सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीसोबत असलेल्या छायाचित्रात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची छबी पाहायला मिळाली. धोतर, कुडता, त्यावर जाकीट आणि डोक्यावर १८० अंश कोनातली गांधी टोपी असा पेहराव हरिभाऊंच्या अंगावर होता. पूर्वी गांधी टोपीला महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व होते. पण गेल्या काही वर्षात ही राजकीय टोपी हद्दपार होत असल्याचे पाहायला मिळते आहे.
१९९० सालच्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकणार नाहीत, फक्त शरद पवारच शिवसेना-भाजप युतीचे आव्हान मोडून काढू शकतात, असा गुप्तचरांचा अहवाल मिळाला.
१९८६ साली दोन्ही काँग्रेसचा हा विलीनीकरण सोहळा औरंगाबाद येथे पार पडला होता. पुढे १९८८ साली राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना केंद्रात आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले आणि शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपविले. अट एकच होती, ती म्हणजे पवारांनी युतीचा पराभव करून काँग्रेसला सत्तेवर आणायला हवे. स्वत:च्या राजकीय ताकदीवर पूर्ण विश्वास असलेल्या पवारांनीही ही अट स्वीकारली.
जुन्याजाणत्या काँग्रेस नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले. यात अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणजे मधुकरराव चौधरी. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात पवारांनी मधुकररावांना पणाला लावले. मधुकररावही निवडून आले. त्यानंतर त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मधुकरराव कट्टर गांधीवादी. त्यांचाही पेहराव धोतर, कुडता, जाकीट आणि डोक्यावर अणुकुचीदार टोपी असाच होता. मधुकररावांनंतर गांधी टोपीला न्याय देणारे हरिभाऊ बागडे हे तब्बल २४ वर्षानंतर महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष म्हणून लाभले. ९० सालानंतर १९९५ साली पुन्हा काँग्रेसचा पराभव करून सेना-भाजप युती सत्तेवर आली. युतीने विधानसभा अध्यपदाची जबाबदारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांच्यावर सोपविली. पण दत्ताजींनी आपल्या कार्यकाळात कधीही टोपी परिधान केली नाही. १९९९ साली युतीचा पराभव करून पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सत्तेवर आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब कुपेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद सोपविण्यात आले. कुपेकर यांनीही टोपीला अजिबात थारा दिला नाही. त्यांच्यानंतर दिलीप वळसे-पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष झाले, पण त्यांनीही टोपीशी जमवून घेतले नाही. १९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सत्ता आली. ती तब्बल २०१४ पर्यंत काँग्रेस आघाडीकडेच होती. एवढय़ा प्रदीर्घ काळात बाबासाहेब कुपेकर आणि दिलीप वळसे-पाटील यांनीच विधानसभा अध्यक्षपद भूषविले. अखेर २०१४ साली भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले आणि हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने टोपीला प्रदीर्घ काळानंतर न्याय मिळाला.
महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या डोक्यावरची टोपी यांच्यात जणू भावनिक जिव्हाळ्याचेच नाते असावे. टोपीशिवाय यशवंतराव ही कल्पनाही त्या काळात कुणी करू शकला नसता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असो, दिल्लीत गेल्यावर तिथे भूषविलेल्या वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालयांचा ताण असो, यशवंतरावांनी टोपीला कधीही अंतर दिले नाही. परदेश दौ-यावर जाताना चव्हाणसाहेब ओव्हरकोटसारखा बंद गळ्याचा पण गुढघ्याच्या खालीपर्यंत लांब असा कोट घालायचे, पण त्या ड्रेसवरही त्यांच्या डोक्यावर त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काहीशी तिरकी अशी टोपी विराजमान असायचीच. टोपीत ज्यांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे खुलून दिसायचे, ते महाराष्ट्रातील एकमेव नेते म्हणजे राजारामबापू पाटील. धोतर, कुडता, वर जाकीट आणि डोक्यावर तिरकी टोपी असा बापूंचा दैनंदिन पेहराव असायचा. गोल, हसरा चेहरा लाभलेले बापूंचे रूप एकदम खुलून दिसायचे. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील आणि टोपीचा, मात्र छत्तीसचा आकडा होता. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर १९८६ साली वसंतदादा दुस-यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंत्रालयाचा गावबाजार करणारा नेता असे त्या काळात दादांबद्दल चेष्टेने बोलले जायचे. कारण दादांनी मंत्रालयाला आव-जाव घर तुम्हारा असेच स्वरूप दिले होते. त्यामुळे सकाळी १० च्या ठोक्याला मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालयात यायचे, त्याचवेळी आपापली कामे घेऊन येणा-या आम लोकांच्या झुंडीही मंत्रालयात घुसायच्या.
