मुंबई – केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला, सांगली या जिल्ह्यातील काही भागांत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर, गोंदियातही अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर देवरी तालुक्यातील डोंगरगावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.
यवतमाळ – राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यवतमाळमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नद्या, छोटे नाले, ओढय़ांना पूर आला आहे. या पावसामुळे यवतमाळमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यवतमाळमध्ये मागील चार दिवसांत ९९.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थिती आता निवळली आहे आणि कृषी विभाग पंचनामे करीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शेतीला पावसाचा मोठा बसला आहे. जवळपास ३० हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. यवतमाळमधील दारव्हा तालुक्यातील खोपडी येथे पीक उघडे पडल्याने पऱ्हाटीची दयनीय अवस्था झाली आहे. तर महागाव तालुक्यातील वाकन, तिवरंगमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी वाहत्या पाण्यामुळे पिके मुळासकट आडवी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतक-यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
माकडांना पुराचा वेढा
महागाव कसबा लघुसिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पातील एका झाडावर जवळपास १५ ते २० माकडे अडकली आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यात महागाव कसबा लघुसिंचन प्रकल्प आहे. महागाव कसबा येथील लघुसिंचन प्रकल्प यावर्षी पूर्णत्वास गेला असून, या प्रकल्पात प्रथमच पाणी अडवण्यात आले. १६ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. दारव्हा-आर्णी मार्गावर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात एका बाभळीच्या झाडावर जवळपास १५ ते २० माकडे अडकून पडली. चहूबाजूंनी पाणी असल्याने त्यांना खाली उतरता येत नाही. तीन दिवसांपासून ती माकडे झाडावर उपाशी अडकल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गावातील ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती कळविली असून वनविभागाने या माकडांना वाचवण्यासाठी एक पथक तयार केल्याची माहिती आहे.
सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ
सांगली – सांगलीत कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत ही वाढ झाली आहे. कृष्णेच्या पाण्याची पातळी २४ फुटांवर पोहोचली आहे, तर वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी १९ फूट होती. मात्र, सध्या या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पाणी पातळी २४ फुटांवर पोहोचली आहे. यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून नदीतील मौजे डीग्रज येथील बंधारा आणि सांगली बंधारा पाण्याखाली आहेत. कोयना जलाशयात पाण्याची आवक वाढल्यामुळे सकाळपासून ४५ ते ४८ हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पात्राबाहेर पडलेल्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे.