आपला समाज आणि समाजाचा पाया या दोन्ही गोष्टींमध्ये मूलभूत सुधारणा व्हावी म्हणून तिने स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. गेली २५ वर्ष समाजसेवा करताना अनेक दु:खी स्त्रियांना आधार दिला, त्यांची घुसमट पाहिली. त्या घुसमटीतील ‘आक्रोश’ त्यांनी शब्दबद्ध केला आहे. त्यातलंच हे एक प्रकरण
१९८४ साल असेल. महिला दक्षता समितीच्या कार्यालयात एक कार्यकर्ती म्हणून मी काम करू लागले. दर आठवडय़ातले माझे कामाचे दिवस ठरलेले होते. आठवडय़ातून तीन दिवस संध्याकाळी ४ ते ६ या वेळात महिला दक्षता समितीच्या कार्यालयात जमायचो. अडचणी घेऊन आलेल्या महिलांच्या कथा ऐकायच्या. त्यांचे टिपण करायचे. त्यांना सल्ला द्यायचा. त्यांच्या सासरी फोन करायचा. जरूर पडली तर पोलीस स्टेशनला कळवायचे. मानसिकदृष्टय़ा खचलेल्या या मुलींना आधार देण्याच्या कामात केवळ कर्तव्याचीच भावना नव्हती, तर एक सामाजिक समाधानही असायचे. हळूहळू दक्षता समितीच्या कामात मी रमत गेले. कोणत्याही कामात रमल्याशिवाय त्याचा परिपूर्ण आनंद मिळत नाही आणि समाधानही मिळत नाही. ‘सुनंदा’च्या केसपासून मी हे काम सुरू केले. तसतसे या कामातले वास्तव किती भीषण आहे, याची जाणीव व्हायला लागली.
रोज नवीन मुली, त्यांचे नवीन प्रश्न.. पण सगळय़ांचा मूलभूत गाभा एकच- पत्नीचा छळ.. एक तर नव-याकडून, सासूकडून किंवा नणंदेकडून.. बहुसंख्य विषयांतली कारणे सारखीच. दारू, नव-याचा बाहेरख्यालीपणा आणि चैन. यामुळे संसाराची राखरांगोळी झालेल्या या तरुणी ओक्साबोक्शी रडत यायच्या. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, हेच पहिलं सूत्र होतं. रडून चालणार नाही. अन्याय होत असेल तर त्याचा मुकाबला केला पाहिजे, या भावनेने त्या भगिनीला प्रथम मानसिकदृष्टय़ा कणखर बनवलं पाहिजे. याच भूमिकेतून काम सुरू केलं.
एक दिवस दुपारी महिला दक्षता समितीच्या कार्यालयात बसलेले असताना ‘सुजाता’ आली. तिचं नुकतंच लग्न झालं होतं. किमान दीड वर्ष झालं असावं. तिला एक मुलगीही झाली होती. तिच्या सासू-सास-यांचा चांगला मोठा ब्लॉक होता; पण सुजाताला एका चाळीच्या खोलीत भाडय़ाची जागा घेऊन देण्यात आली होती. वर्ष-दीड वर्षच लग्न होऊन झाले होते आणि मग सुजाताच्या लक्षात येऊ लागले, की नवरा रोज रात्री दारू पिऊन येतो. त्याचे बाहेरही खूप विचित्र संबंध आहेत. सुजाता संस्थेत आली, पण नक्कीच ती तिला न्याय मिळवून घ्यायच्या मार्गानेच आली होती.
‘‘काय झाले?’’ मी विचारले.
तिने नाव, पत्ता सांगितला. नव-याने काय प्रताप केले आहेत, त्याची माहिती सांगितली. आदल्याच रात्री तिच्या नव-याने तिला हॉकी स्टीकने एवढं मारलं होतं, की ती बेशुद्ध झाली होती. त्या स्थितीत तो बाहेर निघून गेला होता. लहान मुलगी रडत होती. तिच्या भयानक रडण्यामुळे शेजा-यांना वाटले, तिची आई घरी आहे की नाही? शेजारी-पाजारी धावून आले. सुजाता बेशुद्ध होऊन पडलेली होती. तिच्या अंगावर मारहाण झालेले वळ चांगलेच दिसत होते. मग कोणीतर एका शहाण्या शेजा-याने माहेरच्या लोकांना फोन करून बोलावून घेतलं. तेवढय़ात सुजाताचा दीर आणि जाऊ आली. तिच्या तान्हय़ा मुलीला ठेवून घेऊन सुजाताला माहेरी हाकलून देण्यात आलं. सुजाता रडून सांगू लागली.. मुलीला सोडून मी जगू शकत नाही. तिच्या एका मैत्रिणीने तिला महिला दक्षता समितीकडे जायला सांगितले.
