यंदाचा ऑगस्ट महिना काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे लक्षात राहणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नेते करुणानिधींच्या मृत्यूनंतर सोमनाथ चटर्जी यांचं झालेलं निधन आणि त्याबरोबरच साहित्यक्षेत्रात नायपॉल यांचं झालेलं निधन या महत्त्वाच्या घटना आहेत. चटर्जी आणि नायपॉल यांनी आपापली क्षेत्रं कार्यकर्तृत्वानं गाजवली. राजकारण आणि साहित्यक्षेत्रात या महनियांनी दिलेल्या योगदानाविषयी.
लोकसभेचे तेरावे सभापती आणि भारतीय राजकारणात मोठं योगदान असलेले ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी यांचं निधन म्हणजे एका मातब्बर नेतृत्वाची अखेर होय. २५ जुलै १९२९ रोजी आसाममधील तेजपूर इथे जन्मलेले चटर्जी हे प्रामुख्यानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणूनच ओळखले जात होते. अखेरच्या दहा वर्षाच्या काळात त्यांनी पक्ष सोडून स्वतंत्रपणे काम केलं. २००४ ते २००९ या कालावधीत त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणून कामकाज केलं होतं. त्यांचे वडील निर्मलचंद्र चटर्जी हे नामांकित वकील होते. अखिल भारतीय हिंदू महासभेचे ते एक संस्थापक होते आणि काही काळ अध्यक्षही होते. १९४८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षावर बंदी घालून त्याच्या नेत्यांना अटक केली होती. त्यावेळी निर्मलचंद्र चटर्जी यांनी ऑल इंडिया सिव्हिल लिबर्टीज युनियनची स्थापना करून नेत्यांच्या सुटकेसाठी आंदोलन केलं होतं. या प्रक्रियेदरम्यानच ते ज्योती बसू यांच्या निकट आले. सोमनाथ चटर्जी यांच्यावर या सगळ्या घडामोडींचा त्यांच्या जडणघडणीच्या काळात परिणाम होत होता. कलकत्त्याच्या मित्रा इन्स्टिटय़ूशन स्कूलमधील शिक्षणानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून आणि नंतर युनिव्हर्सटिी ऑफ कोलकातामधून शिक्षण घेतलं. १९५२ मध्ये त्यांनी केंब्रिजमधील जिसस कॉलेजमधून बी. ए. तर १९५७ मध्ये एम. ए.ची पदवी मिळवली. त्यांनी कायद्यातील पदवी मिळवली. लंडनमधील मिडल टेंपलच्या बारनं त्यांना वकिलीसाठी बोलावलं होतं. राजकारणात सक्रिय होण्याआधी त्यांनी कोलकात्याच्या उच्च न्यायालयातही वकिली केली.
१९६८ पासून २००८ पर्यंतची तब्बल ४० र्वष त्यांनी मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं काम केलं. १९७१ मध्ये वडिलांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या बोलपूर मतदारसंघातील जागेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पािठब्यावर स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले आणि खासदार बनले. त्यानंतर लागोपाठ नऊ वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. १९८४ मध्ये फक्त एकदाच ममता बॅनर्जी यांच्या विरोधात त्यांना हार पत्करावी लागली. १९८९ पासून २००४ पर्यंत ते आपल्या पक्षाचे लोकसभेतील नेते होते. २००४ मध्ये ते बोलपूर मतदारसंघातून दहाव्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी २००४ पासून लोकसभेचे सभापती म्हणून काम केलं. २००८ च्या मध्यावर कम्युनिस्ट पक्षानं आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पक्षानं त्यांचं नाव सरकारचा पाठिंबा काढून घेणा-या सदस्यांमध्ये टाकलं. वास्तविक, ते त्यावेळी सभापती असल्यामुळे निष्पक्ष खासदार होते. मात्र अविश्वास ठरावावर पक्षाच्या बाजूनं मतदान करण्याचा पक्षाचा निर्णय न मानता त्यांनी या ठरावाच्या वेळी लोकसभेचे सभापती म्हणूनच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मतामुळे सरकार वाचलं आणि पक्षानं त्यांची शिस्तभंगाबद्दल पक्षातून हकालपट्टी केली.
‘तो आपल्या आयुष्यातील दु:खद दिवसांपैकी एक दिवस होता,’ असं चटर्जी यांनी म्हटलं होतं. आपल्या पदाच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली निष्पक्ष भूमिका पार पाडण्यासाठी यापुढे सभापतींनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे द्यावेत असं त्यांनी सुचवलं. त्याच दरम्यान त्यांचा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाला. अखेरीस २००८ मध्ये त्यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. राजकीय कारकिर्दीत त्यांना १९९६ मध्ये आउटस्टँिडग पार्लमेंटरियन अॅवॉर्ड देण्यात आले. २०१३ मध्ये त्यांना लििव्हग लिजेंड अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. आयुष्यातील वादग्रस्त प्रसंगांमध्येही त्यांनी आपलं मनोधर्य टिकवून ठेवलं. २००५ मध्ये झारखंड विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर टीका केली होती. त्यावेळी मोठाच वाद निर्माण झाला होता. याखेरीज शांतिनिकेतन श्रीनिकेतन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी विरोधकांनी केली होती. परंतु त्या पदामुळे आपल्याला कोणताही आíथक लाभ मिळत नसल्याचं दाखवून त्यांनी तो आरोप निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अत्यंत प्रामाणिक राजकारणी असाही त्यांचा लौकिक होता. २००४ मध्ये लोकसभेचे सभापती म्हणून ते सरकारी निवासस्थानात राहण्यास गेले. त्यावेळी चहा आणि स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी दिला जाणारा भत्ता त्यांनी नाकारला होता. याखेरीज परदेश दौ-यांच्या वेळी आपल्यासमवेत येणा-या कुटुंबीयांचा खर्चही ते स्वत: करत असत. म्हणूनच आदरणीय आणि तत्त्वनिष्ठ नेता अशी त्यांची कायमच प्रतिमा होती.
अलीकडेच लयाला गेलेलं दुसरं दखलपात्र व्यक्तिमत्त्व म्हणजे व्ही. एस. नायपॉल. वादग्रस्त, वादळी व्यक्तिमत्त्वाचे, परंतु स्वतंत्र मतप्रदर्शन करणारे प्रतिभावान लेखक म्हणून नायपॉल यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. नोबेल पारितोषिकानं त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं. ते नायपॉल या नावानं जगभर आणि विडिया या नावानं लंडनमध्ये प्रसिद्ध असले तरी त्यांचं पूर्ण नाव होतं विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल. १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदादमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विद्याधर नायपॉलही लेखक आणि पत्रकार होते. वडिलांमुळे नायपॉल यांना लेखनाची गोडी लागली. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. तेव्हापासूनच ते लंडनमध्ये राहू लागले. त्यांचं बालपण अतिशय विपन्नावस्थेत गेलं. विद्यार्थीदशेत आपली पहिली कादंबरी छापली जात नसल्यामुळे नराश्यग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यांच्या नंतरच्या वादळी प्रवासामुळे हे कदाचित आश्चर्यजनक वाटू शकेल. १९५५ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी पॅट्रिशिया अॅन हेल यांच्याशी लग्न केलं. नंतर पॅट्रिशिया यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानी पत्रकार नादिरा अल्वी यांच्याशी लग्न केलं.
१९५७ मध्ये लिहिलेली ‘द मिस्टिक मॅस्यूर’ ही त्यांची पहिली कादंबरी; त्यापाठोपाठ १९६१ मध्ये ‘अ हाऊस ऑफ मिस्टर विश्वास’ ही कादंबरी आली. ते त्यांचं सर्वात जास्त गाजलेलं पुस्तक होय. मात्र त्यानंतर १९७१ मध्ये आलेल्या ‘इन अ फ्री स्टेट’नं त्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळवून दिला. आफ्रिकेत केलेल्या त्यांच्या शोध मोहिमेतूनच या आणि ‘अ बेंड इन द रिव्हर’ या पुस्तकांचा जन्म झाला होता. त्यानंतर या अवलिया लेखकानं प्रवासवर्णनपर लेखनाला महत्त्व दिलं. त्यासाठी त्यांनी जगभर मनमुराद भटकंती केली. आलेले अनुभव परखडपणे मांडले. विशेषत: सांस्कृतिक दुभंगलेपणाच्या त्यांच्या लेखनातील वर्णनानं भल्या-भल्यांची झोप उडाली. भारतातील वेश्यावस्तीत फिरून गोळा केलेल्या वेश्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित ‘अॅन एरिया ऑफ डार्कनेस’चं असंच स्वागत झालं आणि ‘वुंडेड सिव्हिलायझेशन’ या त्यांच्या भारतीय इतिहासावरच्या पुस्तकांचा जगभर मोठा खप झाला. या पुस्तकांनी त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळवून दिली होती. ‘इंडिया : अ मिलिनियन म्युटिनिटीज नाऊ’ हे त्यांचं पुस्तकही असंच गाजलं होतं. त्यांची तीसहून अधिक पुस्तकं प्रसिद्ध झाली. इतिहासच नव्हे; तर वसाहतवाद, धर्म, संस्कृती, राजकारण आणि यासारख्या अनेक विषयांवर त्यांनी भरपूर लेखन केलं.
भारतीय दारिद्रय़ाचा जागतिक स्तरावर बाजार मांडून स्वत:ला मोठेपणा मिळवून घेणारा लेखक म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली. तशी ती सत्यजीत रे यांच्यावरही झाली होती. परंतु नायपॉल यांच्यातील अफाट साहित्यिकानं याकडे साफ दुर्लक्ष करून आपला लेखनप्रपंच सुरू ठेवला. १९९० मध्ये त्यांना नाईटहूड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर ते ‘सर नायपॉल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांना २००१ मध्ये साहित्यक्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यांच्या लेखनाचा बराचसा रोख टीकात्मकच होता. त्यामुळे ते सतत वादांमध्ये अडकत गेले. मात्र म्हणून त्यांचा स्पष्टवक्तेपणा कमी झाला नाही. नायपॉल यांनी इस्लामवर मोठी टीका केली होती. ख्रिश्चन धर्मापेक्षाही मुस्लीम धर्मामुळे भारताचं जास्त नुकसान झाल्याचं मत त्यांनी अनेकदा स्पष्टपणे मांडलं होतं. त्यामुळेच त्यांच्यावर मुस्लीमद्वेष्टेपणाचा आरोपही झाला होता. बाबरी मशीद जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर त्यांनी त्याविषयी अनुकूल मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. मात्र आपल्याला जे वाटतं ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता स्पष्टपणे मांडणं हे व्रत त्यांनी कायम ठेवलं. म्हणूनच त्यांनी भारतातील राजकारण्यांच्या भ्रष्टाचारावर आणि पाश्चात्यांच्या वसाहतवादी वृत्तीवर तितक्याच जोरात ताशेरे ओढले. साहित्याशी असलेली बांधिलकी त्यांनी कायम जपली. त्यामुळेच व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी कोणाचीही काहीही मतं असली तरी त्यांच्या साहित्यातील कामगिरीविषयी कोणाचंही दुमत नव्हतं.