जोगेश्वरी परिसरात गुंफा आहेत हे फक्त आसपासच्या लोकांनाच माहित आहे. नवख्या मंडळींना ह्याची कल्पनाही नाही. तसं पाहायला गेलं तर या गुंफांना विशिष्ट असं नाव नाही. जोगेश्वरी गुंफा हीच काय ती ओळख.
लेणी किंवा गुंफा म्हटलं की, आपल्या समोर येतं ते दगडात कोरलेली एलिफंटा किंवा कान्हेरी गुंफेतील शिल्पं. पण या व्यतिरिक्त आणखीही काही गुंफा मुंबईतही आहेत. त्यांचं प्रमाण अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल इतपत असलं तरी दुर्लक्ष करण्याजोगं नक्कीच नाही. लेणी किंवा गुंफा आधी बौद्धांनीच तयार केल्या. हिंदू स्थापत्यकलेत लेणी हा प्रकारच नव्हता. कालांतराने या बौद्ध लेण्यांचं हिंदूकरण करण्यात आलं. या गुंफा अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली परिसरात आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. दगडांत खोदून काढलेल्या या लेण्यांचं मूळ बौद्ध विहारात आढळतं. असं असलं तरी बौद्ध आणि हिंदू लेण्यांमधील फरक लक्षात घेण्याजोगा आहे. हा फरक असण्याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनी शिल्पाचा उपयोग आपापल्या धार्मिक गरज आणि आदर्शानुसार केला. जोगेश्वरी परिसरातही अशाच काही गुंफा असून, त्याची माहिती आसपासच्या लोकांना आहे. मात्र नवखी मंडळी या परिसरात गुंफा आहेत, हे ऐकल्यावर अचंबित झाल्याशिवाय राहत नाहीत. तसं पाहायला गेलं तर या गुंफांना विशिष्ट असं नाव नाही. जोगेश्वरी गुंफा हीच काय ती ओळख किंवा नाव.
जोगेश्वरी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला थोडय़ा अंतरावर या गुंफा आहेत. स्थानकापासून चालत येणं जरा लांबच पडतं. स्थानकाबाहेर प्रतापनगरला जाणारी बस पकडायची. हायवेपासून बसने अगदी मिनिटावर तर चालत अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. समोरच्या गल्लीत शिरलात तर गुंफेकडे जाणारी वाट दिसते. थोडं पुढे गेलं की, डाव्या हाताला टेकडी दिसते. आजूबाजूच्या भिंतीमधून एक रस्ता जातो. त्या रस्त्याच्या एका टोकाला पुरातत्त्व विभागाची पाटी तर दुस-या टोकाला फुलं, नारळ विक्रेते आहेत. हीच ती गुंफा. हार-नारळवाले पाहून आत मंदिर आहे, असं वाटतं. आपला हा अंदाज चुकत नाही. कारण आतमध्ये एक नव्हे तर तीन देवळं आहेत.
या गुंफा जमिनीखाली काही फूट असून, पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूंनी प्रवेश आहे. त्या दोन्ही प्रवेशाद्वारांत जवळपास अडीचशे फुटांचं अंतर आहे. दोन्ही बाजूंना खाली उतरून जाण्याकरता बारा फूट रुंद पाय-या आहेत. दोन्ही प्रवेशद्वारांचं आवार लहान आहे. पश्चिमेकडचं प्रवेशद्वार अर्धमंडप आहे. पूर्व प्रवेशाशी लहान-मोठे असे तीन अर्धमंडप आहेत. त्यावरून पूर्वेकडील प्रवेशद्वार महत्त्वाचे मानले जाते. गुफांच्या मध्यभागी असलेला सभामंडप आकारानं खूप मोठा, प्रशस्त आणि रचनेतही वेगळा आहे. त्याच्या अगदी मध्यभागी जोगेश्वरीदेवीच्या मंदिराचा गाभारा आहे. सभामंडपाच्या दक्षिणेला भरभक्कम खांबांची रांग असलेली मोठी पडवी आहे. तिथे कित्येक भटजी शांती किंवा पूजापाठ करताना दिसतात. त्याच्या पुढे आवार असून, त्याच्या आजूबाजूचं खोदकाम अर्धवट सोडून दिलेलं दिसतं. या सभामंडपाचं एलिफंटा येथील सभामंडपाशी साम्य असल्याचं सांगितलं जातं. दक्षिणेला शंकराचं मंदिर आहे. तिथून थोडं पुढे गेलं की, छोटंसं हनुमान मंदिर दिसतं.
दक्षिणेकडील आवारासमोरचं खोदकाम अर्धवट सोडून दिलेलं आहे. तसं करण्यामागे काय हेतू आहे हे अजूनही कळलं नाही. पश्चिमेकडच्या प्रवेशद्वारापाशी गणपती मंदिर आहे. तिथे जाताना एक छोटा सभामंडप दिसतो. तिथे काही दगडी कोरीव मूर्ती भग्नावस्थेत आढळतात. गोंगाट नसल्याने आसपासचे विद्यार्थी तिथे अभ्यासासाठी येतात. जोगेश्वरी माता मंदिर, शिवशंकर आणि गणपती मंदिर ही सगळी मंदिरं स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं. महाशिवरात्री आणि नवरात्रीला इथे मोठा उत्सव असतो.
हिंदू शिल्प स्थापत्यकलेवर बौद्ध स्थापत्यकलेचा मोठा परिणाम झाला. मात्र या गुंफांतील अर्धमंडप, ओसऱ्या आणि पाट पाहिले की, तो परिणाम नाममात्र असल्याचं जाणवतं. कारण या गुंफांत बौद्ध पद्धतीच्या खांबांच्या रांगाही नाहीत. दगडी बांधणीच्या मंदिरांच्या शैलीचं ओझरतं दर्शन जोगेश्वरीच्या गुंफांत पाहायला मिळतं.
मात्र, या गुंफांमध्ये फिरताना तिची दुरवस्था लपत नाही. कित्येक ठिकाणी ढासळलेला भाग दिसतो तर कित्येक ठिकाणी गळणारं पाणी. इतकंच नव्हे तर एका कोप-यात नैसर्गिक विधीही केले जातात. अशा या गुंफांना पुरातत्त्व विभागाने सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला असून, लवकरच याची डागडुजी केली जाणार असल्याचं पुरातत्त्व विभागाचे देखरेख करणारे कर्मचारी अशोक परब यांनी सांगितलं.
गजबजलेल्या परिसरात असल्या तरी या गुंफांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र, या गुंफांभोवतीची वस्ती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लेण्यांच्या अस्तित्वावर गदा यायला वेळ लागणार नाही.
भारतातील सर्व भगवान बुद्धाचे अनुयायी आणि सत्य जाणनारे (आचरण करणारे)
सर्वांनी एकत्र येवून भारतातील सर्व बोेद्ध लेणी आणि बोेद्ध साहित्य यांचे जतन
केले पाहिजे़