दादांनी मंत्रालयात येण्या-जाण्याचे सगळे निर्बंधच उठवले होते. १९८५ साली मुख्यमंत्रीपद सोडून वसंतदादा राजस्थानला राज्यपाल म्हणून गेले आणि शंकरराव चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. अतिशयोक्ती नाही, पण शंकररावांच्या रूपाने मंत्रालयाला अत्यंत कडक हेडमास्तरच लाभले. सकाळी १० वाजताच कर्मचा-यांनी सही करण्याची मस्टर्स संबंधित खात्यांच्या प्रमुखांकडे परत जाऊ लागली. लोकांनी मंत्रालयात येण्याची वेळ सकाळी १० ऐवजी दुपारी २ ची करण्यात आली. शंकररावांचा वेषही धोतर, कुडता, वर जाकीट आणि डोक्यावर टोपी असाच होता. पण शंकररावांची टोपी दोन्ही कानांच्या किंचित वरच्या बाजूला काहीशी फुगीर असायची. त्यामुळे तिला थोडासा गोलसर आकार आल्याचेही भासायचे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ज्यांची वाहवा केली जाते त्या शरद पवार यांना दुधाइतकाच टोपीचाही तिटकारा असावा. पवार साहेबांनी डोक्यावरही कधी टोपी घातली नाही. ते अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण मुख्यमंत्रीपदाच्या काळात झेंडावंदनाच्या मुख्य सोहळ्यात त्यांच्या हस्ते झेंडावंदन व्हायचे, त्यावेळीच पवारांच्या डोक्यावर काय ती टोपी दिसायची. वसंतदादा आणि नाशिकराव तिरपुडे यांचे मंत्रिमंडळ पवारांनी पाडले तेव्हा त्यांना सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे या तीन मंत्र्यांनी साथ दिली. यातील सुंदरराव सोळंके हे मात्र आवर्जून टोपी परिधान करायचे. बाकी अनेक काँग्रेस नेत्यांचाही टोपीशी काडीमात्र संबंध आला नाही. विलासराव देशमुख, त्यांच्या आधी मुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषविले किंवा विलासरावांनंतर जे मुख्यमंत्री झाले त्या अशोक चव्हाण यांनीही टोपीशी दुरान्वयानेही संबंध ठेवला नाही.
शिवसेना नेत्यांचाही बहुधा टोपीशी पंगाच असायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही कधी टोपी घातली नाही आणि उद्धव तसेच राज ठाकरेही टोपीच्या वाटेला कधी गेले नाहीत. दिसायला ग्रामीण आणि गावरान वाटणारे पण मुलाखतीला चर्चेला बसल्यावर छानदार इंग्रजी बोलणारे बाळासाहेब विखे-पाटील यांच्या डोक्यावरही कायम टोपी दिसायची. बाळासाहेब विखे सात-आठ वेळा लोकसभेवर काँग्रेसतर्फे निवडून गेले पण त्यांच्या नशिबी कधी मंत्रीपद आले नाही. अशा या बाळासाहेबांना दुस-या बाळासाहेबांनी मात्र केंद्रात मंत्रीपदाची संधी दिली. १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना विखे-पाटलांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेतर्फे खासदारकीची निवडणूक लढवून ती जिंकली. त्यावेळी केंद्रात एनडीएचे सरकार होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात विखेंना अर्थराज्यमंत्रीपद देण्याची व्यवस्था केली.
असा आहे एकूण राजकीय टोपीचा महिमा. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी टोपीवर काहीसा अन्याय केला हे खरे असले तरी अनेक बडय़ा नेत्यांनी मात्र या शिरोभूषणाला सन्मानाने नेहमीच आपल्या डोक्यावर स्थान दिले. काळाच्या ओघात आता राजकीय मंडळींच्या डोक्यावर टोपी शोधूनही पाहायला मिळत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची शान असलेली टोपी हळूहळू कालबाह्य होताना दिसते आहे. नवीन राजकीय पिढी टोपीला हद्दपारच करून टाकेल की काय हा विचार मनात चटका लावून जातो.