आधुनिक जगात पती-पत्नीचं सहजीवन कालौघात बदलत चाललं आहे. परंतु आयुष्यातलं एकमेकांचं स्थान आणि बरोबरीनं येणा-या भावभावनांशी जोडले गेलेले कोणतेही कार्यक्रम अत्यंत निष्ठेनं जपण्याचा प्रयत्न पूर्वापार होत आला आणि आजही तो होताना दिसतो.
भारतीय संस्कृतीत सण, उत्सवाला एक आगळं-वेगळं महत्त्व आहे. आधुनिक जगात पती, पत्नीचं स्थान कालौघात बदलत चाललं असलं, तरी सहजीवनात एकमेकांच्या अस्तित्वाबाबत असलेली प्रतिष्ठा आणि आपुलकी अशा भावभावनांशी जोडले गेलेले कोणतेही कार्यक्रम तेवढयाच निष्ठेनं जपण्याचा प्रयत्न होतो आहे. ग्रामीण भागात सामूहिक पद्धतीनं वडाची पूजा करण्याची प्रथा दिसते तर शहरी भागात उपलब्ध वेळेनुसार महिला वडाची पूजा करताना दिसतात.
जूनमध्ये होणा-या वटपौर्णिमेचा इतिहास आणि ख्याती पुराणात अनेक प्रकारे वर्णिलेली आहे. पर्यावरणदृष्टया हितकारक अशा आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या अशा परंपरांचा उपायकारक आणि अपायकारक या दृष्टिकोनातूनही विचार करता येणं शक्य आहे. परंतु आजच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या माता-भगिनी वडाच्या झाडासमोर जेव्हा नतमस्तक होतात अथवा व्रतसंकल्पाबाबत भरभरून बोलतात, त्यावेळी पिढयान् पिढया या परंपरांची भक्कमपणे, खोलवर रुजलेली मूळं दिसू लागतात.
निसर्गाला आपण दरवेळी प्राधान्यक्रम दिला आहे. वड, उंबर, पिंपळ, जांभूळ, आंबा हे पाच अतिशय पवित्र वृक्ष मानले गेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा अन्नपाण्याचं दुर्भिक्ष्य असतं, तेव्हा या घनदाट वृक्षांची सावली आसरा देते आणि लागणारी फळं पशुपक्ष्यांचं पोट भरतात. या वृक्षांच्या जवळ पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असतात. त्यामुळे या वृक्षांचं जतन करणं सर्वच प्राणिमात्रांसाठी अत्यावश्यक असतं. यासाठी या वृक्षांच्या सान्निध्यात देवळं असतात व त्यांचं संरक्षण भक्त करतात. वृक्षतोडीमुळे निसर्गावर विपरित परिणाम दिसू लागले आहेत. अशा वेळी या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने का होईना, निसर्गाकडे आपण अधिक जागरूकतेनं पाहत आहोत हे महत्त्वाचं. परंतु वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वडाच्या फांद्या तोडून किंवा दस-याला आपटयाची पानं, फांद्या तोडून याच निसर्गाला आपण हानी पोहोचवत असतो याचंही भान ठेवलं पाहिजे.
आदिकालापासून वनांचं रक्षण स्त्रिया करीत आल्या आहेत. त्यांच्यामधील उपजत माया त्यांना झाडांना पाणी घालणं, खत घालणं, त्यांची देखभाल करणं हे करवून घेत आलेली आहे. वटसावित्रीच्या कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना आपलं वृक्षसंवर्धनाचं काम व त्या निमित्ताने सावित्रीच्या कथेतून बोधन करून घेण्याची वेळ आली आहे. सत्यवानाचे गेलेले प्राण परत आणण्याच्या निमित्ताने सावित्री साक्षात यम धर्माशी संभाषण करते. त्याच्याकडून धर्म समजून घेते, त्याची मर्जी संपादन करते व आपल्या इच्छा पूर्ण करवून घेते. ते सर्वच संभाषण ‘देवीभागवतात’ व्यासांनी दिलेले आहे. ते वाचून चिंतन करण्याजोगे आहे.
शहरी संस्कृतीत वडाची पूजा करणे व पतीसाठी काही प्रार्थना करणे हे हास्यास्पद मानले जाते. शहरातील गावभाग व ग्रामीण, निमग्रामीण भागात अजूनही वडांची पूजा महिला करतात.
ज्या वडाची पौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते, संसारासाठी प्रार्थना केली जाते त्या वडाचे आयुर्वेदातील स्थानही भक्कम आहे. हा वटवृक्ष सर्व भारतभर आढळतो. वडाच्या झाडाचा प्रत्येक भाग स्त्रियांसाठी उपयोगी आहे. गर्भ टिकून राहण्यासाठी वडाच्या कोंबाचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे. वडाच्या पारंब्यांपासून बनलेलं तेल केसवृद्धीसाठी उपयोगी आहे.