होळी रंगांचा, आनंदाचा सण.. घराघरात साजरा केला जाणारा सण. या सणात रंगांची उधळण करून एकमेकांना रंग लावला जातो. सणाचा हा आनंद अधिकाधिक लोकांबरोबर साजरा करून द्विगुणित करायचा असेल तर काही जबाबदा-या आपण घेणं आवश्यक आहे.
अवघ्या चार-पाच दिवसांवर होळी येऊन ठेपली आहे. होळी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी लाकडं जाळून होळी पेटवली जाते, पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नारळ ओवाळून तो होळीत टाकला जातो.. दुस-या दिवशी रंगांनी रंगपंचमी खेळली जाते. गावाला तर दुस-या दिवशी धुळवड खेळतात आणि रंगपंचमी होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीलाच खेळतात.
कित्येक जण गावाला कोकणात होळीसाठी जातात. गावाला कशाला आपल्या मुंबईतही सोसायटय़ांमध्येही होळी पेटवली जाते. मुंबईत तर दुस-या दिवशीच रंगपंचमी खेळली जात असली तरी दुपापर्यंत हा होळीचा सण साजरा केला जातो. कित्येक जण तर मजा म्हणून अक्षरश: एकमेकांना रंगांच्या पाण्यामध्ये बुडवतात. मात्र अशी ही पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करताना काही गोष्टी आपण जबाबदारीने पाळणं आवश्यक आहे. अशी जबाबदारीने होळी खेळलीत तर होळीचा आनंद आणखी द्विगुणित होईल.
» आपल्याकडे होळी सणाला आठवडाभर आधीपासून सुरुवात होते. फुगे मारायला बंदी घातली असली तरीही काही ठिकाणी आठवडाभर आधी फुगे मारले जातात. केवळ रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतूनच नाही तर कित्येक वेळा शाळेत आदल्या दिवशी मुलं एकमेकांच्या अंगावर पाण्याच्या पिशव्या फेकून मारतात. रस्त्यावर आल्यावरही तेच सुरू असतं. एकमेकांवर शाई उडवतात. या पिशव्या एकमेकांच्या अंगावर फेकताना कोणाच्या अंगावर उडू शकतात, लागू शकतात हेच त्यांना मुळी भान नसतं. शाई उडालेले कपडे धुताना महिलांना किती कष्ट पडत असतील याचा कोणी विचार केला आहे का? आपली मुलं फुगे किंवा पाण्याच्या पिशव्या शाळेत घेऊन जात नाही ना याकडे जरा लक्ष ठेवा. मुळात त्यांना फुगे घेऊन न देणं ही आपलीच जबाबदारी आहे.
» मुंबईतही कित्येक सोसायटय़ांमध्ये होळी पेटवली जाते. आधीच पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. मुंबईत ठिकाठिकाणी होळी पेटवण्यासाठी कुठे आली आहेत लाकडं. म्हणूनच ज्या ठिकाणी मोठं कॉम्प्लेक्स असेल त्या ठिकाणी त्या कॉम्प्लेक्स आणि आसपासच्या काही इमारतींनी मिळून होळी साजरी करायला काय हरकत आहे. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल आणि सणही साजरा होईल.
» या दिवशी पुरणाची पोळी घराघरांतून केली जाते. ही पुरणपोळी करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही असं कष्टाने केलेली पुरणाची पोळी होळीत नैवेद्य म्हणून फेकून देतात. नारळही होळीत घालतात. मात्र ही पोळी किंवा नारळ होळीत घालण्यापेक्षा तो फोडून एखाद्या गरीब किंवा गरजू लोकांना दिला तर त्यांनाही सणाचं काहीतरी दिल्याचं समाधान आणि भुकेलेल्याला काहीतरी खायला घातल्याचं पुण्य तुमच्या पदरी नक्कीच येईल. परंपरा मोडून काढा असं अजिबात नाही; मात्र नारळ फोडून तो गरिबांना खायला द्यावा. त्यांची एकवेळची भूक भागेल.
» हल्ली सगळीकडे रंगपंचमी अधिक उत्साहाने खेळतात. ओळखायला येत नाही इथपर्यंत रंग खेळतात. पण रंग खेळताना आजूबाजूच्या लोकांचंही भान ठेवावं. कित्येक वेळा लोकांच्या घरात घुसून त्यांना ओढून त्यांच्या दारात रंग खेळला जातो. ज्यांना खेळायचं नाही त्यांना जबरदस्ती कशाला करायची? कित्येकांच्या दारात रंग टाकला जातो. मात्र यामुळे लोकांचं नुकसान होतं. कारण कित्येकांनी घराला नवीन रंग लावलेला असतो. तो खराब होण्याची शक्यता असते. कोणाच्या दारात रंग सांडून त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कोणालाही जबरदस्ती करू नका.
» सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळी खेळताना पाण्याचा अपव्यय टाळा. आज आपल्या महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला आहे. तिथे पिण्याचं पाणी प्यायची मुश्कील आहे. अशा परिस्थितीत आपण टँकर मागवून होळी खेळणं कितपत योग्य आहे? एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळणं ही आपलीच जबाबदारी नाही का? म्हणूनच पाणी घेऊन खेळण्यापेक्षा कोरडय़ा रंगांनीच खेळणं अधिक योग्य ठरेल.
» थोडक्यात काय, तर मुलांना फुग्यांसाठी पैसे न देणं, आठवडाभर आधी मुलं काय प्लानिंग करतायेत याकडे लक्ष देणं ही आपली जबाबदारी आहे, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मुलांना केवळ रंगच खेळायला देणं, केवळ मुलांनाच नव्हे तर आपणही रंगांनीच खेळणं ही जबाबदारी आपण घ्यायलाच हवी. आपल्या खेळण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणाचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष देणं आणि आपल्या मुलांनाही हे सामाजिक भान देणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण पेलली तर होळीचा आनंद आणखी द्विगुणित होईल.