घर उभारले म्हणजे जीवनात काही सर्व काही पार पाडले असे नाही. त्याची सुरक्षितता महत्त्वाची असते. घराचे भूमिपूजन केल्यानंतरही तिथे जागता पहारा ठेवावा लागतो. कारण अद्भुत शक्तीही तिथे वावरत असतात. भूमिपूजन म्हणजे कोकणी भाषेत सांगावयाचे झाले, तर तिथे ‘खुंटी मारणे’ म्हणतात. एकदा का खुंटी मारली की, तिथे घर पूर्णत्वास येईपर्यंत तिथे जागता पहारा ठेवावा लागतो. तिथे नंदादीप कायमच लावला जातो. निदान दिवसभरात लावता आला नाही तरी चालेल; परंतु कातरवेळी तिथे दिवाबत्ती केलीच पाहिजे, असा रीतीरिवाज आहे.
नुसतीच दिवाबत्ती करावी, असे नसून तेथील देवतांसमवेत तिथे जागता पहारा ठेवणेही काळाची गरज असते. ग्रामीण भागात सर्रास भानामतीचे प्रकार घडविले जातात. तिथे काही तरी लिंबू, कांदे आणून टाकायचे, हळद, पिंजर लावलेली वस्तू टाकावी आणि तिथे तेढ निर्माण करणे हे कृत्य करण्यामागचा विघ्नसंतोषी माणसांचा हेतू असतो. त्यामुळे घर बांधणारा जो मालक असतो तो कुठेतरी वाईट शब्द उच्चारतो आणि तिथेच हे घर बांधताना क्लेश निर्माण होण्यास प्रारंभ होतो. ही झाली घर बांधतानाची सुरुवात. घर बांधतानाच जर विघ्न आले, तर ते पूर्ण होईपर्यंत सतराशे साठ विघ्ने समोर आडवी येतात आणि त्यातच घर बांधणारा गुरफटून जातो.
घर बांधताना ती जागा शूचिर्भूत असावी, असा प्रत्येकाचा मानस असतो. त्यामुळे आपले घर सुरक्षित कसे राहील, यासाठीच प्रत्येकजण झटत असतो. त्यासाठी त्याने घराची रचनाही तशीच सुरक्षितदृष्टय़ा कशी असावी, याचा अभ्यास केलेला असतो. पूर्वीच्या घरांमध्ये पैसे कमीच असायचे. पण, दागदागिने, अन्नधान्य असायचे. त्यामुळे दरोडा पडला, तर तो दागदागिन्यांवर आणि अन्नधान्यावर. काही ठिकाणी गुरे ढोरेही असायची, तर बैल, गाय चोरीचेही प्रकार घडत असत. ग्रामीण भागात एक-दीड किलोमीटर अंतरावर घरे असायची. त्यामुळे या घरात काय घडले, ते दुस-या दिवसाशिवाय काहीही कळत नसायचे. गावोगावी रस्ते नसायचे. पण, आता ती परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. आता तर चोरटय़ांनाही मोकळे रस्ते प्राप्त झाले आहेत. धूम स्टाईलने गाडय़ाही उडविता येतात. त्यामुळे एखादे ठिकाण गाठायचे झाल्यास तो सहज गाठू शकतो.
चोरटेही आता तल्लख बुद्धीचे आहेत. चोरी करायची झाली, तर प्रथम वीज खंडित केली जाते. सीसीटीव्ही फुटेज तपासले जातात म्हणून सीसीटीव्ही कॅमे-यांची कॉर्डच कापली जाते. त्यामुळे तेथील घटनेचे चित्रण होऊ शकत नाही. या सर्वाचा परिणाम घरमालकाला भोगावा लागतो. काही ठिकाणी अमुक वेळा अमुक घर बंद असते. आसपासच्या परिसरात तिथे चिटपाखरूही नसावे, असा अंदाज बांधून चोरटे त्या घराकडे लक्ष्य करतात आणि आपला कार्यभाग उरकतात.
अशा वेळी आपल्या घराच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. घराच्या प्रवेशद्वारावरच किमान ५० फुटांच्या अंतरावर सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर असावी. मग तिथून तो काहीही करूदेत. घराच्या दरवाजाला बहिगरेल भिंग असावेच; परंतु, ते स्पष्टपणे दिसणारे असावे. घरातून दरवाजाबाहेर असलेली व्यक्ती स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. घराला लॅच असावे. कारण, घराचे लॅच लावल्यानंतर बाहेर कडी लावण्याची गरज नसते. त्यामुळे घरात कोणीतरी आहे, असे समजून तिथे घर लक्ष्य केले जात नाही.