चाळीचं स्वरूप आज बदलत आहे. माणसाच्या वाढत्या गरजा आणि मोठं होण्याचं स्वप्न पाहता नव्या घरांची आखणी केली जाते. टॉवरमध्ये राहून होणा-या स्वप्नपूर्तीपुढे चाळीतील घरं ठेंगणी वाटत असली, तरी तिथे जपल्या गेलेल्या आठवणी, चाळीचं रूप हे माणसांना विसरता येण्याजोगं नाही.
घराचं स्वरूप निरखताना चाळीच्या माध्यमातून घरांचा वेध घेतला, तर आज चाळीतून जी माणसं टॉवरमध्ये राहण्यास गेली असतील, स्वत:चे फ्लॅट घेऊन सेटल झाली असतील, त्यांच्या मनात चाळीबद्दलच्या आठवणी रुंजी घालणा-याच ठरणा-या आहेत.
चाळीतले सण-समारंभ, चाळीतल्या आठवणी, शेजारी, चाळीतल्या मित्र-मैत्रिणी, सार्वजनिक उत्सव, हळदी-कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांची बर्थ डे पार्टी, आदी अतूट बंध, सलोखा हा चाळीत जपला गेलेला असतो. पु. लं. देशपांडे यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’ मधील चाळीचा उल्लेख, तिथलं वातावरण चाळीच्या वातावरणाचं दर्शन घडवणारा. आनंद, दु:ख, विनोद, गाण्यांच्या मैफली, गाण्यांच्या भेंडय़ा, एकत्र बसून गप्पा मारणं, नळावरील पाणी भरताना होणारी किरकोळ भांडणं, मात्र पुन्हा एकत्र होणारी कुटुंबं ही चाळीतील सलोख्याचेच दर्शन घडविणारी. एकत्र कुटुंबपद्धतीचा साक्षात्कारही चाळीतच घडणारा..
चाळ नात्यांचा बंध जपणारी तर चाळीतून स्थलांतर झालं की पुन्हा तिथल्या आठवणी जागृत होणा-या. आजच्या गगनचुंबी इमारतींमध्ये चाळींचं स्वरूप हे खूपच छोटेखानी असलं तरी माणसांच्या गृहप्रवेशाची ती सुरुवात म्हणून कष्टाच्या खोलीची ती पहिली आठवण असते.
मुंबईमध्ये चाळींमध्ये वास्तव्य करणारी अनेक कुटुंबे आजही एकोप्याने राहताना दिसतात. चाळ हे वास्तूचे एक रूप, घरातील नात्यांचा एक बंध म्हणून गणले गेले आहे. चाळींना विशिष्ट अशी नावे दिली जातात. आपल्या नावांनी वैशिष्टय़पूर्ण ठरणारी नावे कधी आराध्य देवता, तर कधी स्मृती दाखलही देण्यात आलेली असतात. चाळ संस्कृती ही फार जुनी आहे. मात्र या जुन्याला नवा टच म्हणून चाळींच्या जागी उभ्या होणा-या गगनचुंबी इमारती या चाळीचं रूप लोप पावणा-या ठरतात.
सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवांच्या निमित्ताने चाळीतील युवा वर्ग हिरीरीने सहभागी होताना दिसतो. उत्सवाचे रंग चाळीतच अनुभवावे, चर्चाचा माहोल चाळीतच गुंफावा, मैफली, सुरावटी, स्त्रियांच्या गप्पा-टप्पा, त्यांचे संवाद, आपुलकीचे बंध शब्दातच बांधावेत असे चाळीतील क्षण ज्यांनी अनुभवले असतील त्यांच्या आठवणीही जपल्या जाणा-याच. चाळीतील घरांचे दरवाजा दिवसभर उघडे असतात. त्यामुळे माणसामाणसांतील संवाद ओघानेच सुरू राहतो.
चाळीचं स्वरूप आज बदलत आहे. माणसाच्या वाढत्या गरजा आणि मोठं होण्याचं स्वप्न पाहता नव्या घरांची आखणी केली जाते. टॉवरमध्ये राहून होणा-या स्वप्नपूर्तीपुढे चाळीतील घरं ठेंगणी वाटत असली तरी तिथे जपल्या गेलेल्या आठवणी, चाळीचं रूप हे माणसांना विसरता येण्याजोगं नाही. विशेषत: चाळीमध्ये बरीच वष्रे वास्तव्य केलेल्या वयोवृद्ध माणसांच्या आठवणी या चाळीतच सामावलेल्या असतात. चाळीतील गप्पांचा कट्टा, वाचनालये, वृद्ध मंडळींचे एकत्र येणे, त्यांच्यातील संवादाचा टप्पा, कधी एकत्र फिरणं, कधी निमित्त काढून एकत्रितपणे भोजनाचे आलेले प्रसंग आदी अनेक घटना प्रसंग कधी आनंदाचे तर कधी दु:खाच्या प्रसंगातूनही उमटून गेलेले असतात.
कधी सासू-सुनेच्या तक्रारींचा सूर तर कधी शेजारी उडालेले खटके आदी चांगल्याबरोबरच अनेक घटनांची साक्षीदार असते ती चाळ. घराची, स्वभावाची, चेह-यांची, संस्कृतीची ओळख घडविणारी ‘चाळ’संस्कृती आजही वास्तव्याचा अनुभव देणारी ठरते.