म्हातारपणी वाढत्या वयाबरोबर एक-एक शारीरिक ताकदी कमी कमी व्हायला लागते, तशी स्मरणशक्तीही कमी होत जाते, त्यातून स्मृतीभ्रंश, अल्झायमर असे रोग बळावण्याची शक्यता वाढते. तरुणपणी कष्ट करायला मागे न राहणा-या व्यक्ती म्हातारपण आलं की, मागे मागे राहायला लागतात. शरीराला काही इजा झाली, आजारपण आले, तर पुन्हा तंदुरुस्त व्हायला पूर्वीपेक्षा अधिक कालावधी लागायला लागतो. एखादी गोष्ट समजून यायला वेळ लागतो.
हालचाली मंदावतात, दृष्टी मंदावते, ऐकायला कमी येते अशा अनेक गोष्टी नको असतील तरी होतात. दोषदुरुस्तीसाठी आजारावर उपचार करून घेणे, चष्मा लावणे जितके सरसकट झाले आहे, त्यामानाने श्रवणयंत्र वापरून ऐकण्यातला दोष दुरुस्त करणे तितके सरसकट झालेले नाही. १९९७ पासून २०१३ पर्यंत अमेरिकेतील – हेल्थ ए बी सी स्टडी-चे डॉ. फ्रँक्लीन आणि त्याच्या सहका-यांनी पिटरबर्ग आणि मेंफीस येथे १९८४ वृद्धांचा अभ्यास केला, त्यांच्या-मानसिक आणि अंकीय – परीक्षा नियमितपणे घेतल्या, त्या परीक्षांची नोंद पद्धतशीरपणे ठेवली. २००२ पासून या वृद्धांच्या श्रवणशक्तीची मोजणीही चालू ठेवली. डॉ. फ्रँक्लीन यांना असे आढळले की, श्रवणशक्ती कमी झालेल्या वृद्धांची स्मरणशक्तीही त्या प्रमाणात कमी झाली.
एक म्हणजे – ऐकू येईनासे झाले की, त्या व्यक्तीचे लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाण कमी होत जाते. इतरांशी संवाद होत असताना, आपल्या स्मरणशक्तीला सतत चालना मिळत असते, ती थांबते. दुसरे म्हणजे – शरीरातील ऊर्जा ऐकणे या कामी अधिक खर्च करावी लागल्याने, अन्य शारीरिक कृतींना कमी उरते. त्यातून मंदपणा आणि विस्मरण वाढायला लागते. शरीरात स्मृतीभ्रंश, अल्झायमर असे रोग बळावण्याची शक्यता वाढते. ध्वनिप्रदूषणामुळे किंवा इअरफोनचा वारेमाप उपयोग केल्यामुळे श्रवणदोष निर्माण झालेल्यांनाही शरीरातील ऊर्जा ऐकणे या कामी अधिक खर्च करावी लागत असेल, तर त्यांनाही स्मृतीभ्रंश, अल्झायमर होण्याचा धोका नाकारता येणार नाही.