वसुधा आणि ऊर्मिलाची भेट अचानकच बाजारात झाली. कांदे खरेदी करताना. ‘किती गं महागाई.. चं.. कांदे लावायची वेळ आलीय.’ ‘खरंच!’ ऊर्मिलाचं बोलणं ऐकून वसुधानेही दुजोरा दिला. त्यांच्या बोलण्यावर कांदेवाल्यानेही हसून मान डोलावली.
‘बरं झालं भेटलीस इथेच. अगं सुमीच्या मुलीचं लग्न आहे. पत्रिका मिळाली का तुला?’ ऊर्मिलाने विचारलं
‘हो..हो मिळालीय ना. जाऊ या दोघी जणी. उद्या स्टेशनलाच भेटू या.’ वसुधा म्हणाली.
या दोघी यावेळी एवढय़ा बोलण्यात गुंतल्या की कांदेवालाही मग यांचं बोलणंच ऐकत बसला. हळूहळू गर्दी वाढली. कांदेवाल्याचं लक्ष कामात गुंतलं. तसे या दोघींनी कांदे घेतले आणि या दोघीही तिथून सटकणार एवढय़ात वसुधा म्हणाली, ‘अगं बोलण्याच्या नादात कांदेवाल्याचे पैसे राहिले ना द्यायचे.’
‘ए, गप्प बस. त्याचं लक्षच नाहीये आपल्याकडे चल पटकन. बघ किती गर्दी वाढलीय ती. चल चल पटकन चल’ म्हणून ऊर्मिला वसुधाचा हात धरून ओढतच तिला पुढे पुढे आणली.
आपण त्या कांदेवाल्याचे असे पैसे बुडवणं योग्य नाही. आपण अशी त्याची फसवणूक करता कामा नये.. आपण असं करता नये, याची खंत वसुधाच्या मनाला लागून राहिली. पण ऊर्मिलाचं वागणं बघून वसुधा गप्प राहिली.
‘हे बघ वसुधा, अशा संधी पुन्हा पुन्हा येत नसतात. पण आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा असतो. बघ कांदेवाल्याचं आपल्याकडे लक्ष नाही. दोघींनी मिळून दोन दोन किलो म्हणजे चार किलो कांदे घेतले. झाला ना आपला फायदा. फुकटात कांदे मिळाले आपल्याला.’
‘अगं पण?’
‘तू ना मूर्ख आहेस. जा दे जा बाजारात जाऊन पैसे. बरं ते जाऊ दे. आपण जायचं ना सुमीच्या मुलीच्या लग्नाला?’ ऊर्मिलाने विषय फिरवला.
‘हो हो, जाऊया ना. उद्याच भेटू स्टेशनला.’
दुस-या दिवशी वसुधा, ऊर्मिला रेल्वेस्टेशनला भेटल्या.
‘चल चल तिकीट काढू.’ वसुधा पुढे सरसावली.
‘ए थांब. कशाला हवं तिकीट? एवढं कुणी बघत नाही हं. तू ना खरोखरंच मॅड आहेस.’ ऊर्मिलाचं हे बोलणं ऐकून वसुधा घाबरली.
‘अगं कुणी नाही कसं? टीसी असतात ना’
‘अगं नेहमीच नसतात काही. कशाला दहा, वीस रुपये फुकट घालवायचे उगाचच? आता सुमीच्या मुलीच्या लग्नालाही आहेराचा फटका आहेच नाही तरी. नशीब काल कांद्याचे तरी पैसे वाचले. तेवढीच बचत.’
‘मला फार भीती वाटतेय गं. घशाला कोरड पडली बघ माझ्या.’ वसुधा घाबरून बोलली.
‘घाबरटच आहेस तू. वेडी कुठची. जा पाणी घेऊन ये. बॉटलच आण, मलाही होईल. तोवर मी बसते इथे. हो पण लगेच ये बरं का, नाही तर लग्नाला उशीर व्हायचा.’ ऊर्मिलाच्या बोलण्यावर वसुधाने मान डोलावली आणि ती पाण्याची बॉटल आणण्यासाठी निघून गेली.
थोडय़ा वेळाने वसुधा पाणी घेऊन आली तशी ऊर्मिला वैतागली. ‘किती गं वेळ लावलास.’
‘हो.. हो. घे पाणी घे.’ म्हणून वसुधाने ऊर्मिलाला पाणी दिलं व ती स्वत:ही प्यायली.
काही क्षणातच ट्रेन आली आणि त्या दोघी ट्रेनने अध्र्या पाऊण तासातच प्लॅटफॉर्मला उतरल्या. ब्रिज चढल्यावर वसुधा पुढे तर ऊर्मिला मागे. चालता चालता ऊर्मिलाची पावलं तिथेच थबकली.
‘वसुधा, थांब. अगं चाललीस काय अशी तुरूतुरू’
‘काय झालं?’
‘अगं पुढे टीसी आहेत. बघ. तिकीट चेकींग चाललंय’ ऊर्मिलाचं बोलणं ऐकून वसुधा म्हणाली,
‘सांगितलं होतं ना, तिकीट काढूया म्हणून, नाही ऐकलंस माझं. आता काय करायचं?’
