‘अखंड महाराष्ट्राबाबत विरोधी पक्षाची भूमिका दुटप्पीपणाची आहे’ असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात केला आहे. हा आरोप करताना त्यांनी राष्ट्रवादीवाल्यांना असे म्हटले आहे की, ‘स्वतंत्र विदर्भाबाबत शरद पवार यांची भूमिका काय आहे? स्वतंत्र विदर्भ व्हावा, असे तेथील जनतेला वाटत असेल तर आमचा विरोध नाही! काँग्रेसवर आक्षेप घेताना त्यांनी असे म्हटले आहे की, विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांची भूमिका वेगळी आहे. विधानसभागृहात भाजपा-शिवसेनेत भांडण लावण्याकरिता अखंड महाराष्ट्राचा मुद्दा विरोधक वापरत आहेत. त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी आहे.
मुख्यमंत्र्यांना दुटप्पी शब्दाचा अर्थ नेमका किती कळतो हे माहीत नाही. दुटप्पी म्हणजे दोन भूमिका. मुख्यमंत्री हे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी विधानसभेत असे सांगितले की, ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे’ त्यांच्या या वाक्यात बरीच फसगत आहे. ऑक्टोबर २०१४ ला फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून ते अखंड महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री आहेत.
प्रश्न ते अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की नाहीत हा नाही. ते मुख्यमंत्री असलेले हे राज्य अखंड राहील याची हमी देणारे शब्द त्यांच्या तोंडून विधानसभेत निघालेले नाहीत. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे हे पूर्ण?सत्य आहे, पण परिपूर्ण सत्य कोणते असेल तर, ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र अखंडच राहील, त्याचे लचके तोडले जाणार नाहीत, स्वतंत्र विदर्भ राज्य हा विषय अमलात येणं शक्य नाही’ असं ते बोलू शकतात का? आणि बोलले आहेत का? विरोधी पक्षाला ते ‘दुटप्पी’ म्हणाले, पण जेव्हा विरोधी पक्षावर दुटप्पीपणाचा आरोप मुख्यमंत्री करीत होते, तेव्हा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष कोणी रावसाहेब दानवे आहेत, ते शिर्डी?येथे सांगत होते की, योग्य वेळी विदर्भ?राज्य निर्माण होईल’ म्हणजे भाजपाचा अध्यक्ष एक बोलतो आहे, भाजपाचा मुख्यमंत्री दुसरंच बोलतो आहे, त्यामुळे प्रश्न असा आहे की, दुटप्पी नेमकं कोण?
खरी गोष्ट अशी आहे की, हे मुख्यमंत्री दुटप्पी आहेत. त्यांच्या मनात वेगळा विदर्भ?आहे हे त्यांनी लाख वेळा नाही म्हटले तरी हे लपून राहिलेले नाही. नितीन गडकरी असतील किंवा फडणवीस असतील, हे पक्के विदर्भवादी आहेत. जेव्हा विधानसभेत दबावामुळे ते ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे,’ असे म्हणतात त्यावेळी ते त्यांच्या मनाशी प्रतारणा करतात, त्याच वेळी छोटया राज्यांची निर्मिती ही भाजपाची भूमिका असल्याचेही सांगतात. एकाच निवेदनात त्यांचे तीन चेहरे दिसतात.
एक मनामधले फडणवीस, विदर्भाच्या बाजूचे, मुख्यमंत्री असल्याने नाईलाजाने अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचे मजबुरीने म्हणणारे फडणवीस दुस-या बाजूला, आणि छोटया राज्यांची आमच्या पक्षाची भूमिका मांडणारे फडणवीस असा त्यांचा तिसरा चेहरा! असे हे आपले अखंड महाराष्ट्र म्हणवणारे मुख्यमंत्री तीन चेह-यांचे आहेत. त्यांचे तीनही चेहरे केवळ दुटप्पी नसून तिटप्पी आहेत, त्यामुळे विधानसभेत त्यांनी जे काही निवेदन केलेले आहे, हे त्यांचे मजबुरीचे निवेदन आहे.
अखंड महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेला आता मागे फिरताच येणार नाही. कारण दोरच कापलेले आहेत, त्यामुळे एकतर लढून मरावं लागेल, नाही तर उडया टाकून मरावं लागेल. फडणवीस सरकार आजच्या घडीला तरी टकमक टोकावर आहे, अशा भूमिका घेणा-यांचा कडेलोट कधीही होऊ शकतो. एकीकडे अवघ्या दीड-दोन वर्षात भ्रष्टाचाराने हे सरकार कमालीचे बदनाम झालेले आहे. जे काँग्रेसला बदनाम करायला निघाले होते ते अवघ्या वर्षा-दोन वर्षात इतके बदनाम झालेले आहेत की, मोदींची हवा संपली हे आता वेगळं सांगायची गरज नाही.
