कदाचित राँग नंबर असावा. त्या क्षणापासून, एक सकारात्मकता माझ्यात आली. जुनी मी काहीशी बदलले, फुलण्याचे दिवस परत आले आहेत. आहे मजा जगण्यात या.
सुखाचा शोध, सुखी माणसाचा सदरा, अशा लोककथा आपण नेहमीच ऐकतो. मी सुखी आहे, असे रोज दहा वेळा लिहा, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, असा ही सल्ला ऐकतो. मात्र, सुख हे लबाड असते. ते फसवेगिरी करीत राहते. ब-याच काळ दु:खी राहिल्यावर, मी एकदा एका क्षणी, सुखी व्हायचा निश्चय केला. कदाचित तो चुकीचा निर्णय, माझी त्या काळची, काही अंशी गरज होती. त्यानंतर, माझ्या जीवनातील ती कित्येक र्वष, त्या सुखी होण्याच्या हट्टाने स्लो पॉयझनिंगमध्ये गुदमरत होती.
तू कशी तू अशी
तू फुलात मी पानात
मन जाईच्या कळ्यात..
अशी गाणी आठवून मला नेहमीच, जुन्या खुणा शोधण्याची घाई झालेली असे.
हातात हात तिचा,
हात्तीच्याच (सहज) यावा
असा सौम्य संदेश मनात येई, मात्र विरून जाई. छोटय़ा पडद्यावरच्या, त्या खोटय़ा पडद्यात, मी उगीचच वेळ घालवत असे. फुलांनी फुलायचे, कळ्यांनी हसायचे, असे हे प्रत्येक क्षणांचे थेंब, कधी सुकून गेले कळलंच नाही. वाटायचे, घडय़ाळाचे काटे दोन असतात, कारण माणूस दोन पायांनी धावत असतो. एका अपघातानंतर माझ्यातील वेगळी ती मी जागी झाले. वाढत्या वयाबरोबर, मला संगणक शिकणे, रॅट रेसमध्ये धावणे जमणार नाही, हे मी जाणले. त्या दिवशी ताप आल्यामुळे मी घरी आजारी झोपले होते. ऑफिसची कामे, फोनवरून केली जात होती. घरच्या सर्वाना, त्यांची त्यांची कामे होती. पोटात भूक मी म्हणत होती. तापाने हात-पाय चालत नव्हते. पाठदुखी पाठ सोडत नव्हती. ऑफिसचे काम पाठी लागले होते. मी आजारपणातसुद्धा मेहनत करीत होते. मला औषधांनी ग्लानी आली होती.
त्या दिवशी माझा मोबाईल वाजला, मला स्वप्नात यमराज दिसले, ते म्हणाले,
‘‘मी तुला न्यायला आलो आहे. २४ तास बाकी आहेत. तुझ्या आयुष्याचा आज शेवटचा दिवस आहे. काय करायचे ते करून घे’’ मी मोबाईल बंद केला, लाडक्या मैत्रिणीला फोन केला. मुलासाठी गरम चहा करून मी स्वत:सुद्धा तो चव घेत प्यायले. अल्केमिस्ट या माझ्या लाडक्या पुस्तकांची पाने उलटत, मी यमराजाची वाट पाहू लागले. यमराज आले नाहीत. कदाचित राँग नंबर असावा. त्या क्षणापासून, एक सकारात्मकता माझ्यात आली. जुनी मी काहीशी बदलले
फुलण्याचे दिवस परत आले आहेत.
आहे मजा जगण्यात या.
रोजचा दिवस आनंदाने जगणे किंवा आहे त्यात आनंद मानणे म्हणजे सकारात्मकता होय. एक राहते घर असताना, वीक एन्ड घर हवे असणे, एक गाडी असताना दुसरी हवी, सहली हव्या, यातून मी अलिप्त झाले.
एका कवितेत कवीने म्हटल्याप्रमाणे नि:शब्द संध्याकाळ होती ती..
आकाश फिकटल्या ता-यांचे झाले होते.
वेलींची कुजबुज नव्हती की, पानांचे हितगुज नव्हते.
यमराजांचा कॉल पुन्हा आला, यमराज म्हणाले,
‘‘तुला मी त्या दिवशी नेले, पण ते त्या पहिल्या कुत्तरओढीच्या धावपळीच्या जन्मातून उचलले, हा तुझा नवा जन्म आहे. तू हे आयुष्य जग.’’
‘मधुमास’ नसतानाही मधुरमास वाटत होता. म्हणजे त्या दिवशी यमराज मला न्यायला आले नव्हते, तर सूचना देण्यासाठी आले होते. कामातून निवृत्ती, कधीतरी घ्यावीच लागते. ही निवृत्ती स्वत:साठीच असते. जगण्याची मौज कळू लागते.
यमराज पुढे म्हणाले,
‘येईन पुन्हा कधी तरी येईन,
तोपर्यंत जीवन जग,
केवळ कसेबसे जिवंत राहू नकोस’
आहे मजा जगण्यात या.