कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (१०७ चेंडूंत १२९ धावा) फटकेबाज शतकाच्या जोरावर विजय हजारे चषक (वनडे) क्रिकेट स्पर्धेत ड’ गटात झारखंडने छत्तीसगडचा ७८ धावांनी पराभव केला. झारखंडसह मुंबई, महाराष्ट्राने रविवारी विजय मिळवले.
चेन्नई/कोलकाता- कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (१०७ चेंडूंत १२९ धावा) फटकेबाज शतकाच्या जोरावर विजय हजारे चषक (वनडे) क्रिकेट स्पर्धेत ड’ गटात झारखंडने छत्तीसगडचा ७८ धावांनी पराभव केला. झारखंडसह मुंबई, महाराष्ट्राने रविवारी विजय मिळवले.
आघाडी फळी कोसळली तरी धोनीने अनुभवाच्या जोरावर शानदार शतक ठोकले. त्याने १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकारासह १२९ धावा करतानाच तळातील शादाब नदीमसह (५३) सातव्या विकेटसाठी १५१ धावांची मोठी भागीदारी करताना झारखंडला ९ बाद २४३ धावा अशी चांगली धावसंख्या उभारून दिली.
प्रत्युत्तरादाखल छत्तीसगडचा डाव ३८.४ षटकांत १६५ धावांत संपला. मध्यमगती गोलंदाज वरुण आरोनसह फिरकीपटू शादाब नदीमने प्रत्येकी तीन विकेट घेत विजयाला हातभार लावला.
चेन्नईत झालेल्या लढतीत ‘क’ गटात मुंबईने राजस्थानवर पाच विकेटनी मात केली. राजस्थानचे १८२ धावांचे आव्हान मुंबईने २९.१ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर अखिल हेरवाडकरसह (५०) श्रेयस अय्यर (४१) आणि कर्णधार आदित्य तरेने (नाबाद ३६) विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरसह (३ विकेट) शिवम मल्होत्रा आणि शिवम दुबेच्या (प्रत्येकी ३ विकेट) अचूक मा-यासमोर राजस्थानला ३८ षटकांत ९ बाद १८१ धावा करता आल्या. खराब हवामानामुळे हा सामना प्रत्येकी ३८ षटकांचा खेळवण्यात आला.
कटकमध्ये झालेल्या लढतीत महाराष्ट्राने केरळला १२२ धावांनी हरवले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडसह (७९) कर्णधार केदार जाधव (७१) आणि नौशाद शेखच्या (५७) दमदार फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३११ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल केरळचा डाव ३९.५ षटकोत १८९ धावांत आटोपला.