‘एवढी घाबरतेस काय? चल, बिनधास्त चालायचं. तू पुढे हो मी मागून चालते तुझ्या. ठीक आहे. जराही डगमगू नकोस. आपल्याकडे तिकीट आहे असं समजून बिनधास्त चाल. नाहीतर संशय यायचा त्यांना.’
‘हो हो. मी पुढे चालते तू माझ्या मागून ये.’ असं म्हणून वसुधा पुढे चालू लागली तर ऊर्मिला आपल्या बचावासाठी तिच्या मागून चालू लागली.
हळूहळू पुढे सरसावताना वसुधा टीसींच्या समोर आली आणि पुढे सरसावली. टीसींना तिचा अजिबात संशय आला नसावा. हे बघून ऊर्मिला खूश झाली. आणि हसतच पुढे सरसावली. तसं ‘तिकीट काढा’ म्हणून टीसींनी ऊर्मिलाला थांबवलं. आणि ऊर्मिला धडधडली. ‘तिकीट.. आहे ना.. थांबा हं.’ ऊर्मिला आढेवढे घेऊन बोलू लागली.
‘थांबा हं काय, पटकन तिकीट काढा.’ टीसींचा आवाज ऐकून ऊर्मिला धास्तावली. वसुधा तर सुटली. पण, ऊर्मिला मात्र सापडली. ऊर्मिलाची नजर वसुधाकडे लागली.
‘अहो, इकडे तिकडे काय बघताय.’ टीसींचा आवाज ऐकून ऊर्मिला भानावर आली.
‘अहो तिकीट नाही माझ्याकडे आणि ती माझी मैत्रीण आहे ना तिच्याकडेही नाही तिकीट. बोलवा तिला’ ऊर्मिलाच्या मनात आलं आपणंच एकटं काय म्हणून भरुदड सोसावा जरा वसुधालाही फटका बसू दे.
ऊर्मिलाने वसुधाचं नावं घेतल्यावर टीसींनी वसुधालाही बोलावलं आणि तिच्याकडे तिकिटाची मागणी केली. ऊर्मिलाच्या मनात आलं, ‘आता सारा दंड वसुधालाच भरायला लावू’. ऊर्मिलाने डोळय़ात पाणी आणलं. म्हणाली, ‘वसुधा, पैसे असतील तर भरून टाक बाई. सगळी लोकं बघताहेत आपल्याला?’
तशी वसुधाने आपली पर्स उघडली. ऊर्मिलाचं लक्ष वसुधाच्या पर्सकडे लागलं. तिला वाटलं वसुधा आता पैसे बाहेर काढणार. पण वसुधाने दोन तिकिटं काढून टीसींसमोर धरली. हे बघून ऊर्मिला आश्चर्यचकित झाली.
‘अगं होती आपल्याकडे तिकिटं? माझ्या लक्षातच नाही आलं. पाहिलंत का साहेब, आहेत आमच्याकडे तिकिटं..हं..हं..!’ म्हणून ती टीसींकडे बघून हसली.
वसुधाने हातातील तिकिटं टीसींना दाखवली आणि मग ती पुढे सरसावली. ऊर्मिलाही मग थांबली नाही.
‘वसुधा, वसुधा थांब अगं. थांब’
तशी वसुधा थांबली. तिची रागीट नजर ऊर्मिलावर रोखली.
‘अगं अशी रागाने काय पाहतेस मला. कधी काढलीस तिकिटं तू? कमाल केलीस बाई’
‘पाण्याची बॉटल आणायला गेले होते ना, तेव्हाच काढली मी तिकिटं.’ वसुधाचं बोलणं ऐकून ऊर्मिला ओशाळली.
‘मी चुकले गं, चार पैसे वाचवण्याच्या विचाराने मी असं पाऊल उचललं. पण त्याचा फटका आज चांगलाच बसणार होता. आणि मी तुला त्यात भरीस घालणार होते.’
‘केव्हाही प्रमाणिक राहिलेलं बरं असतं ऊर्मिला. जाऊ दे आता तो विषय. आता जाऊ या लग्नाला. आणि उद्या बाजारात ही जाऊ या.’ वसुधाने असं म्हणताच ऊर्मिला संभ्रमात पडली.
‘बाजारात कशाला?’
‘कांदेवाल्याचे पैसे द्यायला. कुणाची फसवणूक करणं वाईटच ना ऊर्मिला.’
‘हो हो. नक्कीच’ म्हणून ऊर्मिलाने मान डोलावली आणि आजपासून प्रामाणिकपणाला जणू सुरुवात केल्याचं वचनच तिने वसुधाला दिलं.
माझा रेल्वेचा पास संपला होता. मला माहित नव्हता.टिसिनि पकडले मी दंडाचे २५० रुपये दिले.त्यातील १०० रुपये मला परत दिले.म्हणाला काकांना मद्दत करूया.तू मी चोर भावू मिळेल ते वाटून खावू तुला दीड मला दीड मध्ये नाही कोणाची भीड.हेआहे भारतातील समाज जीवन.