विनोदाचा एक्का समजला जाणारे भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे ‘झांगडगुत्ता’ या मराठी सिनेमातून प्रथमच एकत्र येणार आहेत. व्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मीडिया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संदीप मनोहर नवरे सांगतात की, ‘‘विनोदाची जोडगोळी एकत्र आणण्यासाठी आम्ही जवळपास दीड वर्ष वाट पाहिली. अखेर योग जुळून आला. ‘झांगडगुत्ता’ हा विदर्भातील शब्द आहे. त्याला सावळागोंधळ असे आपण म्हणू शकतो. सिनेमाची गोष्ट ही विदर्भातील एका छोटय़ा गावात घडते. सागर हा उपवर मुलगा आहे, तर भारत त्याचे वडील आहेत.
अनेक वर्षापासून प्रयत्न करूनही सागरच्या लग्नाचे काही ठरत नाही. वैदर्भीय प्रश्नाचे मिश्कीलपणे पण गांभीर्य न सोडता केलेला प्रयत्न म्हणजे झांगडगुत्ता. चित्रपट पूर्ण झाला असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’’ ‘‘आम्ही नायक नसलो तरी प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात. तसेच निर्माते आणि दिग्दर्शक आमच्यासाठी थांबून राहतात, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानायला हवेत,’’ असे भारत गणेशपुरे याने म्हटले. सागर कारंडे सांगतो की, ‘‘झांगडगुत्ता’ चित्रपटाद्वारे मी वेगळय़ा भूमिकेतून सर्वासमोर येत आहे. या भूमिकेसाठी मला सतत एका माणसाला भेटून अभ्यास करावा लागला. त्याचा लवकरच उलगडा होईल.