जन्माला उगवत्या सूर्याची उपमा दिली, तर सकाळ, मध्यान्ह, संध्याकाळ अशा जीवनाच्या तीन अवस्था म्हणजे बालपण, तरुणपण व वृद्धावस्था होय. पण त्यांचा काळ मात्र बदलतो. कधी प्रास्ताविक उगीचच लांबावे तसे बालपण लांबते, तर कधी तरुणपणाच्या झुळझुळत्या झ-याचे गाणे, मंजुळवाणीत गावे तसे तरुणपण खुशीत असते. मात्र, हे तरुणपण पटकन खुशीत संपते.
उतारवय मात्र रेंगाळते, शरीराची साथ मिळेनाशी झाल्याने हळूहळू कुठल्यातरी काठीच्या आधाराने, कसेतरी ढकलले जाते. एक समज आलेली असते. पैलतीर दिसू लागलेला असतो. त्यामुळे त्या तिरप्या उन्हात, सावल्या मोठय़ा वाटू लागतात. डोळ्यात मोतीबिंदू आल्यामुळे किंवा मोतीबिंदू येऊनही फिकट डोळय़ांनी जीवनाचे महत्त्व स्पष्ट दिसू लागते. सूर्य नारायण नित्य नेमाने उगवा, अंधाराच्या दारी प्रकाश पाठवा म्हणत, उगवत्या सूर्याला सर्वच नमस्कार करतात. सावलीचा सूर्य आवडत नाही असे नाही, पण उगवत्या सूर्यात ऊर्जा असते. प्रसन्नता देण्याची शक्ती असते. अभावाचे जीवन जगणा-यांना, दगड धोंडय़ांना, सुवर्णमय करण्याची शक्ती सूर्यात असते. सूर्य हा सर्व विश्वाचा केंद्रबिंदू आहे व ऊर्जेचा स्त्रोत आहे.
आज निसर्गातील सर्व नसíगक ऊर्जेचे स्त्रोत, वापरण्याची वेळ आली आहे. वा-यापासून चालणा-या पवनचक्क्या, सूर्यचुली व नसíगक वातानूकुलता देणारी यंत्रे, जलयंत्रे वापरायला हवीत. निसर्गसुद्धा माणसाला किती भरभरून देतो, फुले, फळे यांची ती टोपली, शुद्ध हवा, निर्मळ पाणी तो परमेश्वर निसर्गाच्या हाती ठेवून मानवाला मुक्त हस्ते देतो.
नाही थकवा, कंटाळा नाही, इतुकी माया, कोठेची नाही
सोनेरी सूर्यकिरण जमिनीवर पसरवत, तो सूर्याचा तप्त लालजर्द गोळा, रोजच उगवतो. पण कंटाळा करीत नाही. नवीन आशा घेऊन येतो. नवीन आशा देऊन जातो जगण्यासाठी शक्ती देतो.
किती सुंदर आहे ही सकाळ, देवा दया तुझी ही शुद्ध दैव लीला
लागो ना दृष्ट माझी माझ्याच वैभवाला, नमस्कार माझा उगवत्या सूर्याला..