विरार पश्चिम येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उपलब्ध साडेतीन एकर आरक्षित मोकळय़ा जागेवर उपजिल्हास्तरीय २०० खाटांचे रुग्णालय व्हावे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
विरार- मागील काही वर्षात वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली आहे, मात्र त्या तुलनेत येथे अद्ययावत अशा रुग्णालयाची कमतरता आहे. ही गरज लक्षात घेऊन, विरार पश्चिम येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उपलब्ध साडेतीन एकर आरक्षित मोकळय़ा जागेवर उपजिल्हास्तरीय २०० खाटांचे रुग्णालय व्हावे, अशी मागणी वसई-विरार महापालिकेचे नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
विरार ग्रामीण रुग्णालय हे वसई तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयाची क्षमता ३० खाटांची असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत हे रुग्णालय कार्यरत आहे. दरम्यान, वसई परिसराजवळच असलेला मुंबई-गुजरात महामार्ग आणि पश्चिम लोहमार्ग पाहता, या रुग्णालयात दाखल होणा-या अपघाती रुग्णांची संख्या जास्त आहे. या शिवाय २०११च्या जनगणनेनुसार वसई तालुक्याची लोकसंख्या १६ लाख इतकी आहे. त्या तुलनेत या परिसरात अद्ययावत अशा रुग्णालयाची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या उपलब्ध साडेतीन एकर आरक्षित मोकळय़ा जागेवर २०० खाटांचे रुग्णालय व्हावे व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या अधिपत्याखालील या रुग्णालयाला उपजिल्हास्तरीय दर्जा द्यावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
हे रुग्णालय झाल्यास या परिसरातील आदिवासी आणि गोरगरीबांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने हे रुग्णालय लवकरात लवकर होण्यासाठी राज्य सरकारला तसे निर्देश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत चोरघे यांनी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.