ठाणे – वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता. या नंतर एमएसआरडीसीने तत्काळ पावले उचलली असून ऐरोली किंवा मुलुंड यापैकी एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची सूट वाहनचालकांना दिली आहे.
ठाणे शहरात प्रवेश करताना मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावरील टोलवसुलीमुळे पश्चिम द्रुतगती मार्गासह सबंध ठाणे शहरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हे टोलनाके बंद करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी मध्यंतरी आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा टोल वसुली सुरूच ठेवण्यात आलेली असल्याने शनिवारी १८ ऑगस्ट रोजी परांजपे यांनी एमएसआरडीसी आणि स्थानिक पोलिसांना पत्र देऊन सोमवारी उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
या नंतर एमएसआरडीसीने तत्काळ सूत्रे हलवून एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची मुभा वाहनचालकांना दिली आहे. एमएसआरडीसीने दिलेल्या आदेशानुसार मुलुंड टोल नाक्यावर पैसे भरल्यास ती पावती ऐरोली टोलनाक्यावर दाखवून मोफत जाता येईल किंवा ऐरोली टोल भरल्यास मुलुंड टोल नाक्यावर पैसे घेण्यात येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणीदेखील रविवार १९ ऑगस्ट पासून सुरु करण्यात आली आहे.