कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यात निषेधाचे संतप्त सूर उमटले असून, महाराष्ट्राची विचारवंतांची परंपरा अशा भ्याड हल्ल्यांनी संपणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
पुणे – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यात निषेधाचे संतप्त सूर उमटले असून, महाराष्ट्राची विचारवंतांची परंपरा अशा भ्याड हल्ल्यांनी संपणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
पानसरेंवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या विवेकशीलतेवरील हल्ला आहे. सरकारने आपली किमान कर्तव्ये पाळायला हवीत. गुप्तचर विभाग काय करतोय? नागरिकांचे रक्षण करण्यात सरकार कमी पडत आहे. कॉम्रेड पानसरे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर सापडले, तर डॉ. दाभोलकरांचे खुनी सापडतील. सरकारने अशा प्रवृत्तींवर पायबंद घातला पाहिजे. नाहीतर भारतातही हिंदू तालिबानी होण्यास वेळ लागणार नाही, असे कुमार सप्तर्षी, युवक क्रांतीदलाचे संस्थापक, अध्यक्ष यांनी म्हटले आहे.
डॉ. दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांनी धर्माधतेला विरोध करणा-या आणि धर्मनिरपेक्ष विचारांचीच मांडणी केली. त्यांचे विचार हिंदुत्ववादी संघटनांना कधीच रुचले नाहीत, हे वारंवार समोर आले आहे. पानसरे यांच्यावरील हल्ला ही दु:खद घटना आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे याच्यावरील हल्ल्यात साम्य आहे.
दोघांच्याही मानेत गोळी झाडण्यात आली. एक हल्ला सार्वजनिक ठिकाणी, तर दुसरा हल्ला खासगी जागेत झाला. हल्लेखोरांचे बळ वाढल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी ते सार्वजनिक ठिकाणी हल्ला करत होते; आता मात्र ते घराच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. हा एका व्यापक कटाचा भाग आहे, असे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. हा हल्ला िहदुत्ववादी संघटनांनी केला असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अशी घटना घडणे हे दुर्दैवी व लाजिरवाणे असून दिवसेंदिवस राज्यातील क़ायदा सुव्यवस्था ढासळत चालली असून हिंसाचाराच्या वाढत असलेल्या घटना, महिलांवरचे वाढते अत्याचार हे याचेच द्योतक आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
या हल्ल्याचा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. तुकाराम दरेकर यांनीही या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे.