दलालांकडून कायदा पायदळी तुडविला जात असून भ्रष्ट अधिका-यांमुळे जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक सुरु असल्याचा आरोप मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केला आहे.
मुंबई- ओव्हरलोड वाहतुकीमुळे राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच गेल्या तीन वर्षात सात हजार लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
महाराष्ट्रातील तमाम वाहतूकदार आज ओव्हरलोडमुळे त्रस्त आहेत. ओव्हरलोड वाहतूक करताना वाहनचालकांचे वाहनांवर नियंत्रण राहत नाही. यामुळेही अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. राज्यात कुठे ना कुठे तरी या ओव्हरलोड वाहतुकीचा दरदिवशी बळी जातोच. सातत्याने ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ही जीवघेणी ओव्हरलोड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने चालली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंद्रजित सहाना, अरविंद गिरी, इरफान भाई, जाफर भाई, एस. के. कदम यांच्यासारख्या दलालांकडून कायदा पायदळी तुडविला जात असल्याचा आरोप मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केला आहे. तसेच वाहतूक दलाल आणि वाहतूक कार्यालयातील उच्च पदस्थ अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात बुडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वाहतुकीमध्ये प्रत्येक गाडीमागे आरटीओ मधील अधिका-यांचे हफ्ते बांधले गेले आहेत. मात्र यामुळे अन्य वाहतूकदारांचीही पिळवणूक होते. या जाचाला कंटाळून एक कामगार संघटक म्हणून मागील वर्षभरापासून मराठी कामगार सेना या संघटनेने तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी ओव्हरलोड वाहतूक मराठी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी थांबवली होती. त्यावेळी ओव्हरलोड वाहतूक काही प्रमाणात कमी झाली होती. परंतु काही दिवस गेल्यानंतर भ्रष्टाचाराला खिशात घेऊन फिरणारे आरटीओ मधील अधिका-यांची जमात पुन्हा कार्यरत झाली आहे.
नाक्यानाक्यावर आरटीओचे अधिकारी खुलेआम हप्तेवसुली करत आहेत. या भ्रष्ट वाहतूक यंत्रणेला टाळ्यावर आणण्यासाठी ‘मराठी कामगार सेना’ मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
याआधी न्यायालयाने २००५ साली दिलेल्या निकालानुसार ओव्हरलोड वाहनांवर गृह विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. हा एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच केला जात आहे.
परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, वरिष्ठ आरटीओ अधिकारी व दलाल यांच्या संगनमताने हा कोट्यवधींचा भ्रष्टाचार ‘पारदर्शक कारभार’ म्हणणा-या सत्ताधा-यांच्या राज्यात सुरु आहे. कोट्यवधींचा मलिदा दलालांकडून मिळत असल्याने मंत्री ते सरकारी बाबू सगळे या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. जर हा भ्रष्टाचार, ओव्हरलोड वाहतूक बंद झाली नाही तर या मंत्र्यांना व अधिका-यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. – महेश जाधव, अध्यक्ष, मराठी कामगार सेना.