सुजाता आली आणि रडू लागली. तिला धीर दिला. तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिला घेऊन मुंबईचे त्यावेळेचे पोलीस आयुक्त यांचंच कार्यालय गाठलं. आयुक्तांनी वेळ देऊन सुजाताची कहाणी ऐकून घेतली. एवढेच नव्हे, तर सुजाताच्या नव-याला आणि तिच्या सासरच्यांना अटक करा आणि मुलीचा ताबा आईला द्या, असे सक्त आदेश काढले. तो दिवस असा समाधानाचा होता. पोलिसांची ऑर्डर घेऊन मी एकटीनेच सुजाताच्या घरी जाण्याचा निर्णय केला. पण मनात विचार आला, की सुजाताच्या आई-वडिलांनाही बरोबर घ्यावं. सोबत दोन पोलीस घेतले. सुजाता घाबरून गेली होती. सुंदर संसारात पोलीस स्टेशन किंवा पोलीस आणि अशा भानगडी.. ज्यांना अशा विषयाची सवय नाही, त्या घाबरतात. मुलींच्या हृदयाची धडपड होऊ लागते. मात्र मी सुजाताला समजावलं.. ‘घाबरू नकोस, तुझ्यामागे संस्था उभी आहे.’
मुलीचा ताबा घ्यायला आलो आहोत, असं आम्ही सांगताच सुजाताचा मोठा दीर अंगावर आला. ‘आता मुलीचा पुळका का आला, तेव्हा काय पान्हा आटला होता?’ असं सुजाताचा दीर बोलू लागला. सुजाताच हिमतीने म्हणाली, मी घेऊनच जात होते, पण तुम्हीच मुलीला जबरदस्तीने तुमच्याकडे ठेवलं होतं. तुम्हीच मुलीला माझ्यापासून तोडलं आहे. मग पोलिसांनी दीर आणि जाऊ यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं. सुजाताचा दीर एक राजकीय कार्यकर्ता होता. तो पटकन बोलून गेला. ‘‘काय राव, आम्ही तुम्हाला नेहमी मदत करतो आणि तुम्ही अशी वागणूक देता काय?’’ पोलिसांनी हतबलपणे सांगितले, ‘‘वरून आदेश आहेत.’’ पोलिसांनी त्या मुलीचा ताबा सुजाताला दिला. मुलीची छाती कफाने भरलेली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. मुलगी सुजाताच्या ताब्यात पोलिसांनी देताच सुजाताचे सगळे दु:ख जणू बारा वाटांनी पळून गेले. त्या मुलीला तिने कवटाळले, तिचे मुके घेतले. सुजाताच्या चेह-यावरचा आनंद पाहत असताना माझ्या डोळय़ांतूनही अश्रू ओघळले. आपण हिमतीने केलेल्या निर्णयाचे समाधान किती आहे, याची जाणीव झाली. मी मुलीला उचलले आणि पोलिसांना जबानीत तिच्या तब्येतीची नोंद करण्यास सांगितलं.
आम्ही पोलीस स्टेशनहून निघालो. मनात आलं की, सासरचे लोक खूप संतापले असणार. म्हणून सुजाताला घरी सोडताना पोलीस संरक्षणात पोहोचवावे. पोलिसांनी मग व्हॅनमधून घरी पाठविण्याची जबाबदारी घेतली. पण सुजाताच्या सासरची माणसे कशी होती? तिचा नवरा, तिचा दीर हातात दगड घेऊन रेल्वे क्रॉसिंगपाशी उभे होते. जर पोलीस संरक्षण घेतले नसते तर त्या दिवशी सुजाताला मारहाणच झाली असती. ते रेल्वे क्रॉसिंगपाशी उभे असल्याचे दिसल्यामुळे आम्ही वेगळय़ा मार्गाने सुजाताला सुखरूप तिच्या माहेरी पोहोचवले. आजूबाजूच्या लोकांना पोलीस स्टेशनचे, माझ्या स्वत:चा आणि महिला दक्षता समितीचे नंबर घेऊन ठेवले. सुजाताला हिंमत दिली. पुढे तिचा नवरा घटस्फोटासाठी कोर्टात गेला. सुजाताला घटस्फोट मिळाला. मुलीचा ताबा अर्थातच सुजाताकडे राहिला.
आज या घटनेला २२ वर्षे झाली. सुजाताने नर्सिगचा कोर्स केला आणि तिच्या पायावर ती उभी राहिली. गेल्या अनेक वर्षात सुजाताशी संपर्क झाला. तिची मुलगी आता खूप मोठी झाली आहे आणि सुजाताचे व्यवस्थित चालू आहे. हे तिने दक्षता समितीला पाठवलेल्या पत्रावरून समजले. सुजाताची अलीकडे भेट नाही, पण कधीतरी अशीच तिची आठवण येते. ती खंबीरपणे उभी राहिली नसती तर तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावर अनंत अत्याचार केले असते. घटस्फोट मिळाल्यानंतरसुद्धा संसार दुभंगला तरी सुजाताला स्वाभिमानाने उभे राहता आले आहे, हे काय कमी आहे? आणि तिची मुलगी.. तिही तिच्या आईच्या स्वाभिमानी स्वभावातूनच निश्चितपणे ताठ मानेने उभी राहिली असेल.