गुजरातमध्ये आनंदीबेनच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत हे बघून आनंदीबेनला भांडी घासायला पाठवले, आता तिथे दुसरा मुख्यमंत्री आणायचा, त्याचा अर्थ?असा की, मोदी नावाच्या हवेवर गुजरातचे मतदार मतदान करतील असा विश्वास मोदींना राहिलेला नाही आणि म्हणून निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदर गुजरातमधली सगळी टोलमाफी जाहीर करून टाकली.
दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. एवढे होऊन सुद्धा गुजरातमधला पाटीदार समाज आणि दलित, मोदींच्या विरोधात सरकारला खाऊन टाकणार. जे गुजरातमध्ये होणार आहे तेच उत्तर प्रदेशात होईल. या उत्तर प्रदेशात ८० पैकी भाजपाचे ७३ खासदार निवडून आलेले आहेत.
तिथे विधानसभा जिंकण्यासाठी मोदी आणि अमित शाह लखनऊला तळ ठोकून बसले तरी, मायावतींचा हत्ती कमळाला पायाखाली तुडवून सायकलच्याही पुढे गेलाय. तीच अवस्था महाराष्ट्रात होईल, जेव्हा मोदींची लाट होती, तेव्हाही म्हणजे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला बहुमत मिळवता आलेले नव्हते, ते बहुमत न मिळाल्यामुळे जानकर, मानकर, तानकर असे सगळे एकत्र घेऊन कसं तरी सरकार बनलं.
आता सेनेच्या पाठिंब्यावर ते तगून आहे. सेना त्याची किंमत पुरेपूर वसूल करते आहे. एकीकडे लढाईचा आव आणायचा आणि तिकडे मुख्यमंत्र्यांवर विश्वास दाखवायचा. इकडे भाजपाचे अखंड महाराष्ट्र प्रेमाचे नाटक अडीच वर्षाकरिता आहे. मार्च २०१९च्या मार्चमध्ये लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव आणला जाणार आहे. त्यामुळे ‘देवेंद्र फडणवीस किती वेळा मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे’ असे ओरडले तरी त्यांच्या मनातली भावना जगाला माहीत झाली आहे.
जेव्हा लोकसभेत ठराव मंजूर होईल तेव्हा त्याला विरोध करण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली तर ते अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तिकडे महाराष्ट्राच्या पैशावर सगळं काही जमवून सजवून संसार मांडून पुरा झाला की, अक्षता टाकणार. गडकरी मुख्यमंत्री व्हायला तयारच आहेत. कारण उद्या विदर्भाच्या ४४ आमदाराचं गुप्त मत घेतलं तर, फडणवीसांच्या बाजूने ४ मतं नाहीत. ४० आमदार आहेत गडकरींचे. अगदी अर्थमंत्री मुनगंटीवार, वीजमंत्री बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, मंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री पोटे सगळे गडकरींच्या बाजूने हात वर करतील.
स्वतंत्र विदर्भ राज्यात फडणवीसांना विचारतो कोण? पण फडणवीसांचं काय व्हायचं ते होवो. आज ते दुटप्पी भूमिका घेऊन अखंड महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत. अगोदर त्यांनी श्रीहरी अणेंना वापरले, आता भाजपा अध्यक्ष दानवेंना ते वापरत आहेत. अणे विदर्भाचे आहेत, दानवे मराठवाडयातले आहेत. दानवेंच्या त्या भूमिकेवर मराठवाडयात उद्रेक होऊ शकेल, कारण मराठवाडयाची जनता कोणती अट न घालता संयुक्त महाराष्ट्रात सामील झालेली आहे.
इथे भाजपाचा अध्यक्ष, जे मराठवाडयातले आहेत, स्वतंत्र विदर्भाची भाषा बोलत आहेत, मुख्यमंत्री काळोख पडेपर्यंत अखंड महाराष्ट्राचे म्हणतात, काळोख पडल्यावर दोघेही (फडणवीस, दानवे) विदर्भाचे बोलतील, असे हे दुटप्पी आहेत. महाराष्ट्राने यांच्यावर विश्वास ठेवू नये.