अखेर उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. ती नाईलाजाने मागितली आहे. आपल्या वृत्तपत्रात मराठा भगिनींची बदनामी झाली, हे त्यांना खरोखरच वाटले असते तर माफी मागायला त्यांनी दहा दिवस घेतलेच नसते.
अखेर उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. ती नाईलाजाने मागितली आहे. आपल्या वृत्तपत्रात मराठा भगिनींची बदनामी झाली, हे त्यांना खरोखरच वाटले असते तर माफी मागायला त्यांनी दहा दिवस घेतलेच नसते. कार्यकारी संपादक संजय राऊत, हे खरोखर कार्टूनच आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी त्यांना कार्टूनची उपमा दिली. ही अगदी नेमकी उपमा आहे. या माणसाच्या अंगात केवढी मुजोरी आहे. कसली माफी? कशाकरता माफी? असे उद्दाम प्रश्न या राऊतांनी विचारले.
शिवाजींच्या नावाचा रोज गजर आणि भगिनींची बदनामी करणारे व्यंग छापल्यानंतर त्याची जरासुद्धा लाज न वाटता त्या व्यंगचित्राचे समर्थन करणे हा केवढा उद्दामपणा. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी राऊतांचा कान धरला असता तर दुस-या दिवशी माफी यायला हवी होती. चूक झाल्यानंतर माफी मागण्याचा सुसंस्कार यांच्यावर केला गेलाच नाही. त्यामुळे एखाद्या गुंड टोळीतल्या पुंडासारखी राऊत यांची मिजास शिवसेनेला डुबवेल, दोन देसाई (अनिल, सुभाष) आणि तिसरे हे राऊत हेच उद्धव ठाकरे यांचे कान फुंकत असतात.
उद्धवांना कान दोन आणि फुकणारे तीन. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही भान राहिले नाही. माफी मागतानासुद्धा ती माफी सरळ नाही. ‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’ अशी वरती मिजास आहे. कोणाच्या भावना, हे उद्धव ठाकरे यांना माहीत नाही का?.. प्रचंड मोर्चे निघत आहेत, ते मराठा समाजाचे मोर्चे आहेत. लाखोंनी आहेत.
त्या समाजाच्या मोर्च्यात लाखोंनी ज्या मराठा भगिनी सामील झाल्या, त्या भगिनीला प्रतीकात्मक करून तिचा मुका घेताना दाखवण्याचे व्यंग केले आणि वरती हे शहाणे राऊत सांगताहेत ‘व्यंगचित्राकडे व्यंग म्हणूनच पाहिले पाहिजे.’ आता महाराष्ट्रातले तमाम लोक कार्टून म्हणूनच पाहतात. उद्धव ठाकरे यांच्या माफीतून श्लेष दडलेला आहे. कोणाच्या भावना म्हणजे, हे उद्धव यांना अजून समजले नाही का? अख्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तुमचेच खासदार आणि तुमचेच आमदार राजीनामा फेकून देतात आणि ते दडपण्याचा प्रयत्न होतो आणि जेव्हा प्रतापराव जाधवांनी ठामपणे सांगितले की, राजीनामा मागे घेणार नाही.
तेव्हा मग शिवसेनेसमोर अंधेरी आली. दहा दिवस घालवून नाईलाज झाला म्हणून माफी मागितली. चूक झाल्याची कबुली द्यायलाही एक धारिष्टय़ लागते. पण आपल्या संघटनेच्या जोरावर रेटून नेऊ अशा भ्रामक कल्पनेत राऊत यांनी व्यंगचित्रकाराला धमकी देऊन आणले आणि त्यांच्याकडून आधी दिलगिरी व्यक्त केली.
राऊतांचा मुजोरीपणा आणखी असा की, उद्धव ठाकरे यांनी गुडघे टेकल्यानंतर सामनामध्ये मात्र ‘माफीची’ ‘दिलगिरी’ झाली. नाक कापले त्याची खंत नाही. शिवसेनेचे सगळे राजकारण अतिशय दळभद्री झाले.
मराठा समाजाच्या मोर्च्याची आग किती दाहक आहे, याचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सामनाचे विश्वस्त आणि कसलाही राजकीय पोच नसलेले, महाराष्ट्राचे निरुद्योगी मंत्री, सुभाष देसाई यांनीही माफी मागण्याचा संबंध कुठे येतो, अशा थाटात वक्तव्य केले होते. पण जेव्हा मराठा समाजाकडून रेटा वाढतो आहे, माफी मागण्यापासून सुटका नाही, माफी मागितली नाही तर सेनेत फूट पडेल, हे जेव्हा जाणवू लागले तेव्हा दहा दिवसांनी माफी मागण्याची तयारी झाली. त्यात प्रामाणिकपणा नाही. माफी हे ढोंग आहे. माफी मागणा-याला दहा दिवस वाट पाहण्याची गरज नाही.
उद्धव ठाकरे मानभावीपणाने सांगतात.. ‘मी दहा दिवस याकरता थांबलो होतो की, कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्या मला बघायच्या होत्या’. उद्धव ठाकरे लोकांना मूर्ख समजतात. यात लोकांचा संबंध कुठेही नाही. अन्य नेत्यांचाही संबंध कुठेही नाही. संबंध होता तो सामनाचा. सामनाच्या मुजोर कार्यकारी संपादकाचा आणि विश्वस्तांचा. अंगठे धरून या दोघांना तुम्ही उभे करायला हवे होते. त्याऐवजी तुम्ही जे निवेदन करत आहात, ते निवेदन निव्वळ ढोंगी आहे, हे लोकांना कळते आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल तुम्हाला आत्मियता असती तर आघाडी सरकारने ज्या वेळी मराठा समाजाला, धनगर समाजाला, मुस्लीम समाजाला आरक्षण जाहीर केले, त्याचवेळी तुमच्या पक्षाचे सरकार नसले तरी पाठिंबा दिला असता. आता जेव्हा लाखोंचे मोर्चे निघत आहेत, तेव्हा मतांचा हिशोब करून तुम्ही सामनात बातम्या छापायचे ठरवले. पण तुमचा लबाड हेतू तुमच्याच व्यंगचित्राने उघडा केला. मराठा समाजाबद्दल, त्यांच्या मागण्यांबद्दल तुम्हाला उमाळा नव्हता. आता जे काही आहे, ती नाईलाजाची उबळ आहे. खरा उमाळा आणि उबळ यातला फरक समाजात सगळयांना कळतो.
सामनाच्या व्यंगचित्रात तुम्ही केवळ मराठा समाजातील भगिनींचीच बदनामी केली नाही, तर उरीच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचीही बदनामी केली आहे. मराठा समाजाची बदनामी करणा-या व्यंगचित्राला लागूनच हे शहिदांच्या बदनामीचे व्यंगचित्र आहे. त्यामुळे आता माफी मागून त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तरी माफी हे ढोंग आहे. नाईलाजातून व्यक्त झालेला तो पश्चाताप आहे. हे महाराष्ट्राला कळते आहे.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा उथळपणाही यानिमित्ताने उघड झालेला आहे. मराठा समाज बोलत नाही. म्हणजे तुम्हाला तो घाबरत आहे, असे समजू नका, तुमच्या कार्यकारी संपादकाने शिवसेना डुबवायची ठरवलेली आहे, ती डुबेलच, कारण लोक ढोंगाला थारा देत नाही. तुमची माफी हे ढोंग आहे. सामनाचा हेतू शुद्ध असता तर माफी मागायला दहा दिवस लागले नसते. चूक करून वरती मुजोरी करण्याचा हा धंदा लोक सहन करणार नाहीत. तुमचे माफीचे ढोंग उघडे झालेले आहे.