मुंबई – पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर उद्भवणा-या विविध आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यू व मलेरियाने मुंबईकरांना सावज बनवण्यास सुरुवात केली असून डेंग्यू व मलेरियामुळे दोन जण दगावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, डेंग्यूचे अडीच हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने लेप्टोसोबत डेंग्यूचीही साथ वेगाने पसरत आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ांपर्यंत लेप्टोच्या रुग्णांची संख्या ११८ होती. या वेळेस मात्र ही संख्या १३० पर्यंत गेली असून आत्तापर्यंत ९ जण दगावले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात चेंबूर येथील टिळकनगर भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. संबंधित रुग्णाला साधारण १० ते १५ वर्षापूर्वी क्षयरोग झाला होता आणि व्यसनाच्या आहारी गेलेला होता. ४ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर टिळकनगरमधील ५०० घरांची तपासणी केली असून तिथे लेप्टोचे आणखी पाच संशयित रुग्ण आढळले.
कुल्र्यातील अशोकनगर भागातील ३७ वर्षीय महिलेचा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झाला. डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची या पावसाळ्यातील ही पहिलीच घटना असून त्यानंतर अशोकनगर भागातील सुमारे ५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथील पाण्याच्या सहा टाक्यांमध्ये डेंग्यू पसरवणा-या डासांच्या अळ्या दिसून आल्या. तपासणीदरम्यान डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले असून त्यांना पुढील उपचारांसाठी पालिका रुग्णालयात पाठविण्यात आले. वरळी कोळीवाडा भागातील ५२ वर्षाच्या व्यक्तीचा मलेरियामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मृत्यू झाला.
या पावसाच्या काळातील मलेरियामुळे झालेला पहिलाच मृत्यू आहे. घरकाम करणारी ही व्यक्ती जुलैच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये अलिबाग येथे गेली होती. तेथून आल्यानंतर ताप आल्याने जवळील डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू होते. मात्र ताप कमी न झाल्याने जवळील पालिका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी गेल्यानंतर मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले. आठवडाभरात प्रकृती गंभीर झाल्याने त्यांचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर कोळीवाडा भागातील ५३९ घरांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये तापाचे तीन रुग्ण आढळले.