छोटा शकीलच्या हस्तकाला भारताच्या ताब्यात न देता अरबदेशाने थेट पाकिस्तानला पाठवला. आपण प्रत्यार्पणाची अपेक्षा बाळगत वाट पहात आहोत. पण अमेरिकेने त्यांच्यावर हल्ला करणा-या लादेनच्या प्रत्यार्पणाची वाट न पाहता हल्ला केला होता, यापासून आम्ही बोध घेणार का?
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार गँगस्टर दाऊद इब्राहिम तब्बल २५ वर्षानंतरही मोकाटच आहे. जरी दाऊद पकडला गेला तरी प्रत्यार्पण कायद्याची अंमलबजावणी होता-होता व शिक्षा मिळेपर्यंत ६२ वर्षाच्या दाऊदला नैसर्गिक मृत्यू येऊ शकतो. म्हणून अमेरिकेने जशी लादेनवर कारवाई केली तशीच भारताने देखील दाऊदवर धडक कारवाईच केलेली उचित ठरेल.
१९८० च्या दशकात उदयास आलेल्या दाऊदने खंडणी, हफ्ता वसुली व खुनाची सुपारी घेण्याबरोबरच अनेक अवैध व्यवसायाने आपल्या काळ्या दुनियेचे साम्राज्य वाढविले. ‘बॉलिवूड’ अर्थात हिंदी चित्रपटाच्या चंदेरी दुनियेलासुद्धा त्याने स्वत:च्या तालावर नाचविले. १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधार असलेल्या दाऊदने बॉम्बस्फोटापूर्वीच दुबईला पलायन केले. दाऊदने छोटा राजन व छोटा शकील या आपल्या विश्वासू साथीदारांच्या मदतीने ‘डी’ कंपनीमार्फत मुंबईसह भारतात व दुबईमध्ये अवैध व्यवसायाबरोबरच रियल इस्टेट (बांधकाम क्षेत्र) मध्येही आपला पाय रोवला. दरम्यान मुंबईतील खंडणी, हफ्ता वसुली व खुनाची सुपारी घेणे तसेच विरोधी पठाण टोळीबरोबर खुनाच्या बदलाचे सत्र चालूच होते. छोटा राजनची इच्छा नसतानादेखील त्यास दाऊदने दुबईतील काळ्या कारभाराची जबाबदारी सोपविली. तर मुंबईसह भारतातील काळ्या साम्राज्याची धुरा दाऊदने अबू सालेम याच्याकडे दिली. तेव्हापासूनच छोटा राजन आणि दाऊद या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. यानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळे होण्यासाठी अज्ञातस्थळी गेला. छोटा शकील यांस हेच पाहिजे होते. आपोआपच दुबईतील ‘डी’ कंपनीची जबाबदारी त्याच्यावर आली.
अमेरिकेबरोबरच संयुक्त राष्ट्र संघानेही दाऊदचा दहशतवादी संघटनांशी अप्रत्यक्ष संबंध जोडला. तसेच २०११ मध्ये जगातील कुप्रसिद्ध अपराधींच्या यादीत दाऊदचे नांव आल्यावर त्याला दुबईमध्ये राहणे अशक्य झाले. त्यामुळे तेथून पलायन करून दाऊदने पाकिस्तानातील कराचीमध्ये आश्रय घेतला. गुन्हेगारी व अवैध व्यवसायांबरोबरच आजही दाऊद व त्याच्या टोळीकडून क्रिकेट सट्टेबाजी आणि ‘आयपीएल’मध्ये स्पॉटफिक्सिंग केले जात असल्याचे बोलले जाते. मागील वर्षी दक्षिण मुंबईतील दाऊदच्या स्थावर मालमत्ता लिलाव पद्धतीने विकण्याचा शासनाने निर्णय घेतला, त्यावेळी बोली लावणा-यालाही दुबई व कराचीतून धमकीचे फोन आले. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननसहित काही गुन्हेगारांना भारतीय न्यायालयाने फासावर चढविले तर अबू सालेम यांस जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. छोटा राजन सध्या पोलिसांच्या अटकेत आहे; परंतु दाऊद इब्राहिमने मात्र मात्र पाकिस्तानच्या आशीर्वादामुळे कराचीमध्ये आश्रय घेतला आहे. गेल्या दोन वर्षात अर्धागवायूचा झटका आल्याने तसेच पायाला गँगरीन झाल्याने दाऊदला उपचारासाठी कराचीतील ‘लियाकत’ या मोठय़ा रुग्णालयात भरती व्हावे लागले. या वृत्ताचे छोटा शकीलने खंडन केले असले तरी याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमार्फत वृत्त प्रसारित झाले होते. तरीही भारतीय गुप्तहेर संघटनेस दाऊदला पकडण्यास अपयश का येते आहे याचे रहस्य सर्वसामान्य भारतीय नागरिकांना न उकलणारेच आहे. २०१४ मध्ये मुंबईतील एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, ‘आपला मृत्यू झाल्यावर मुंबईतील चर्नी रोडवरील बडा कब्रस्थान येथे आई-वडिलांच्या कबरीपुढे आपल्या मृतदेहाची कबर बांधावी अशी दाऊदने इच्छा व्यक्त केली आहे. दाऊदला पकडण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या इच्छेप्रमाणे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण भारतभूमी अपवित्र करण्यापेक्षा त्याला यमसदनी धाडणे चांगले होईल.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकन सुरक्षा दलातील विशेष अधिका-यांनी इराकच्या सद्दाम हुसेनला जमिनीखालील भुयारातून शोधून त्याला जायबंदी करून फासावर लटकविले. तर २०११ मध्ये अमेरिकेतील ‘वल्र्ड ट्रेड सेंटर’ वरील विमान हल्ल्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकन कमांडोंनी काही अंतरावर पाक लष्कराची सीमारेषा असताना त्यांना चाहूल लागू न देता पाक व अफगाणच्या सीमारेषेवरील आबोटाबाद येथे धडक कारवाई करून दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या कपाळात गोळी घालून त्याला यमसदनी पाठविले. पाकिस्तानात जाऊन दाऊदला पकडून त्यास भारतात आणून फासावर लटकविले तर ही भारतीय गुप्तहेर संघटना, भारतीय सुरक्षा दलातील विशेष कमांडो टीम आणि सत्तेवर असलेल्या सरकारचे हे मोठे यश असेल. पण गंमत म्हणजे अतिशय किचकट असलेल्या प्रत्यार्पण कायद्याची प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण करून भारत सरकार अजून बँकांना बुडविणा-या विजय मल्ल्याला लंडनहून भारतात आणू शकले नाही. तेव्हा दाऊदला पकडले तरी प्रत्यार्पण कायद्याची अंमलबजावणी करता-करता आणि त्यास शिक्षा जाहीर होईपर्यंत किती काळ लोटला जाईल हे सांगता येणे कठीणच आहे.
कुशल रणनीती व सक्षमता असल्यानेच भारतीय सुरक्षा दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. अशाच प्रकारे भारतीय सुरक्षा दलातील विशेष कमांडो टीमने पाकिस्तानात जाऊन धडक कारवाई करून दाऊद इब्राहिमला त्याच्या पापांचा धडा शिकवत थेट यमसदनी पाठविले तर मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील २५७ मृतात्म्यांना ख-या अर्थाने श्रद्धांजली व त्यांच्या नातेवाइकांना न्याय मिळेल. म्हणजेच दाऊदच्या बाबतीत ‘ना रहेगा बाज, ना रहेगी बांसुरी’ अशीच धडक कारवाई करणे योग्य ठरेल.