली ही जागृती फार महत्त्वाची आहे.