आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे. ध्वजाच्या रुंदी-लांबीचे प्रमाण दोनास-तीन असे आहे. पांढ-या पट्टय़ाच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. या चक्राची मूळ रचना सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील पौराणिक स्तंभावर पाहावयास मिळते. या चक्राचा व्यास जवळजवळ पांढ-या पट्टय़ाच्या रुंदीइतकाच आहे व या चक्रास २४ आरे आहेत.
राष्ट्रध्वजाच्या या रचनेला भारताच्या सांविधानिक सभेने २२ जुलै १९४७ रोजी मान्यता दिली. भारत सरकारच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणा-या अवैधानिक सूचनांखेरीज राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन आणि वापर करण्यासंबंधी काही कायदेदेखील केलेले आहेत – प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे), राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ (१९७१ मधील क्र. ६९). असे सर्व नियम, कायदे इत्यादींचे एकत्रीकरण करून सर्व संबंधितांच्या सुविधेसाठी २००२ सालचा राष्ट्रध्वज संकेत तयार केला आहे.
राष्ट्रध्वजाचे नियम
२६ जानेवारी २००२ पासून या संकेताची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पूर्वीच्या सर्व नियमांऐवजी आता याचा वापर केला जाईल. यामधील तरतुदीनुसार आता सामान्य नागरिक, खासगी संस्था तसेच शैक्षणिक संस्था राष्ट्रध्वजाचे मुक्त प्रदर्शन करू शकतात. परंतु असे प्रदर्शन व वापर प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० आणि राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ कायद्याच्या अधीन राहून करता येईल.