नव वर्षात १० लाख बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार असून नोकरदारांनाही ४० टक्के वेतनवाढ मिळणार आहे.
नवी दिल्ली- नव वर्षात १० लाख बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार असून नोकरदारांनाही ४० टक्के वेतनवाढ मिळणार आहे. नवीन वर्षात बेरोजगारांना रोजगाराच्या बंपर संधी मिळणार आहे. यंदा १० लाख नवीन नोक-या तयार करण्याचे भारतातील उद्योग जगताने ठरवले आहे. तसेच नोकरदार वर्गाला ४० टक्के दणदणीत वेतनवाढीची भेट देण्याचे सूतोवाच केले आहे. यंदा नोकरभरतीत सोशल मीडिया, मोबाईल फोन आदींचा वापर केला जाणार आहे.
यंदा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ५.५ टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व व्यवसायांमध्ये वाढ होणार असल्याने नवीन नोक-या तयार होणार आहेत. यंदा सर्वच कंपन्यांनी आक्रमकपणे नवीन भरती करण्याचे ठरवले असून व्यवस्थापनांमध्ये त्याबाबत धोरणात्मक आखणी सुरू झाली आहे. परदेशी कंपन्या भारतात येत असून त्यामुळेही रोजगारात वाढ होणार आहे.
‘माय हायरिंग क्लब.कॉम’ने सांगितले की, माहिती-तंत्रज्ञान, एफएमसीजी कंपन्यांमध्ये नवीन ९.५ लाख नोक-या तयार होतील. त्याचबरोबर ई-कॉमर्स, बँकिंग, फायनान्शियल सेवा, रिटेल आदी क्षेत्रात मोठ्या संधी मिळतील.
वेतनवाढीबाबत एचआर तज्ज्ञांनी सांगितले की, यंदा चांगली कामगिरी करणा-या कर्मचा-यांना २० ते ४० टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. तर काही क्षेत्रांमध्ये १० टक्क्यांपर्यंत वेतन वाढ मिळू शकेल.
जागतिक एचआर सल्लागार कंपनी ‘हे ग्रुप’ने सांगितले की, भारतीय कंपन्या यंदा १० ते १८ टक्के वेतनवाढ देतील. अनुभवी कर्मचा-यांबरोबरच नवीन कर्मचा-यांना चांगले पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.
बाजारपेठेची परिस्थिती सुधारली असून कंपन्या वेतनवाढीबरोबरच कर्मचा-यांना देश-विदेशातील सहल, बक्षीसे, शेअरची भेट देणार आहेत, असे ग्लोबल हंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील गोयल यांनी सांगितले.
अब्सुलेट अॅनालिस्टचे सहसंस्थापक व कार्यकारी उपाध्यक्ष सुदेष्णा दत्ता यांनी सांगितले की, यंदा कर्मचा-यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आगळ्यावेगळ्या भेटी देण्याची शक्यता आहे. त्यात खास बोनस, शेअर भेट, पॅकेज टूर आदींचा समावेश आहे.
‘पीपल्सस्ट्रॉँग एचआर सर्व्हिसेस’च्या तज्ज्ञांनी सांगितले की, नोकरभरतीत यंदा सोशल मीडियाचा वापर केला जाणार असून उमेदवारांचे ऑनलाइन मूल्यांकन केले जाईल. व्हिडीओ मुलाखत, डेटा अॅनलिस्ट, मोबाईल फोनचा वापर केला जाईल.