१५ ऑगस्ट २०१८ रोजी आपल्या भारत देशात ७२वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होऊन; दिवसभर फडकणारा देशाचा तिरंगा झेंडा सूर्यास्ताला जाण्यापूर्वी सन्मानपूर्वक खाली उतरल्यानंतर रात्री ९.३०च्या सुमारास देशाला एका क्रिकेटपटूला मुकावे लागले. त्या क्रिकेटपटूचे नाव अजित लक्ष्मण वाडेकर होय. क्रिकेटपटू व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचा जन्म १ एप्रिल, १९४१ रोजी बॉम्बे (आताची मुंबई) मध्ये झाला. तर १५ ऑगस्ट, २०१८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. क्रिकेटपटू अजित वाडेकर यांना ७७ वर्षाचे आयुष्य लाभले.
त्यांच्या जन्मानंतर इंजिनीअर व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र क्रिकेट खेळामध्ये त्यांना जास्त रस निर्माण झाल्यामुळे ते क्रिकेट खेळाकडे वळले. अजित वाडेकर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वयाच्या १७ व्या वर्षी मुंबई संघात पदार्पण केले. यामध्ये डावखुरा फलंदाज व उत्तम फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी १३ डिसेंबर, १९६६ रोजी वेस्ट इंडिज देशाबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. एक क्रिकेटपटू व भारतीय संघाचा कप्तान या नात्याने १९७१ हे वर्ष अजित वाडेकर यांच्या जीवनातील ‘यशस्वी वर्ष’ म्हणून गौरव करावा लागेल. कारण या वर्षात इंग्लंड व वेस्ट इंडिज या देशात जाऊन त्यांनी कसोटी मालिकेवर आपल्या देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. अर्थात त्या देशावर विजय मिळविला. आज मात्र इंग्लंड देशात आपल्या भारतीय कसोटी संघाचा दारूण पराभव होत आहे, ही चिंतेची बाब आहे. मात्र, क्रिकेट हा परदेशी खेळ असूनसुद्धा त्या काळात त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी आपला ठसा उमटविला, असेच म्हणावे लागेल.
क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या भारतीय क्रिकेटच्या कारकिर्दीचा विचार केल्यास, त्यांनी कसोटीमध्ये ३७ सामने खेळले असून ३१.०३ च्या सरासरीने २११३ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा आणि चौदा अर्धशतकांचा समावेश आहे. १३३ ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. उत्तम प्रकारे त्यांनी ४६ झेल टिपले आहेत. याचबरोबर ते एक उकृष्ट स्लीप फिल्डर म्हणून प्रसिद्ध होते. एकदिवशीय सामन्यामध्येसुद्धा त्यांनी कप्तान व खेळाडू अशी दुहेरी भूमिका बजावली. एकदिवशीय पहिला सामना १९७४ साली इंग्लंडमध्ये लॉडर्सवर खेळला गेला होता. वाडेकर यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवशीय सामने २ खेळले आहेत. यामध्ये ३६.५०च्या सरासरीने ७३ धावा केल्या असून एका अर्ध शतकाचा समावेश आहे. यातील सर्वोत्तम धावसंख्या ६७ आहे, तर एका झेलाचाही समावेश आहे.
क्रिकेटपटू वाडेकर त्यांनी क्रिकेट खेळाला सलाम करून सुद्धा एक उत्तम प्रशिक्षक, कर्तव्यदक्ष व्यवस्थापक आणि एक कार्यक्षम निवड समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाची दखल भारत सरकारने घेऊन त्यांना १९६७ मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर १९७२ साली पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या तरुण क्रिकेटवीरांनी त्यांचा आदर्श घेऊन आगेकुच केली पाहिजे आणि विजयासाठी धडपडणा-या भारतीय संघाने तिसरी कसोटी जिंकून त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगे प्रसाद, विपुल आणि मुलगी कश्मिरा असा परिवार आहे.
आज, त्यांचे पार्थिव त्यांच्या स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंट, वरळी सी.फेस येथील निवासस्थानी सकाळी १० वाजता क्रिकेटप्रेमींच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी १२ वाजता दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशा या देदीप्यमान क्रिकेटपटू व माजी कर्णधाराला तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीने भावपूर्ण आदरांजली!