आईची महती सांगणारी अनेक गाणी, ओव्या, कविता आपण वाचतो, ऐकतो पण आईचे बाळाप्रती भाव काय असतात?
आई म्हणजे बाळाचे विश्व असते. त्यावेळी आईच्या मनात बाळाबद्दलचा एक कृतज्ञता भाव असतो,
विश्वव्यापी बाळा तुझ्यामुळे
मी झाले आई,
होऊ कधी उतराई
बाळा तू माझ्या आयुष्यात आलास, माझ्या देहात वाढलास, माझे स्त्री जीवन समृद्ध केलेस.
‘देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे, माझे सारे जीवन देई मम बाळाला’ अशा खूप दु:खद, नऊ महिन्यांच्या ताण-तणावातून गेल्यावर आईच्या हाती तो दुपटय़ात गुंडाळलेला लहानसा गोळा येतो, तेव्हा आई भरून पावते. आयुष्यातली ती एकच वेळ असते, जेव्हा बाळ रडल्यावर आईला आनंद होतो. कारण, जन्मल्याबरोबर बाळ न रडणे, हे बाळाचा मृत्यू सुचवते. ते रडणे ऐकून आई म्हणते,
‘धन्य कुस आईची,
धन्य कान, लोचने
कृतार्थ जन्म जाहला,
फिटुनी जाई पारणे
अनंत कष्ट सोसले,
फेडशील पांग तू’
बाळ हळूहळू मोठा होतो. थोडा सुट्टा होतो. चिमण्या, कावळे, कुत्री, मांजरे, गाय, बैल हे प्राणीसुद्धा त्याच्या भावविश्वात येतात, चंद्र-सूर्य, आई-बाबा, हे चौकोनी विश्व वाढते. कुटुंबातील लोकांचा ते बाळ डोळ्याचा तारा असतो, आशा असते.
आई म्हणते सुरज कहूँ या चंदा
तुझे दीप कहूँ या तारा
बाळाला झोपवताना आई अंगाई गाते, त्या अंगाईत एक कातरता असते. अज्ञात भविष्याची भीती असते. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही. अनेक वृत्त करीत, वेगवेगळ्या अंगाई गात आई बाळाला मोठा करते. हल्ली सार्वजनिक लसीकरणामुळे खूप सुलभता आहे, अन्यथा पूर्वी बालपणीच्या आजारपणांचे व बालमृत्यूंचे प्रमाण खूप मोठे होते. बालकाच्या अकाली मृत्यू हरणासाठी आई खूप व्रतवैकल्य करत असतेच.
संतान गोपाळ जीवतीचे शुक्रवार, पिठोरी अमावस्या, दत्ताचे गुरुवार, संकष्टी, चतुर्थी स्त्रीची सर्व व्रते, बाळाच्या हितासाठीच असतात. बालकाचे वय बदलते, व्रताचा हेतू बदलतो, पण आई तीच असते. भाबडी, हळवी, बालकाची काळजी करणारी, अन्य कसलाही विचार न करणारी! राजमहालातल्या राजमातेच्या पोटी येणारा सम्राट असो किंवा रस्त्याच्या कडेला बाळंत होणा-या एखाद्या अगतिक कष्टकरिणीचे बाळ असो. आईच्या नजरेत ते सम्राट अशोक असते. देव पण बालक उदात्त हेतूने जन्माला घालते.
आईचे मात्र संपूर्ण विश्वच ते बालक असते. आई होणे ही एक कठोर तपस्या असते. बाळापासून दूर होताना खूप वेदना आईने सोसलेल्या असतात. आई झाली की स्त्री ‘‘आई’’ याच नात्यात सर्वस्व झोकून देते. तिच्या शरीरातील संप्रेरके तशीच बनलेली असतात.
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
असे बालक म्हणतो, तर आई मात्र म्हणते; ‘‘मेरी दुनिया तू है’’ तू मिला तो मैने पाया, जिने का नया सहारा.
आईला बाळाकडून ज्या अपेक्षा असतात, त्यात आईचा स्वार्थ नसतो. बाळाचे हित हीच अपेक्षा आईची असते. मातेचा भाव स्नेहाचा असतो.
एकटाच मजशी तू, उभ्या जगात लाडका
तूच दु:ख सागरी उगवलीस द्वारका असे तिला वाटते.
हळूहळू बाळ-कन्या अथवा पुत्र स्वतंत्रपणे वाढते. बालकाच्या आयुष्यात बदल घडत असतात. नवनवीन व्यक्ती येतात. आई मात्र अजून आईपणातच गुंतलेली असते. मूळ सत्तरीला आले तरी, आई बाळाला लहान समजून, बालकाची काळजीच करते. बाळाला त्याची स्वप्ने, त्याची नोकरी, नवे मित्र, जीवनसाथी, सासुरवाडीचे लोक, ऑफिसमधील सहकारी असे मोठे विश्व असते. आई मात्र आईपणाची ती जीर्ण झूल घालून उभी राहते, दुख-या गुढग्यांनी फरफटत असते. स्वत:च्या घरात, स्वत:च्या प्रश्नांत गुंतलेल्या मुलाला आईबद्दलचा आदर असतो, पण सवड नसते. एकत्र कुटुंबात आई-मूल एकत्र राहत असले तरीही मूल आपल्या नव्या विश्वात रमलेले असते. पाणी पुढे वाहत असते. आई वृद्ध होते, बालक तरुण होतो. बालकाला मागे वळून, आईकडे धावणे व्यवहार्य वाटत नाही. तो बंधनापुरता उरतो.
बालक आईबद्दल उदासीन होऊ लागतो.
वृद्धाश्रमातील आयांना बोलते केल्यावर जाणवते की, या आयांना आपल्या मुलाबद्दल आकस नाही, मात्र सून अथवा जावई यामुळेच आम्हा दोघांत अंतराय आला, अशी खंत आहे.
हळूहळू आई कालबाह्य ठरते, आजारपण, वृद्धत्व, जरामरणाची चर्चा, तरुण बालकाला नकोशी होते. बालकाची आईमधली गुंतवणूक कमी होऊन, बालक उदासीन होते. आईने कधी काळी टणक व्हावे, म्हणून रागावते, मारत असेल तर बालक ते आठवून नाराजी ठेवतो. आई सर्वकाही देऊ शकत होती तरी तिने दिले नाही म्हणून आकसाने वागतो, मात्र त्यात बालकाला जीवन जगायला सक्षम करणे, लढून स्वकर्तृत्वावर कमाई करणे बालकाने शिकावे हा हेतू असतो.